Friday, May 13, 2022

बालपणातील १0 चवी

 डॅनी ग्रेगरी मला नियमित ई-मेल पाठवतो. म्हणजे त्याचे काय की मी त्याचे ‘आर्ट बिफोर ब्रेकफास्ट’ वाचले आणि त्याच्या वेबसाईटवर जाऊन त्याची नियमित ई-मेल येण्यासाठी जिथे कुठे टिचक्या मारायच्या होत्या तिथे टिचकावून आलो. त्याची प्रत्येक ई-मेल नवीन काहीतरी सुचवून जाते. डॅनी ग्रेगरी भन्नाट माणूस आहे.

आता हेच बघाना – त्याच्या नुकत्याच आलेल्या ई-मेलचा विषय आहे – ‘बालपणातील १२ गंध’. मग त्याने एक यादीच दिली आहे. त्यातले कित्येक गंध आपल्याला ठाऊक नाहीत कारण तो वेगळ्या जगात वाढला.

मला वाटलं माझ्या ‘बालपणातील १0 चवींची यादी’ करावी. ती इथे देतो. तुम्हीही लिहा.

१. तूप-साखर-पोळी - माझ्या शाळेच्या डब्यात हा पदार्थ नेहमीचा.

२. करवंद – किती करवंद जाळीतून तोडून फस्त केली ते अगणित आहे, पण त्या जाळीत साप असेल कां ही भीती सदैव मनात होती. करवंदाच्या जाळीजवळ कुठे खुट्ट वाजले की मी पळून जात असे. 

३. तोरणं – हे पिठूळ पण गोड चवीचे पांढरे छोटे फळ आता कुठेही दिसत नाही. वयाची पहिली आठ वर्षे मी खोपोलीवरून जुन्या घाटातून खंडाळ्याला जाताना टाटा कॉलनी लागते तिथे काढली. आसपास जंगलच होते.

४. फुलातले मध – कांही फुले तोडून त्यातला मध चोखून घेता येतो (हा उपद्व्याप करण्यासाठी आजूबाजूला बरीच फुले असावी लागतात! त्यावेळी त्यांची कमतरता नव्हती)


५. घाणेरीची पिकलेली फळे – ती काळी असतात. गोड लागतात. हिरवी फळे विषारी असतात असं कोणीतरी म्हणाले होते त्यामुळे त्यांच्या वाटेला कधी गेलो नाही.

६. दूध – हा मला अजिबात न आवडणारा पदार्थ. पण पेलाभर पिण्याशिवाय गत्यंतर नव्हते. (‘जगात माणूस असा एकच प्राणी आहे जो दुसऱ्या प्राण्याचे दूध पितो’ असं कोणीतरी बोलल्यापासून तर मी ते बादच करून टाकले.)

७. कॉडलिव्हर ऑईल – शाळा सुटली की एक ग्लास दूध पिणे सक्तीचे होते (टाटा कॉलनीत राहत असल्याचे परिणाम) आणि ग्लास रिकामा झाल्यावर एक चमचाभर कॉडलिव्हर ऑईल प्यावे लागे. मला त्याबद्दल कधीच तक्रार नव्हती. एखादी चव आपल्याला आवडते त्याचे कारण त्या जोडीच्या दुसऱ्या पदार्थाची चव आवडत नाही हे त्या वेळेलाच कळले. 

८. विलायती चिंचा – त्या झाडावरून खाण्यात जी मजा आहे ती विकत घेऊन खाण्यात नाही. मी पंचवीस वर्षे कल्याणला राहिलो. तिथल्या लक्ष्मी मार्केटमध्ये एक असे दुकान आहे की तिथे फक्त बोरं, विलायती चिंचा, आवळे वगैरे मुलांना आवडणारे पदार्थच मिळतात. मीही कित्येकदा तिथे चिंचा घेतल्या आहेत. पण झाडावरून मिळवलेल्या चिंचा एकदम ‘फार्म फ्रेश.’ त्यांची सर कशाला नाही.

९. दूध-गुळ-पोहे – आता हा पदार्थ बाद झाला आहे. कोणीही करत नसावे, दिसत तर नाहीच, पण कुणाला त्याची आठवणही येत नसावी. जरी त्यात दूध असले तरीही त्या पदार्थाबरोबर काही आठवणी आहेत. गूळ खाणेच कमी झाले आहे, असे नाही कां? गुळाइतका दुसरा मधुर पदार्थच नाही असे माझे मत. कांही पदार्थ आठवणींनी गोड लागतात. मी चहात पोळी बिस्कीटासारखी बुडवून खात असे. त्या काळी अनेक तसे खात असत. त्याचीही चव अजून लक्षात आहे.

१०. विम्टो – आम्ही मुंबईला आलो तेंव्हाचे लोकप्रिय पेय. मला वाटतं ड्युक्स कंपनी ते बनवायची. एक ट्रक घरी क्रेट देऊन जायचा. खोपोली सोडून मुंबई शहरात आल्याची ती माझ्यासाठी खूण. आता तीही दिसत नाही.

कित्येक पदार्थांवर आठवणी लिहिल्या जातात. डॅनी ग्रेगरीमुळे पुन्हा जागृत झाल्या. 

विवेक पटवर्धन 


Monday, October 12, 2020

सुसाट जॉर्ज

चरित्र आणि प्रोफाईल (शब्दचित्र) यात फरक आहे हे ‘सुसाट जॉर्जचे सिद्धहस्त लेखक निळू दामले पुस्तकाच्या सुरवातीसच स्पष्ट करतात - ‘प्रोफाईल हे व्यक्तीचं स्केच असतं. प्रोफाईलमधे व्यक्तीचे महत्वाचे ठळक पैलू येतात. ते ही मोजक्या रेषांचे फटकारे मारून तयार केलेल्या स्केच सारखे.’

शब्दचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या आयुष्यातले चढ-उतार, सन्मानाचे-संघर्षाचे क्षण त्यात टिपले असतात, त्यामुळे आपल्याला त्याचे व्यक्तिमत्व आणि जीवनपट संक्षिप्तपणे दिसतो.

निळू दामले यांनी जॉर्ज फर्नांडिसांचे शब्दचित्र लिहिण्याचे एक कारण म्हणजे त्यांनी कांही काळ जॉर्जबरोबर काम केलं होतं, जॉर्जना जवळून बघितलं होतं. दुसरं कारण (आणि हा माझा कयास आहे) म्हणजे मराठी वाचकांना असलेला जॉर्जचा परिचय. जॉर्जच्या कामाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्यांची (झळ लागलेल्यांची म्हणा हवे तर) एक आख्खी पिढी इथे मुंबईत आहे. मुंबई बंद करणारे जॉर्ज, टॅक्सीचालकांची युनियन करणारे जॉर्ज, बेस्ट कामगारांचा संप करणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे, अशा अनेक भूमिकांतून जॉर्ज मुंबईकरांच्या जीवनात आले. आणि ज्यांना हरवणे अशक्य समजले जायचे त्या स.का. पाटलांना निवडणुकीत सपशेल हरवणाऱ्या जॉर्जबद्दल तर मुंबईकरांना नेहमीच कुतूहल राहिले आहे.



जॉर्ज यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व ‘सुसाट जॉर्जमध्ये अचूक पकडले आहे. कोणत्याही विषयाचा ध्यास व अभ्यास करणं आणि धडाडी असणं हे गुण साधारणपणे हातात हात घालून जात नाहीत. पण जॉर्ज ह्याला अपवाद होते. म्हणुनच जॉर्ज सारख्या दुर्मिळ व्यक्तिमत्वाभोवती एक वलय सहज तयार होत असावे. यलोगेट पोलिसांविरुद्ध मोर्चा काढून गोदी कामगारांवर होणारा अत्याचार रोखण्यात, रेल्वे कामगारांचा मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात, दिवसा दिल्लीत काम करून रात्री मुंबईत कामगारांची मीटिंग घेणाऱ्या जॉर्ज यांची धडाडी वाखाणायलाच हवी.

डॉक्टरी सल्ला न जुमानता कारगिलच्या सैनिकांची भेट घेण्यातला झपाटलेपणा, आणि आपल्यावरच डायनामायिट खटला काढून घेऊ नये असं जनता पार्टीला सांगणारे जॉर्ज यांचा प्रामाणिकपणा अशी त्यांची स्वभाव-वैशिष्ट्ये लेखकाने अचूक पकडली आहेत.

कोणत्याही नेतृत्वापुढे नेहमी असा पेच असतो की एका बाजूस वैयक्तिक आकांक्षेचा रेटा असतो तर दुसऱ्या बाजूस अंगीकारलेले कार्य करताना सचोटी व आशावाद ज्वलंत ठेवण्याची कसरत असते. जॉर्जने वैयक्तिक आकांक्षेकडे दुर्लक्षच केले. त्यामुळेच कामगारांचा आणि कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा व प्रेम मिळाले.

ओघवत्या भाषेत निळू दामले यांनी जॉर्ज फर्नांडिसांचे शब्दचित्र रंगवले आहे. त्यात तटस्थता असली तरीही कौतुकाचीही झालर आहेच. मुंबई बंद करण्यासाठी जो ओळखला गेला त्याच्यावरील पुस्तक लॉकडाऊनमध्ये सबकुछ बंद असताना प्रकाशित व्हावे हा एक चमत्कारिक योगायोग नव्हे का?

(‘सुसाट जॉर्ज’, लेखक: निळू दामले, राजहंस प्रकाशन, रु २५०)

विवेक पटवर्धन

Thursday, October 8, 2020

लॉकडाउनमधली पुस्तके: रानबखर

 लॉकडाउनमध्ये बऱ्याच दिवसांपासून राहून गेलेली कामे काढली. कपाटात पुस्तके लावायचे काम माझ्या ‘टू-डू’ लिस्टमध्ये अनेक दिवस होते. मग तेच करायला बसलो. त्यातच अनेक दिवस सापडत नसलेली दोन पुस्तके हाती आली. अचानक लक्षात आले की मी इंग्रजी पुस्तके वाचतोय पण कित्येक दिवसात, कित्येक महिन्यात म्हणा हवे तर, मराठी पुस्तके वाचली नाहीयेत. साधारणपणे काही चांगल्या पुस्तकांचे किंवा मला हव्या असलेल्या विषयांवरच्या पुस्तकांचे संदर्भ मी ‘रिमाइंडर’ अॅपमध्ये नोंदवतो. फोन काढला आणि तीन पुस्तके ऑर्डर केली. ‘रानबखर’ त्यातलंच एक, इतर दोन पुस्तकांबद्दल नंतर बोलू.

‘आरोहन’च्या कार्यकर्त्यांबरोबर जव्हार मोखाडा भागातल्या पाड्यात फिरताना मी कित्येक गावकऱ्यांना आणि आदिवासींनाही भेटलो होतो. आदिवासींबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत अधिक जाणून घ्यावं असं वाटले. ‘रानबखर’चा संदर्भ कसा आला ते आठवत नाही, पण ‘रिमाइंडर’ मध्ये मी नोंद केली होती. 

माझा असा अनुभव आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या विषयावरचे पुस्तक वाचता, तेव्हां इतर तशीच पुस्तके तुमच्या पुढ्यात आणली जातात. मी रानबखर मागवले आणि थोड्याच दिवसात कुणाच्या तरी सांगण्यावरून गाय स्टँडिंगचे ‘प्लंडर ऑफ द कॉमन्स’ हे देखील घेतले.प्लंडरचा विषय वेगळा पण कांही ठिकाणी रानबखरच्या विषयाशी समांतर जाणारा. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.



पत्रकारिता करताना थत्तेंचा संबंध झारखंडमध्ये आदिवासी गावांमध्ये अनौपचारिक शिक्षणाचे काम करणाऱ्या कांही लोकांशी आला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, आसाम अश्या अनेक ठिकाणी आदिवासी खेड्यात रहात, त्यांना समजून घेत प्रवास केला. आदिवासींची आयुष्याकडे, शेत-रानाकडे, त्यांच्या गायीगुरांकडे  बघायची दृष्टी वेगळी आहे. शहरातल्या माणसांना ती अप्रगत वाटेल. पण जग आता  त्यांच्याप्रमाणेच विचार करू लागले आहे हे पर्यावरणावरील अनेक लेख आणि पुस्तके दाखवून देत आहेत. “साधेपणा आणि भोळेपणा, अल्पसंतोष आणि आळशीपणा, निवांतपणा आणि मंदपणा, उत्स्फूर्तता आणि नियोजनशून्यता हे गुणावगुण एकाच नाण्याचे छापा-काटा आहेत” असे थत्ते लिहितात तेव्हां आपण नाण्याची कुठची बाजू बघतोय त्याचा वाचकाला विचार करायला ते भाग पाडतात.

आदिवासींचे शोषण कसे आणि किती केले जाते हे तर सर्वज्ञात आहे, निदान तसे असावे. (थत्ते स्वत: ‘वयम्’ ही स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था जव्हारला चालवतात.) ते आदिवासींच्या बाबतीत शोषण किती खोल आणि नीच थराला जाऊ शकतं त्याची कल्पना तटस्थपणे तरीही कळकळीने मांडतात तेव्हां वाचताना आपलीच मान शरमेने खाली जाते. त्यांच्या प्रश्नावर ठोस उत्तर थत्ते सांगत नाहीत, कारण जटील प्रश्नांना सोपी उत्तरे नसतातच. पण ते उत्तरे शोधायची विचारधारा मात्र दाखवतात. “एका ठिकाणी उत्तर सापडलं म्हणून त्याच्या भराभर यांत्रिक कॉप्याकाढून ते उत्तर इतर ठिकाणी लागू पडेलच असं नाही.” म्हणजेच प्रत्येक ठिकाणी नवी उत्तरे शोधावी लागणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक आहे. म्हणून “लोक आणि विज्ञान एकत्र आले तर आदिवासींचा प्रश्न आवाक्यात आणता येईल” हा थत्तेंचा विचार सुयोग्य आहे. ते बारीपाड्याबद्दल लिहितात. बारीपाड्याच्या सर्व शंभर कुटुंबांनी श्रमदानाने दीडशे बंधारे बांधले, पाच पाझर तलाव केले. नैसर्गिकरीत्या उगवणारी झाडे वाढवली. कल्पकतेने अनेक विकासाची कामे हाती घेतली. बारीपाड्याच्या उदाहरणाचा धडा म्हणजे लोक आणि विज्ञान एकत्र आले तर आदिवासींचा प्रश्न आवाक्यात आणता येईल हाच आहे.

कित्येक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था आदिवासींसाठी काम करीत आहेत ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. तर स्वातंत्र्याची सात दशके उलटली आणि अनेक विचारांच्या राजकीय नेत्यांची सरकारे आली-गेली तरीही आदिवासींची परिस्थिती फारशी सुधारली नाही हा दुर्दैवी भाग आहे.

रानबखर हे मिलिंद थत्ते यांचं केवळ पंच्याण्णव पानांचे पुस्तक. कुठच्याही विचारधारेचं जोखड न घेतां लिहिलेलं. मी ह्या वर्षी वाचलेल्या अप्रतिम पुस्तकांपैकी एक!

विवेक पटवर्धन

(रानबखर – आदिवासींच्या जीवनसंघर्षांचे पदर, मिलिंद थत्ते, समकालीन प्रकाशन, रु. १००/-)

Wednesday, August 12, 2020

एक फोटोग्राफर आणि चाळीस वर्षांची कहाणी

 


दुपारची वेळ. मी टीव्हीच्या न्यूज चॅनेलना कंटाळलो होतो. स्पोर्ट्स चॅनेल त्याच त्याच मॅचेस पुन्हा दाखवत होती. मग मी नेटफ्लिक्सकडे वळलो. नेहमीप्रमाणे त्यांनी सहा-आठ कार्यक्रम स्क्रीनवर माझ्यापुढे टाकले. त्यात एक होता ‘क्युबा अँड द कॅमेरामन’.

मी नुकताच अभिजित भाटलेकर यांचा फोटोग्राफीचा एक कोर्स शिकलो होतो. ‘क्युबा अँड द कॅमेरामन’ मध्ये क्युबाचे फोटो बघू असे मनाशी बोलत मी त्यावर क्लिक केले. आणि एक अप्रतिम फिल्म बघितली. जे हाती लागलं ते फोटो नव्हते तर चक्क एका विलक्षण कॅमेरामनने त्याच्या व्हिडिओ कॅमेऱ्यात पकडलेला क्युबाचा चाळीस-पंचेचाळीस वर्षांचा इतिहास – आणि तो देखील लोकांच्या आयुष्यातील क्षण पकडून विणलेला.

जॉन अल्पर्ट हा कॅमेरामन. त्याने केलेल्या फिल्मनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत. पण ती नंतरची गोष्ट. जॉन विशीतला तरुण होता तेव्हां त्याला एक अफलातून कल्पना सुचली – क्युबामध्ये जाऊन लोकांच्या जीवनाचं चित्रीकरण करायची. असं चित्रीकरण त्याने तब्बल चाळीस वर्षं केलं. सत्तरीच्या दशकापासून ते फिडेल कॅस्ट्रोच्या निधनापर्यंत जॉन अल्पर्टने क्युबाच्या अनेक फेऱ्या केल्या.

जॉन हा अमेरिकन वार्ताहर आहे, त्यामुळे त्याच्याकडे अद्ययावत उपकरणे उपलब्ध होती. पण त्यावेळी, म्हणजे सत्तरीच्या दशकात व्हिडिओ रेकोर्डिंग प्रगत नव्हते. त्याची उपकरणे इतकी बोजड होती की त्याला ती एका ‘बाबागाडीत’ ठेवावी लागली. तो विचित्र प्रकार बघून फिडेल कॅस्ट्रोचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले, आणि त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली.

पण ‘क्युबा अँड द कॅमेरामन’ ही कांही फिडेल कॅस्ट्रोवर केलेली फिल्म नाही. क्रांतीनंतर बऱ्यापैकी सुबत्ता असलेल्या देशात फिडेलने मोफत शिक्षण जाहीर केलं. (ज्या देशात शिक्षणाचा गंधही नसलेले बरेच लोक होते, तो देश १९६१ सालापर्यंत संपूर्ण साक्षर झाला). त्याच्या धोरणांना समाजवादी म्हणा किंवा कम्युनिस्ट – स्वत: फिडेल त्याच्या धोरणांना अशी लेबलं लावीत नव्हता – पण त्यांचे अनेक बरे वाईट परिणाम क्युबन समाजावर झाले.


जॉन अल्पर्ट मात्र कांही लोकांना त्याच्या प्रत्येक क्युबावारीत न चुकता भेटत राहिला. तीन भाऊ आणि त्यांची एक बहिण यांच्या आयुष्यातले चाळीस वर्षांतले बदल, म्हणजे चढउतार त्याने व्हिडिओ कॅमेऱ्यात पकडले. उत्तम शेती करणारे हे तीन भाऊ सुस्थितीतून हलाखीच्या अवस्थेत आले. सोविएत रशिया फुटल्यानंतर क्युबामध्ये एक वेळ अशी आली की दुकानात शेल्फ रिकामी दिसत, अन्नपदार्थ अजिबात नव्हते. त्या तीन भावांकडे असलेली गुरे लोकांनी चोरली. कशासाठी? तर त्यांना मारून खाण्यासाठी, आणि त्यांत त्यांचा एक घोडाही चोरांनी खाण्यासाठी नेला! स्वास्थ्यसेवा मोफत दिली गेली पण डॉक्टरकडे असणारी उपकरणं मात्र बरीच जुनी व जुन्या तंत्रज्ञानाची दिसली. त्याचा पगार? दरमहा पंचवीस डॉलर्स!

खुद्द फिडेल बरोबर जॉन न्यूयॉर्कला त्याच्याच विमानातून गेला व त्याची मुलाखतही घेतली आहे. क्युबातील माणसांच्या जीवनातील चाळीस वर्षे जॉनने अशी पकडली की त्या समाजाबद्दल आपल्याला बरेच कांही समजते. त्यांचे प्रश्न, त्यांची जगण्याची रीत हा एक कॅलेडिओस्कोपच आपल्यासाठी तयार होतो. लुईस नांवाच्या माणसाला दर क्युबावारीत जॉन भेटत राहिला. दर वेळेस त्याच्या घरी गेला. तसाच एक मुलगी दहा वर्षांची असल्यापासून तिला मुलं होणे, ती मुलं मोठी होणे, तिचं अमेरिकेला स्थलांतर होणे हे सर्व त्याने बघितले आणि कॅमेऱ्यात टिपले. जॉनने क्युबामधील मानवाधिकार उल्लंघनाबद्दल काहीही भाष्य न केल्याची टीका झाली, तरीही ‘क्युबा अँड द कॅमेरामन’ आपल्याला बरेच कांही सांगून जातो.

समाजवाद लोकांना शेवटी इथे आणून पोचवतो असे दिसलं तरी भांडवलशाही देखील फार मागे नाही ह्याची जाणीव आता सर्वांना झाली आहे. राज्यकर्ते, त्यांच्या आकांक्षा, त्यांची धोरणे आणि त्यांचा समाजावरील दूरगामी परिणाम हा आपल्याकडेही चर्चेचा विषय आहे. त्यामुळे क्युबाकडे बघताना आपणही ‘कुछ समझे?’ विचारत राहतो.

विवेक पटवर्धन

Monday, June 1, 2020

लेकुरवाळ्या महिला कामगारांचे प्रश्न कोण लक्षात घेतो?

“करोनाने काही डोकं चक्रावुन टाकणारे प्रश्न आपल्यापुढे आणले आहेत,“ अरविंद श्रौती माझ्याशी फोनवर बोलत होते (ते अनेक कामगार संघटनांचे सल्लागार आहेत). त्यांच्या बोलण्यात काळजी होती व तत्परतेने काही केले पाहिजे अशी कळकळही होती. अरविंद काही महिला कामगार नेत्यांशी बातचीत करून आले होते व लेकुरवाळ्या महिला कामगारांच्या प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केले होते. आम्ही दोन चार महिला कामगारांशी बोलून प्रश्नांचे स्वरूप समजून घ्यायचे ठरवले.
अरविंदने त्याच्या ओळखीतल्या एका महिला कामगार प्रतिनिधीशी संपर्क साधला. तिच्यामुळे दोन महिला कामगार आमच्याशी बोलायला तयार झाल्या. इतर तीन चार जणी “नाही” म्हणाल्या कारण त्यांच्या नवऱ्यानी आडकाठी केली होती. वेळ संध्याकाळी सहाची ठरली (कारण सात नंतर घरातली कामे असतात).
“आमच्या कंपनीत ३०० महिला काम करतात, त्यातल्या कित्येक महिलांना लहान मुलं आहेत. “करोना” मुळे त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा आहे.”
“आमचे काम पहिल्या पाळीत चालायचे. सकाळी सव्वासहाला शिफ्ट चालू व्हायची. कंपनीची बस पहाटे सव्वाचारला येत असे कारण बस कंपनीत पोहोचायला दोन तास लागत. आम्ही तीन वाजता उठून आमच्या लहान मुलांना घेऊन पहाटे चारला घर सोडत होतो. कंपनीत गेलो की बाळाला पाळणाघरात ठेवायचं आणि कामाला जायचं. नोकरी करायची म्हणजे अशी तारेवरची कसरत अटळ आहे असे मनाला समजावत होतो.”
“मग करोनाची साथ आली आणि सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सगळे काम बंद झाले, पण मे २१ पासून कारखाना पुन्हा सुरु झाला.”
“कारखाना चालू झाला पण लहान मुलांना घराबाहेर आणायचे नाही अशी मार्गदर्शक सूचना सरकारने काढली आहे आणि दुसरीकडे कंपनीने पाळणाघर बंद केले आहे - आता आम्ही काय करायचे??? “
“शेजारी कुठे पाळणाघर नाही कां?” मी विचारले.
“काही आहेत, पण करोनाच्या संसर्गाची भीती आहे, तसेच त्यात भर म्हणून कित्येक पाळणाघरं अजून उघडली नाहीत. आणि उघडली तरी त्याचा खर्च काय कमी असतो?”
“किती खर्च होतो?
“महिना सरासरी पाच हजार रुपये आणि आता तर रेट वाढवतीलच. आमचा पगार बावीस हजार रुपये त्यात माझ्या वन रूम–किचन घराचे भाडे सात हजार रुपये.”
 “कित्येक महिला अश्या आहेत की त्यांच्या पतीला कायम स्वरूपी नोकरी नाही. म्हणजे मुलाला सांभाळायचे आणि नोकरीही करायची, कारण नोकरीच्या शोधात पुरुष मंडळी जातात, ती दिवसा घरात नसतातच.”
“पण आई किंवा सासू कोणी बघणार नाही का ?”
“असा सपोर्ट असणाऱ्या फारच कमी – म्हणजे जवळ जवळ नाहीच. आईला इकडे ये म्हणायची सोय नाही कारण आता गावाकडची लोक मुंबई पुण्याला घाबरायला लागली आहेत!“
“अहो, हिला विचारा, तिच्या घरमालकाने तंबी दिली आहे की बाहेरची माणसे घरी आणायची नाहीत – अगदी आई असो नाहीतर सासू – त्यांनाही संसर्गाची भीती वाटते.”
“म्हणजे सपोर्ट संपलाच म्हणायचा.”
“मुलं अडीच-तीन वर्षाची झाली की सतत इकडे तिकडे धावतात. आमच्या पासष्टी-सत्तरीतल्या आईला अशी मुलं सांभाळण तर जमतच नाही.”
“एका मैत्रिणीचा मुलगा अगदी लहान आहे, अजून आईच्या दुधावर आहे आणि घरी नवऱ्याशिवाय कोणीही नाही. त्याचीही नोकरी आहे. त्याला तिथे जायला लागते. तिने कसे कामावर जायचे? कंपनीतला पाळणाघर तर बंदच केला आहे. अशाही अनेक आहेत.”
“हे खरं आहे, आम्ही दिवसातले अकरा तास घराबाहेर असतो. कारखाना दूर आहे आणि जाण्यायेण्यात बराच वेळ जातो. आठ तासांची ड्युटी आमची.”
“कारखाना सध्या एकाच पाळीत चालतो म्हणजे सव्वासहाला घराबाहेर पडाव लागत. पण अकरा तास घराबाहेर असतो.”
“मुलांना सोडून जाता येत नाही म्हणून बिनपगारी रजा होते. बिनपगारी रजा जास्त झाली तर नोकरीवरून काढून टाकतील याची भीती.”
“आम्ही कंपनीला विनंती केली की आम्हाला एक महिना तरी बिनपगारी सुट्टी द्यावी. बिनपगारी जरी दिली तरी प्रॉब्लेम आहेतच, घर कसं चालवायचं? परंतु नोकरी तरी टिकवू असा विचार केला. त्यांनी महिनाभराची बिनपगारी सुट्टी द्यायला स्पष्ट नकार दिला आणि क्रेश (पाळणाघर) देखील बंद राहील असे म्हणाले.”
“क्रेश देखील एक भयंकर प्रकार आहे, पण आम्हाला पर्याय नाही. सातशे स्क्वेअर फुटाच्या जागेत चाळीस ते पंचेचाळीस मुलं असतात. एकाच गादीवर तीन चार मुलं झोपवतात. फक्त चारच मावश्या असतात इतक्या मुलांना संभाळण्यासाठी – त्या तरी कश्या म्यानेज करणार? एकाच ताटातून तीन चार मुलांना भरवले जाते. क्रेश दिली आम्हाला म्हणजे आमच्यावर उपकारच केले अशी भावना आहे.”
“एकीकडे नोकरी टिकवायची तर दुसरीकडे मुलांची आबाळ होऊ द्यायची नाही – म्हणजे स्पष्टच बोलायचे तर ही अक्षरश: कुतरओढ आहे.”   
“त्यातच भर म्हणून कित्येकजणींनी कंपनीतल्या क्रेडीट सोसायटीचं किंवा बँकेचं कर्ज घेतलेय, त्याचाही हफ्ता भरायचा असतो. पगार बावीस हजार, घरभाड सात हजार, कर्जाचा हफ्ता सात हजार.........”
“आणि आता कामावर या नाहीतर नोकरी गमवा” अशी परिस्थिती झालीय.”
“महिला कामगारांचे प्रश्न फार वेगळे असतात आणि त्याला कोणीच वाचा फोडित नाही, काय करायचं आम्ही??
                              *     *     *

हताश होऊन विचारलेला प्रश्न – ‘काय करायचं आम्ही ? तो ऐकणाऱ्यालाही हताशच करतो. करोनाने असे प्रश्न उपस्थित केले आहेत की त्यावर उपाय कोणत्याही कंपनीच्या एच. आर. मॅन्युअलमध्ये नाही. प्रथम पातळीवरच्या एच. आर. मॅनेजर्सच्या आवाक्याबाहेरची ही परिस्थिती आहे. जर जबाबदार अधिकाऱ्यांनी (फक्त कंपनीतलेच नव्हे तर त्यात कामगार मंत्री आणि कामगार आयुक्तदेखील मोडतात) पुढाकार घेऊन, महिला कामगार व त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून तोडगा काढला नाही, तर कित्येक कुटुंबाना – आणि उद्योगात अशी हजारो कुटुंबे असतील – अपरिमित हानी पोहेचेल. ‘काय करायचं त्यांनी?’ ह्या प्रश्नाचं उत्तर शोधले नाही तर महिला कामगारांना त्यांच्या नोकरीला मुकावं लागेल, आणि महिला सक्षमीकरण हे केवळ कागदावरच मिरवत राहील.
केवळ कामगार नेतृत्वाचीच नव्हे, तर व्यवस्थापनातील नेतृत्वाची आणि सरकारचीदेखील ही कसोटी आहे. 

विवेक पटवर्धन             

Wednesday, April 1, 2020

व्हर्जर

(प्रख्यात लेखक सॉमरसेट मॉम यांच्या अनेक कथांतून दहा अप्रतिम कथा निवडायच्या झाल्या तर त्यात ‘व्हर्जर’चा समावेश करावाच लागेल. व्हर्जर म्हणजे बिशपचा वेत्रधारी. तो चर्चची, मुख्यत: आतल्या भागाची देखभाल करतो, चर्चमधल्या ‘सर्व्हिस’साठी अनेक कामे करतो. व्हर्जर कथेचा हा मी केलेला स्वैर अनुवाद. – विवेक पटवर्धन)

नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये नामकरण विधी दुपारीच उरकला होता, तरीही अल्बर्ट एडवर्ड फोरमनने त्याचा व्हर्जरचा पायघोळ अंगरखा उतरवला नव्हता. त्याने त्याचा नवा अंगरखा असा घट्ट घडी करून ठेवला होता की जणू काही तो अल्पाकाच्या उंची लोकरीचा नसून ब्राँझचा आहे असे वाटावे. तो त्याने मोठे विवाह समारंभ व दफन विधींसाठी राखून ठेवला होता. (नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये असे विधी करायची फॅशनच होती.) आज त्याने तसाच दुसरा पायघोळ अंगरखा परिधान केला होता. तो पायघोळ अंगरखा म्हणजे त्याच्या चर्चमधल्या पदाचे चिन्ह होतं. आणि अल्बर्ट तो अभिमानाने मिरवत असे – इतकं की घरी जाताना तो अंगरखा काढून ठेवल्यावर जणू अपुऱ्या कपड्यात असल्याचं त्याला वाटे. अंगरख्याला तो स्वत:च इस्त्री करीत असे. चर्चेमध्ये गेली सोळा वर्षे तो ‘व्हर्जर’ होता, परंतु त्याने त्याचे जुने व जीर्ण अंगरखे कधीही टाकून दिले नाहीत तर ब्राऊन पेपरच्या पिशवीत ते व्यवस्थित घडी करून, त्याच्या कपड्यांच्या कपाटातील तळाच्या खणात नीट ठेवून दिले होते.

अल्बर्टने भराभर कामे उरकली. संगमरवरी फरशीवरल्या कोरीव कामावर लाकडी कव्हर ठेवले, कोणा अपंग स्त्री साठी खुर्ची पुढे आणली होती ती जागेवर ठेवली. वेस्ट्री म्हणजे चर्चमधील अंगरखे ठेवण्याची खोली, ती लहान-सहान कामासाठीही वापरण्यात येते, तिथुन व्हायकार (धर्मगुरू) बाहेर पडला की वेस्ट्रीतली आवरा-आवर करून त्याला घरी जायचे होते.

चर्चच्या मध्यभागी असलेल्या कठड्याजवळ धर्मगुरू गेला, त्याने मधल्या वेदीकडे जाऊन गुढघ्यात झुकून अभिवादन केले, तरीही तो त्याच्या काळा पायघोळ अंगरखा म्हणजे कॅसॉक न काढताच खाली आला होता.

‘ह्याला आता काय हवंय,’ अल्बर्ट मनातच चडफडला. ‘ह्याला समजत नाही का की चहाची वेळ झालीय, आणि आता मला चहा हवा आहे?

धर्मगुरूची नेमणूक नुकतीच झाली होती. चाळीशीतला उत्साही माणूस होता तो. पण अल्बर्टला आधीचा धर्मगुरू तिथे नसल्याची खंत वाटत होती. तो त्याच्या सुरेल आवाजात सर्मन देत असे. चर्चमध्ये येणाऱ्या उच्चपदस्थांसमवेत त्याची उठबस असे. आणि त्याच्या कधीच तक्रारी नव्हत्या. तो प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसणाऱ्या नव्या धर्मगुरूसारखा नव्हता. तसा अल्बर्ट एडवर्ड सोशिक होता. सेंट पीटर्सच्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. आणि नवा धर्मगुरु पूर्वेकडच्या भागातून आला होता, त्यामुळे इथल्या फॅशनेबल लोकांच्या चालीरीतींशी तो सहज जुळवून घेईल अशी अपेक्षा करणेही रास्त नव्हतं.

‘हे सर्व जमेल,’ अल्बर्ट एडवर्ड स्वत:शीच बोलला, ‘जमेल त्याला. थोडा वेळ द्यायला हवा.’

चर्चमधल्या बाकांमधल्या वाटेतून चालत धर्मगुरू अल्बर्टच्या इतक्या जवळ आला की आवाज न चढवतांही, आणि प्रार्थना स्थळात अयोग्य दिसणार नाही अश्या बेताने त्याला अल्बर्टशी त्याला बोलतां येईल.

“फोरमन, वेस्ट्रीमध्ये एक मिनिट याल कां? मला तुमच्याशी कांही बोलायचं आहे.”

“होय, सर”

धर्मगुरू व अल्बर्ट चालू लागले. “नामकरण विधी फार छान झाला, सर. आणि तुम्ही बाळाला उचलून घेताक्षणीच तो रडायचं थांबला. – गंमत वाटली मला.’

“मी बघितलंय की मी उचलून घेतल्यावर अनेकदां बालकं रडणं थांबवतात.” धर्मगुरु हसून म्हणाला. “मी तसं अनेकदां केलंय.”

किरकिरणारी बाळं धर्मगुरू अश्या रीतीने हाती उचलून घ्यायचा की ती रडायची थांबत. हे त्याचा अभिमान बळावणारंच होतं. बाळांच्या माता आणि हॉस्पिटलच्या नर्सेसना धर्मगुरूच्या सफाईचं कौतुक वाटे, आणि त्याला त्याची जाणीव होती. अल्बर्टला पक्कं ठावूक होतं की धर्मगुरूला असं केलेलं कौतुक सुखावून जात असे.

अल्बर्ट धर्मगुरूच्या मागोमाग वेस्ट्रीत शिरला. तिथे दोन चर्चवार्डन होते, त्यांना तिथे बघून अल्बर्टला आश्चर्यच वाटलं; त्यांना आत येताना अल्बर्टने पाहिलं नव्हतं. चर्चवार्डननी मान डोलावूनच अल्बर्टची दखल घेतली.  

“गुड आफ्टरनून, माय लॉर्ड, गुड आफ्टरनून, सर,” त्याने त्या दोघांना अभिवादन केलं.

ते दोघे वयस्कर गृहस्थ होते. जितकी वर्ष अल्बर्ट व्हर्जर म्हणून काम करीत होता, तितकी वर्षे ते ही चर्चवार्डन होते. अनेक वर्षांपूर्वी जुन्या धर्मगुरूने इटलीहून जेवणाचे एक सुंदर टेबल मागविले होते, त्या टेबलाजवळ ते बसले होते. धर्मगुरूने त्या दोघांमधली खुर्ची घेतली. टेबलाच्या एका बाजूस ते पण त्यांच्या समोर अल्बर्ट, दुसर्‍या बाजूस होता. पुढे काय वाढून ठेवलं आहे असा विचार करीत अल्बर्ट  अस्वस्थ झाला होता. मागे एकदा ऑर्गन वाजवणारा गोत्यात आला होता तेव्हां त्यांना त्या प्रकरणावर पडदा टाकताना किती त्रास झाला होता ते अल्बर्टच्या अजूनही स्मरणात होतं. नेव्हिल स्क्वेअरच्या सेंट पीटर्स चर्चेमध्ये एखादी भानगड उपटणं त्यांना परवडणारे नव्हतं. धर्मगुरूच्या लालसर चेहऱ्यावर सौम्य व तरीही कांही निश्चय केल्याचे भाव होते, तर ते दोघे चर्चवार्डन त्रासलेलेच दिसत होते.

‘तो ह्या दोघांच्या मागेच लागला असणार,’ अल्बर्टने विचार केला. ‘त्याने ह्या दोघांना काहीतरी करायला भाग पाडलंय, आणि त्यांना ते जराही आवडत नाही, असं दिसतंय – हे तर नक्कीच.’

पण त्या भावना अल्बर्टच्या चेहऱ्यावर उमटल्या नाहीत. तो त्यांचा मान ठेवून उभा होता, पण त्याच्या देहबोलीत अगतिकता नव्हती. चर्चमध्ये नोकरी मिळण्यापूर्वीही त्याने कामे केली होती पण ती फक्त चांगल्या ठिकाणीच; आणि त्याची वर्तणूक कधीच आक्षेपार्ह नव्हती. साध्या कामावर सुरवात करून त्याने भराभर प्रगती केली; तो एका सरदार घराण्यातील विधवेकडे बटलर होता. नंतर एका निवृत्त राजदूताच्या घरी त्याने बटलरचे काम केले तेव्हां त्याच्या हाताखाली दोघे कामाला होते. हे सर्व सेंट पीटर्समध्ये व्हर्जरचे पद रिक्त होण्यापूर्वी. अल्बर्ट उंचापुरा होता. तो विचारशील होता आणि स्वत:चा आब राखून असे. तो राजबिंडा दिसत नसेलही, पण राजघराण्यातील व्यक्तींची भूमिका करणाऱ्या एखाद्या कसलेल्या नटासारखा दिसत असे हे नक्कीच. तो चतुर आणि निश्चयी होता आणि त्याच्याजवळ आत्मविश्वास होता. त्याच्या चारित्र्याबद्दल तर संशयालाही जागा नव्हती.

धर्मगुरूने लगेच सुरवात केली, म्हणाला, ‘फोरमन, आम्ही जे तुमच्याशी बोलणार आहोत ते कटू आहे. तुम्ही इथे अनेक वर्षं काम करीत आहात. आणि तुम्ही नेमून तुमचं काम इमाने इतबारे व सर्वांची मर्जी राखून केलंय यात शंकाच नाही. इथे बसलेले लॉर्ड व जनरलसाहेब यांचही असंच मत आहे.’

दोन्ही चर्चवार्डननी सहमती दाखवली.

“पण एक विलक्षण गोष्ट मला नुकतीच कळली, आणि ती दोन्ही चर्चवार्डनच्या नजरेस आणून देणं माझं कर्तव्य होतं. मला हे समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला की तुम्हाला लिहिता वाचता येत नाही!”

अल्बर्टच्या चेहऱ्यावर जराही अवघडलेपणा दिसला नाही.

“आपल्या आधी असलेल्या धर्मगुरुंना हे ठाऊक होतं, सर,” अल्बर्ट म्हणाला. “ते म्हणाले होते की त्याने कांहीच फरक पडत नाही. ते नेहमीच म्हणत की जगात शिक्षणाचा फारच बाऊ केला जातोय.

“मी तर हे कांहीतरी विलक्षणच ऐकतोय!” जनरल म्हणाले. “म्हणजे सोळा वर्षे इथे व्हर्जरचे काम करीत आहात, पण लिहा-वाचायला शिकलाच नाही?

“मी बाराव्या वर्षापासून कामाला लागलो. इथे आल्यावर इथल्या कुकने प्रथम मला धडे दिले, पण मला कांही ते जमलेच नाही, आणि मग ते राहूनच गेले ते राहिलेच. मलाही त्याची उणीव भासली नाही. मला वाटतं की हल्लीची बरीचशी तरुण मंडळी वाचन करण्यात वेळेचा अपव्यय करतात त्यापेक्षा कांहीतरी उपयुक्ततेचं काम त्यांनी करायला हवे.”

“पण कधी तुम्हाला बातम्या वाचाव्याश्या वाटल्या नाहीत?” दुसरा चर्चवार्डनने विचारले. “कधी पत्र लिहावेसे वाटले नाही?

“नाही, माय लॉर्ड. माझं त्याशिवायही चांगलं निभावलं. आणि पेपरात येणाऱ्या फोटोवरून काय चाललंय ते बऱ्यापैकी समजतं. माझी पत्नी सुशिक्षित आहे, त्यामुळे मला पत्र लिहायचं असलं तर ती माझ्यासाठी लिहिते.”

दोन्ही चर्चवार्डननी धर्मगुरूकडे चिंतीत नजरेने पाहिलं व खाली मान घालून ते बसले.

“असं पहा, फोरमन, मी ह्या दोघांशी बोललो आहे, आणि ही परिस्थिती अवघडच आहे असं त्यांचंही माझ्यासारखंच मत आहे. नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चसारख्या जागी ज्याला लिहिता-वाचतां येत नाही असा व्हर्जर आम्ही ठेवूंच शकत नाही.”

अल्बर्ट एडवर्ड लालबुंद झाला, त्याची चलबिचल झाली, पण त्याने उत्तर दिले नाही.

“समजून घ्या फोरमन, मला तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाहीये. तुम्ही चांगलं काम करताय आणि मला तुमच्या चारित्र्याबद्दल पूर्ण खात्री आहे. परंतु तुमच्या अज्ञानामुळे न जाणो एखादी दुर्घटना होऊन देणे आमच्यासाठी रास्त होणार नाही. हा केवळ खबरदारीचाच प्रश्न आहे असं नाही, तो तत्वाचाही प्रश्न आहे.”

“पण, तुम्ही शिकू शकणार नाही कां?” जनरलने विचारले.

“नाही सर. आता ते जमण्यासारखं नाही. मी आता पूर्वीसारखा तरुण राहिलो नाही, आणि तेंव्हा मी उत्साही असताना मला ते जमलं नाही, तर आत्ता जमेलसं वाटत नाही.”

“तुमच्याशी कठोरपणे वागायचा इरादा नाहीये, फोरमन,” धर्मगुरू म्हणाले, “पण चर्चवार्डन आणि मी, आम्ही याबाबत ठाम निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला तीन महिन्यांची मुदत देतो – तीन महिन्याअखेर जर तुम्ही लिहू-वाचूं शकला नाहीत तर आमचा नाईलाज होईल, पण तुम्हांला नोकरीवरून जावे लागेल.”

अल्बर्टला नवा धर्मगुरू कधीच आवडला नव्हता. त्याला सेंट पीटर्सला आणण्यात चूक झाली आहे असेच तो म्हणत असे. अल्बर्ट ताठरला. त्याला स्वत:च्या क्षमतांची जाणीव होती, व किंमतही; तो त्यांना स्वत:वर कुरघोडी करून द्यायला तयार नव्हता.

“माफ करा सर, हे जमण्यासारखं नाहीये. मी नवं कांही शिकेन असं माझं वय आता राहिलं नाही. मी इतकी वर्षे लिहिता-वाचतां न येतांही – मला ना स्वत:ची तारीफ करायची ना शिफारस – मला दैवाने ज्या परिस्थितीत ठेवले त्यातही मी माझे कर्तव्य व्यवस्थित पार पाडले आहे. आता माझी शिकायची तयारी नाही.”

“असं असेल तर, फोरमन, तुम्हाला जावं लागेल.”

“होय सर, ते समजलंय मला. तुम्ही माझ्या जागेसाठी दुसरा कोणी निवडलात की मी राजीनामा देऊन निघून जाईन.”

अल्बर्टने धर्मगुरू व चर्चवार्डन बसले होते तिथला चर्चचा दरवाजा त्याच्या संवयीच्या विनम्रतेने लावून घेतला, आणि मग त्याला संयम राखता आला नाही. आतापर्यंत त्याने धीराने वार झेलला होता. पण आता तो पवित्रा राहिला नाही. त्याचे ओठ कांपू लागले, तो वेस्ट्रीकडे पुन्हा गेला, आणि नेमलेल्या खुंटीवर त्याने त्याचा अंगरखा टांगला. त्याला दिमाखाने झालेले लग्नसमारंभ आठवले, तश्याच मोठ्या अन्त्ययात्राही. त्याने एक उसासा टाकला, आवरा-आवर केली आणि चर्चचा दरवाजा बंद केला. तो चालत चौकात आला. त्याच्या दु:खात आणि विचारात तो गढून गेला होता. आणि चौकात आल्यावर घरी जाण्यासाठी (घरी गरमागरम कडक चहा त्याची वाट पाहत होता) जिथे वळायला हवे होते तिथे तो वळला नाही, त्याने चुकीचे वळण घेतले. तो शांतपणे चालत होता, त्याला भरून आले होते. आता काय करायचे हा प्रश्नच होता, कांहीच कल्पना नव्हती. इतकी वर्षे त्याने स्वतंत्रपणे काम केले होते, आता पुन्हा लोकांच्या घरी कामासाठी जाण्याचा त्याचा इरादा नव्हता. धर्मगुरू व चर्चवार्डन कांहीही म्हणोत, परंतु त्याने चर्चचा कारभार व्यवस्थितपणे चालवला होता आणि आता मानहानीकारक परिस्थितीला शरण जाणं त्याला मंजूर नव्हतं. त्याने बऱ्यापैकी पैसा गांठीस बांधला होता, तरीही केवळ तेवढ्यावर कांही न करतां उर्वरित आयुष्य काढणं शक्यच नव्हतं, आणि खर्चही वर्षागणिक वाढत होता. असे जगण्याचे प्रश्न आत्तापर्यंत त्याच्या मनाला कधी शिवलेही नव्हते. सेंट पीटर्सचा व्हर्जर, रोममधल्या पोपप्रमाणेच, जिवात जीव असेपर्यंत, चर्चचेच होते. अल्बर्ट एक दिवास्वप्न पाहत असे: तो जग सोडून गेल्यावर रविवारच्या सायंप्रार्थनेत धर्मगुरू अल्बर्ट एडवर्ड फोरमनच्या इमानदारीने केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल तसेच त्याच्या आदर्शवत् चारित्र्याबद्दल बोलतोय. त्याने उसासा टाकला. अल्बर्ट दारू पीत नसे, आणि धूम्रपानही करीत नसे – पण त्याला छोटे अपवाद होते. रात्रीच्या जेवणाबरोबर त्याला एक बियरचा ग्लास घ्यायला आवडत असे, आणि कधी थकून-भागून आल्यावर एखादी सिगारेटही. पण आज त्याच्या खिशात आज सिगारेट नव्हती. सिगारेट जरा ताण हलका करेल असं वाटून गोल्ड फ्लेकचं पाकीट घेण्यासाठी तो दुकान शोधत राहिला. त्याला एकही दुकान दिसलं नाही. तो थोडं अंतर पुढं गेला. तसा तो रस्ता बराच मोठा होता, - तिथे अनेक प्रकारची दुकाने होती, पण एकही दुकान असे नव्हते जिथे सिगारेट मिळावी.

“गंमतच आहे” अल्बर्टला वाटलं.

खात्री करून घेण्यासाठी त्याने पुन्हा एकदा रस्ता वर-खाली धुंडाळला. एकही सिगारेटचे दुकान त्या रस्त्यावर नव्हते यात शंकाच उरली नाही. तो थांबला आणि विचार करू लागला.

“या रस्त्यावर चालताना सिगारेट ओढावीशी वाटणारा कांही मी एकटाच असुं शकत नाही.” तो विचार करीत होता. “इथे छोटेसे सिगारेट-चॉकलेटचे दुकान कसे चालेल …. चांगलेच चालेल बहुधा.”

आणि तो निघाला. “मस्त कल्पना आहे,” तो स्वत:शीच पुटपुटला. “किती अनपेक्षितपणे कल्पना सुचतात – आश्चर्यच म्हणायचे.”

तो घराकडे वळला. तिथे त्याच्यासाठी चहा तयार होता.

“आज तुम्ही अगदी गप्प कसे?” त्याची पत्नी म्हणाली.

“मी विचार करतोय”

त्याने त्या कल्पनेचा सर्वंकष विचार केला. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा त्या रस्त्यावर गेला, आणि त्याचं नशीब असं की त्याला जसं हवं होतं तसंच एक छोटं दुकान भाड्याने देणं होतं. दुसर्‍या दिवसाअखेर ते घेतलंही. नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्सला रामराम ठोकल्यापासून महिन्याभरातच अल्बर्ट एडवर्डने सिगारेट, चॉकलेट-टॉफी व वर्तमानपत्रे-मासिके विकायचा व्यवसाय उभा केला. त्याची पत्नी म्हणाली की चर्चेच्या व्हर्जर पदानंतर असा व्यवसाय करणं म्हणजे अगदी खालच्या पातळीवर घसरणं आहे; पण अल्बर्ट उत्तरला की चर्च आता पूर्वीसारखं राहिलं नाही.

अल्बर्टला व्यवसायात चांगलंच यश मिळालं. वर्षभरात त्याचा व्यवसाय इतका फळफळला की दुसरं दुकान घेऊन त्यात मॅनेजर नेमावा असं त्याला वाटू लागलं. मग त्याने अजून एक रस्ता शोधला ज्याच्यावर सिगारेट-चॉकलेटचं दुकान नव्हतं. तिथेही त्याने एक दुकान भाड्याने मिळवलं. हे दुसरं दुकानही चांगलं चालू लागलं. त्याच्या ध्यानी आलं की जर तो दोन दुकानं चांगली चालवू शकतो, तर त्याला अर्धा डझन दुकानेही अशीच चालवता येतील. मग त्याने लंडनमधले असे रस्ते शोधले जिथे दूरवर सिगारेट-चॉकलेटचं दुकान नव्हतं. तिथे त्याने दुकाने भाड्याने घेतली आणि चांगलाच जम बसवला. बघता बघता दहा वर्षात त्याची दहा दुकाने झाली. तो दर सोमवारी प्रत्येक दुकानात जाई व मागील आठवड्याची कमाई बॅंकेत भरत असे.

एके दिवशी नोटांचा जुडगा आणि नाण्यांची जड थैली घेऊन तो बॅंकेत भरायला गेला तेव्हां कॅशियरने सांगितले की मॅनेजर त्याला भेटू इच्छितात. मॅनेजरच्या ऑफिसमध्ये त्याला कोणीतरी नेलं आणि मॅनेजरने त्याचे स्वागत केले.

“मिस्टर फोरमन, आमच्या बॅंकेत तुमची जी जमा आहे त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला कल्पना आहे काय की किती रक्कम तुमच्या अकौंटमध्ये आहे?”

“अगदी अचूक नाही सांगू शकणार पण दोन चार पौंडांच्या फरकाने मी सांगू शकतो. मला स्पष्ट कल्पना आहे की बॅंकेत माझे किती पैसे जमा आहेत.”

“आज तुम्ही ठेवलेली रक्कम वगळता, तीस हजार पौंडाहूनही थोडे अधिकच आहेत. ही घसघशीत मोठी रक्कम आहे. मला वाटतं तुम्ही नीट गुंतवणूक करावीत.”

“मला कुठचाही धोका पत्करायचा नाहीये. आणि मला ठाऊक आहे की माझे पैसे तुमच्या बॅंकेत सुरक्षित आहेत.”

“त्याबद्दल अजिबात काळजी नको. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सिक्युरिटीजची यादी देऊ. त्यात गुंतवणूक केली म्हणजे तुम्हाला उत्तम दराने व्याज मिळेल.”

अल्बर्ट एडवर्ड फोरमनच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. “मी स्टॉक्स व शेअर्सपासून कटाक्षाने दूर राहिलो आहे. मला ते सर्व तुमच्यावर सोपवावं लागेल.”

“आम्ही सर्वकांही करुं. पुढच्या वेळी तुम्ही इथे याल तेव्हां फक्त एकच करायचं – ते म्हणजे गुंतवणुकीसाठी पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी सह्या.”

“मी ते करीनही” अल्बर्ट चाचरत बोलला. “पण मी कशावर सह्या करतोय ते मला कसं समजणार?

“तुम्हाला वाचतां तर येतंय ना?” मॅनेजर जरा तिखटपणेच बोलला.

फोरमन त्याच्याकडे बघून हसला. “सर, तीच तर गोम आहे. मला नाही वाचतां येत, हे विचित्र वाटेल तुम्हाला, पण वस्तुस्थिती आहे. मी लिहू-वाचूं शकत नाही. फक्त माझं नांव लिहू शकतो आणि ते देखील मी या व्यवसायात आल्यापासून.”

मॅनेजर तर उडालाच, तो उठून उभा राहिला.

"अत्यंत विलक्षण! याहून अधिक विलक्षण मी कधीच कांही ऐकलं नाहीये."

"ते असं आहे सर, मला शिकायची संधी मिळाली तेव्हां फार उशीर झाला होता, आणि त्यानंतर मी शिकायला नकार दिला - मी त्याबाबत कांहीसा आडमुठेपणा केला म्हणाना."

“आणि तुम्ही मला सांगताय की तुम्ही हा मोठ्ठा व्यवसाय उभा केलात, तीस हजार पौंडांची माया जमवलीत ती एक अक्षरही न लिहिता-वाचतां? अरे देवा! अहो, तुम्हाला लिहिता-वाचतां येत असतं तर आज तुम्ही कोण असतांत?”

“हां, ते मी तुम्हाला सांगू शकतो, सर” फोरमनच्या अमिरी चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. “मी नेव्हिल स्क्वेअरच्या सेंट पीटर्स चर्चचा व्हर्जर असतो!”

                        *     *     *     *

विवेक पटवर्धन 

Wednesday, March 4, 2020

आरोहन आणि आदिवासींच्या जटील समस्या


आरोहनच्या कामाची माहिती करून घेणे ओघानेच आले, कारण आरोहनने विश्वस्त म्हणून त्यांच्या समितीत मला सामावून घेतले. जव्हार-मोखाडा हे आरोहनचे कार्यक्षेत्र. जव्हारला जायचं म्हणजे मनोरपुढे उजवीकडे निघणारा विक्रमगडचा रस्ता धरायचा. तिथून पुढे जव्हार. अंतर तसं फार नाहीये, पण रस्ता इतका खड्डेवाला की आपला उत्साह निम्माशिम्मा व्हावा. किंवा आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय त्याची जाणीव करून देणारा. कारण खड्ड्यांनी बसणारे धक्के सौम्य म्हणावेत असे धक्के खेड्यातील परिस्थिती पाहता बसतात.

जव्हारला आरोहनचे कार्यालय आहे तिथलं काम उरकून धारेच्या पाड्याकडे निघालो. तुम्ही जर ‘धारेचा पाडा’ असा गुगलवर शोध घेतलात तर तुम्हाला काहीही माहिती मिळणार नाही. धारेचा पाडा साखरी ग्राम पंचायतीत मोडतो. इथली वस्ती तर आदिवासींचीच आणि ती ही अगदी थोडी. कोणी तरी म्हणाले की हजारहून अधिक नाहीये. मला तर वाटलं की तेव्हढीही नसावी.

“तिची स्कूटर दिसत्ये म्हणजे रेश्मा पोचली आहे; इथेच ‘माता-बैठक’ आहे.” माधुरी म्हणाली. गाडी थांबली. समोरच एक छोटं आणि बैठं घर होतं, आत गेल्यावर ध्यानात आलं की ते एक छोटं सभागृह होतं. म्हणजे एक खोलीच. केवळ ह्याच कारणासाठी बांधलेली! साधारण १८ बाय १८ ची. आत ‘माता-बैठक’ चालली होती. रेश्मा वीस-पंचवीस आदिवासी महिलांना माहिती देत होती. काही महिला त्यांची मुले घेऊन आल्या होत्या. मी, माधुरी व डॉ. शुभा त्यांच्यात सामील झालो. माधुरी विविध प्रोजेक्टवर देखरेख करते तर डॉ शुभा म्हणजे आरोहनच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर.

मोखाड्यात १६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यु झाल्याची बातमी २००६ साली आली तेव्हा अंजली कानिटकर व डॉ हेलन जोसेफ यांनी त्वरित ‘आरोहन’ची स्थापना केली ती जव्हार मोखाड्यात आदिवासींच्या पाड्यात जाऊन त्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करायच्या उद्देशाने. (अनेक प्रश्नांचे पदर एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केवळ ‘स्वास्थ्य’ किंवा ‘आरोग्य’ अश्या एकाच प्रश्नावर काम करून भागणार नव्हते, तर सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित करावे लागणार होते, त्यामुळे कामाची दिशा नंतर बदलण्यात आली.)

“हे माता-बाल सुरक्षा कार्ड. नोंदणी झाल्यावर लगेच मिळते. ही तर गरोदरपणाची कुंडलीच आहे!” रेश्मा माता-बैठकीतल्या स्त्रियांना सांगत होती. “नोंदणीपासून डिलिवरी व लसीकरणापर्यंत सर्व माहिती त्यात असते.”



“हे तीन रंग बघा, हिरवा, पिवळा आणि लाल. काय वाटतं तुम्हाला? तुमचं बाळ ह्यापैकी कुठल्या रंगात असलं पाहिजे?

“हिरव्या”

“फार छान. आपलं बाळ हिरव्या रंगात येण्यासाठी काय करावं लागेल?” रेश्माने रोख आता आहाराकडे वळवला. सुदृढ बालकाला आहार ‘तिरंगा – लाल रंगाचे टोमाटो, गाजर, पांढऱ्या रंगाचे दुध, भात, अंडी व हिरव्या भाज्या – असा तिरंगा आहार कसा द्यावा ते रेश्मा सांगू लागली.तिरंगा आहार घ्यायला तुम्हाला लांब जायची जरूर नाही, हे सर्व घटक तुमच्या आजूबाजूला आहेतच.”

“इथे अजूनही अनेक बालकं अंडर-वेट असतात.” शुभा मला म्हणाली. “प्रश्न केवळ आहाराचाच नाही तर चुकीच्या समजुतींचा देखील आहे. आदिवासी समाजात अनेकदा गरोदर स्त्रिया पेज पिऊन राहतात. मग त्या ‘अॅनिमिक’ होतात. कसे आरोग्य राहिल त्यांचे; कशी वाढ होईल बाळाची?


तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर टाटा सामाजिक संशोधन संस्थेतील दोघांचा एक अभ्यासपूर्ण लेख सापडेल. ‘२००५ मध्ये केवळ पालघर जिल्ह्यातच ७१८ बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे झाला. २०१६ मध्ये ६०० पेक्षा अधिक मुले दगावली.’ त्या दोघा संशोधकांनी ३७५ मुलांचा अभ्यास केला. त्यात ५९% मुलांची वाढ खुंटली असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले.[1]

“इथे मुलींचे शिक्षण फार होत नाही. सातवीनंतर अनेकदा शिक्षण थांबतेच. मुलगी पंधरा सोळा वर्षांची झाली की तिचे लग्न होते. मग ती गरोदर राहते. हे सर्व मोठेच प्रश्न आहेत.”

“काल-परवांच पेपरात वाचलं की चौदा-पंधरा वर्षांची मुलगी आश्रम शाळेत गरोदर राहिली.”

“आश्रम-शाळेत मुले मुली एकत्र शिकतात, आणि तिथेच राहतात. तिथे मुलीने गरोदर होणे हे काही आश्चर्यकारक नाही. अनेकदा अश्या मुलींची लगेच लग्ने लावून दिली जातात. त्यांच्या समाजात तो फार मोठा विधी नसतो. मुलगी एक दिवशी मुलाच्या घरी जाते, बस्स!”

“इथे माता-बैठकीत ती मुलगी बघा. तिच्या हातात बाळ आहे. ती आई तर सोळा वर्षांची असेल-नसेल.”

“त्यांचंही कुपोषण होतं. अनेकदा अश्या मुली आपलं वय अठरा सांगतात. तरीही असं वाटतं की त्या लहान आहेत. लहान वयात माता होण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. केवळ सामाजिकच नव्हे तर शारीरिक देखील.”


रेश्मा महिलांशी त्यांच्या समस्यांबद्दल बोलू लागली. चतुराईने तिने चर्चा ग्रामसभेकडे वळवली आणि ‘महिला ग्रामसभेचे’ आयोजन करण्याचे महत्त्व पटवून दिले. पण मोठ्ठा अडसर तर महिलांनी आपल्या प्रश्नाबाबत बोलू लागण्याचा होता. रेश्मा महिलांचं मन वळविण्यात कांही प्रमाणात तरी यशस्वी ठरली, त्या बोलू लागल्या पाण्याच्या प्रश्नावर! “असे प्रश्न सोडवायलाच ग्रामसभा व पुढे ग्राम-पंचायत असते.”

महिलांनी सभेत बोलणे हा एक त्यांच्या मनातला मोठ्ठा अडसर आहे. तो पार करणे सोपे नक्कीच नाही.

आता रेश्माने चर्चेचा रोख स्थलांतराच्या समस्येकडे वळवला. आदिवासींच्या पाड्यात स्थलांतर ही एक प्रचंड मोठी समस्या आहे. केवळ शेतीवर जगता येत नाही, मग एक पीक काढले की शहराच्या दिशेने कूच!

“स्थलांतर अनेक रीतीने आयुष्य कुरतडते. कित्येक जण आपल्या वृद्ध माता-पित्यांना मागे सोडून जातात. मुलांच्या शिक्षणावर पाणी सोडावे लागते, आणि आरोग्याची आबाळ होते. संपूर्ण खेड्याच्या ‘इकोनोमीवरच अपरिमित दुष्परिणाम होतोय.”

“आरोहनने शेतकऱ्यांना दुसरे पीक कसे घेण्यासाठी मार्ग दाखवले आहेत, मदत केली आहे. आज कित्येक शेतकरी तसे दुसरे पीक काढत आहेत.”

“काही विशिष्ट भागातील स्थलांतर पन्नास टक्के कमी करण्याचा मनसुबा आरोहनने ठेवला आहे, आणि ते देखील एक आवाक्याबाहेरचं उद्दिष्ट वाटतंय, यावरूनच कल्पना करा.”

मला आठवलं, रोटरीतर्फे आम्ही भिवंडीजवळ एक बंधारा बांधत होतो. मी बांधकाम चालू असताना तिथे गेलो तेव्हा तीन फुटाच्या काठ्या उभ्या करून कित्येक मजुरांनी संसार मांडला होता. “ते शेतीची कामं संपली की इथे कामासाठी येतात. होळीला परत आपल्या गांवी जातात,” बांधकाम कंत्राटदार मला सांगत होता. परतीच्या वाटेवर मी एका झाडाखाली स्थलांतरित कुटुंबाने थाटलेला संसार बघितला.



मी चालत्या गाडीतूनच फोटो काढला. माझ्यासारख्या शहरी वास्तव्य करणाऱ्यांना स्थलांतराचा प्रश्न किती मोठ्ठा आहे हे समजायला प्रत्यक्ष भिवंडी, मोखाडा अश्या भागात फिरायला हवे, आकडेवारी प्रश्नांची माहिती देते, पण त्याबाबत जाणीवा वाढवत नाही.

अत्यंत अस्वस्थ करणारी आणि गुंतागुंतीची परिस्थिती मी पहिली, आणि ती  आपल्या समोर ठेवली आहे. कितीही काम केलं तरीही अपुरेच पडणार आहे. तरीही एकत्र येऊन ठोस पावलं उचलावीच लागतील. ते अपरिहार्यच आहे.

सरकार ही जगातली सर्वात अकार्यक्षम संस्था आहे यात वादच नाही. मग ते कोणत्याही पार्टीचे असो. अनेक कार्यक्रम पेपरवर आहेत, पण लाभार्थी त्यापासून वंचित आहेत हेच कटू सत्य आहे. आरोहनसारख्या संस्था कार्यरत आहेत हा दिलासा असला तरीही मुंबईपासून केवळ दीडशे किमीवर इतकी भयाण परिस्थिती असावी हा नेत्यांनी, व्यक्तींनी आणि समाजानेही कूपमंडूक वृत्ती ठेवल्याचा आणि आत्मकेंद्रित असल्याचा परिणाम आहे यात शंकाच नाही.

विवेक पटवर्धन



[1] https://journals.plos.org/plosone/article/file?id=10.1371/journal.pone.0212560&type=printable