Monday, November 11, 2019

त्याची आणि अनेकांची ही गोष्ट


तो चौकात पानवाल्याच्या दुकानाजवळ उभा होता. सकाळची वेळ. रोजन्दारीवरचे कामगार तिथे उभे असतात, काम मिळण्यासाठी. बहुतेकांना नाहीच मिळत काम. मंदीचे दिवस आहेत. अनेक कारखान्यातल्या कामगारांना कामावरून कमी करण्यात आलंय. माझी आणि त्याची ओळख एका युनियनच्या कार्यकर्त्यामुळे झाली होती. ओळख तशी जुजबीच, पण युनियनमुळे झाली असल्याने, त्यात फारसा औपचारिकपणा नव्हता. मी त्याला ओळखलंय हे त्याच्या ध्यानात आल्यावर तो पुढे आला. वेल्डिंगचं काम करून त्याचे हात काळे आणि राकट झाले असावेत. तो सडसडित बांध्याचा आणि उंच होता. केस अजूनही काळेच होते, पण चाळीशीचं वय चेहऱ्यावर दिसत होतं. त्याच्या उंचीमुळे तो सहज उठून दिसत होता.

“घरी चला ना” माझ्याकडे भरपूर वेळ होता, मी उगाच आढेवेढे घेतले नाही. आम्ही दोघे निघालो. त्याला आज काम मिळाले नाही हे तर स्पष्टच होतं. त्याबद्दल कशाला बोला असा मी विचार करतोय तो तोच म्हणाला, “आज नाही काही जमलं.” मी त्याच्याकडे बघायचं टाळलं.

तो रेल्वेजवळच्या झोपडपट्टीत रहात होता. घरं अतिशय जवळजवळ बांधलेली. काही बायका घराबाहेरच कपडे-भांडी धूत होत्या. घरांची उंची आठ फूट, कदाचित दहा फूट. काहींनी त्यावर एक मजलाही चढवलेला. त्या चाळींच्या रांगांमधून वात काढत आम्ही दोघे निघालो. त्याचे घर इतरांपेक्षा वेगळे नव्हते. दाराला निळा फुलाफुलांचा पडदा लावलेला. तो आत गेला, मी बाहेरच थांबलो. “या ना घरात. या की.”

मी आत गेलो. “साहेब आलेत.” तो म्हणाला.

ती हसली, “बसा ना.” बसायला तर खुर्ची नव्हती, तसा प्रश्नच नव्हता. खोली दहा बाय दहाची असेल. एकाच खोलीत संसार होता. एका भिंतीला लागून छोटसं टेबल होतं. तोच ओटा म्हणायचा. त्यावर गॅसची शेगडी होती. त्यामागची भिंत काळवंडली होती.

“चहा करू?” तिने त्याला विचारलं, आणि बाहेरून काही घेऊन येण्यासाठी खुणावलं. कदाचित बिस्कीट पुडा आणायला सांगायचं असेल, मला उगाचच दूध नसावं असं वाटलं.  “नको चहा, मी तर ब्लॅक टी घेतो. दूध नको.” तिनेही चहाचा फार आग्रह केला नाही. त्याच्या चेहऱ्यावर भाव सहज दिसत नव्हते, पण तिचा चेहरा बोलका होता. लगबगीनं तिने ओट्यावरची भांडी आवरली.

फारशी ओळख नसलेल्यांकडे मी जातो तेव्हां मला फारच अवघडल्यासारखं होतं. त्यातही इथे माझी ओळख ‘साहेब अशी! मी काही लिहायच्या निमित्ताने त्याला भेटलो होतो. आपल्यापेक्षा अधिक शिकलेला, चार पैसे जास्त असलेला म्हणजे साहेब असं अनेक समजतात, किंवा तसे म्हणतात.

“कितवीत आहे?” मी भिंतीवरल्या फोटोकडे बघून बोललो. आठ-दहा वर्षांचा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये अध्यक्षांकडून कप स्वीकारतो आहे असा फोटो टांगला होता. “चौथीत असतानाचा फोटो आहे. आता सातवीत आहे.” तो म्हणाला. त्याचे डोळे चमकले. तिने मागे वळून बघितले, आणि तीही हसली. “विक्रांत. आमचा मुलगा. धावण्याच्या शर्यतीत पहिला आला होता.”

“हुशार दिसतोय”

“वरचा नंबर असतो वर्गात.” तिने कुणाला तरी हाक मारली आणि बाहेर जाऊन ती लगेच आत आलीही.

“कशाला त्याला बोलावता? खेळू दे की त्याला”

“साहेब, मला इथल्या मुलांची संगत त्याला लागू नये असं वाटतं. पण ते कसं टाळणार? इथली मुलं शिकत नाहीत. आणि आता शिक्षण नसलं तर पुढे काय होणार?

माझं मन थोडं मागे गेलं. लंडनमध्ये असताना मला एक युरोपिअन भेटला होता. भारतीयांना थोडा कमी पगार दिला तरी चालतो, पण त्यांची मुले जर चांगल्या शाळेत जाऊ शकली तर ते खुश असतात, तो म्हणाला होता.  

“इथेच म्युनसिपालटीच्या शाळेत जातो.”

“पगार फारच कमी पडतो, साहेब. आता तर ह्यांना ब्रेक मिळालाय. कंपनीवाले कधी पुन्हा बोलावतात ते माहित नाही.”

मला वाटलं होतं की ‘बोलावतील ग. सगळं ठीक होईल’ असं काही तो म्हणेल. पण तो काहीच बोलला नाही.

“मी घर सांभाळून नोकरी करते. मागच्या बाजूला कारखाने आहेत. तिथे जाते. पण ह्यांना नाही आवडत.”

“ती बारावी पर्यंत शिकली आहे. तिने झाडू मारण्याचं, हौसकीपिंगचं काम कशाला करावं?” तो माझ्याकडे बघत बोलला. मी मान डोलावली.

“दुसरं काही काम मिळत नाही. काय करायचं? इथे शिकवण्या कराव्यात तर इथली मुलं शिकत नाहीत. आणि पैसे द्यायची ऐपत कुणाला आहे?

“मी तिला म्हणतो की तू आपल्या मुलाकडे बघ. पण टेम्पररी नोकरी असल्यावर काय करायचं?” तो खाली मान घालून बसला. “माझा मुलगा मोठा होईल, नाव काढेल तरच यातून आम्ही सुटू.”

तिने त्याच्याकडे एक नजर टाकली. तिला त्याचं म्हणणं पटलं असं दिसलं नाही. थंड सुरात ती म्हणाली, “मी सांगते तुम्हाला, जग बदललंय. आता मुलं मोठी झाली, लग्न झाल्यावर वेगळी होतात. त्यांचं जग वेगळं असतं. आपल्याला सांभाळतील असं काही नाही. आजूबाजूला काय घडतंय ते बघा की.”

“तो नाही तसा. मला ठाऊक आहे. हुशार आहे. पुढे येईल नक्की.”

तिच्या चेहऱ्यावर ‘आत्ता ह्यांना काय म्हणू असे भाव आले. “तुम्ही इतके हळवे आहात, मला तर काळजीच वाटते.” मग माझ्याकडे बघून म्हणाली, “कधीतरी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतात. मी मरमर मरून सहा हजार रुपये जमवले तर ते ह्यांनी मला न विचारता काकीला दिले.”

“ती आजारी होती.”

तिने साफ दुर्लक्ष केलं. “आता तो पुढच्या वर्षी आठवीत जाईल. त्याला क्लास लावायचा तर पैसे पाहिजेत ना? ह्यांनी तर काकीला देऊन टाकले.”

“अग, मी लहान असताना तिनेच मला वाढवलं मग तिच्या आजारपणात मी मदत करायला नको का?

पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत अजिबात नव्हती. “मी इतकी चिडले. दहा दिवस ह्यांच्याशी बोलतच नव्हते. काकीची मुलं तिच्याकडे बघत नाहीत. तुम्ही कशाला पैसे खर्च करायला हवेत?” तिने आमच्याकडे पाठ फिरवली आणि पदराने डोळे पुसले. “माझं नशीब इतकंच की हे पीत नाहीत. नाहीतर जिणं नकोसं झालं असतं.”

“लग्नापूर्वी कधीतरी घेत होतो. पण ही आल्यापासून एकदम बंद” त्याने तिला खुलवायचा प्रयत्न केला. “मुलगा झाला आणि वाटलं की दोन जीव आपल्या भरोश्यावर आहेत. जबाबदारी वाटली.”

तिने काहीच उत्तर दिलं नाही. पडदा बाजूला करून तिने बाहेर डोकावून बघितलं. कोणीतरी तिच्या हातात बिस्किटाचा पुडा दिला. तिने चार बिस्किटे आमच्यासाठी बशीत ठेवली.

“घ्या की. आमचा पाहुणचार. गोड मानून घ्या.”

“गाव कुठलं?

“चाळीस वर्षांपूर्वी वडील इथे आले सोलापूरहून. दुष्काळी भाग आमचा. त्यांनी मोलमजुरी करून दिवस काढले. मी वेल्डर झालो तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. तुला आज न उद्या चांगली नोकरी भेटेल, बरे दिवस येतील म्हणत. मुलगा झाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. हा मोठा होईल तेव्हा नाव काढील म्हणायचे. त्यांचे मित्र म्हणायचे की म्हाताऱ्याचे बोल खरे होतात. एक दोघांना तसा अनुभव आला म्हणतात.”

“त्याच्या बाबतीत तरी खरे होऊ देत त्यांचे बोल. तुमच्या बाबतीत कुठे काय झालं?

तिच्या फणकारण्याने तो चिडलाच. त्याला ते चांगलंच झोंबलं असावं. तो काहीच बोलला नाही. बिस्किटाचा एक तुकडा त्याने तोंडात टाकला आणि तो खाली मान घालून सतरंजीवरच्या चुण्या निस्तरत राहिला.

“आता तर तुमच्या कंपनीतल्या अनेकांच्या नोकर्‍या गेल्यात. मला तर कित्येक दिवस झाले, झोप येत नाही. थकून जातो जीव विचार करीत करीत.”

मलाही काय बोलायचं ते कळेना. “होईल. सर्व काही चांगलं होईल.” पण माझ्या बोलण्याने त्यांना दिलासा मिळेल असं मला अजिबात वाटलं नाही.

तो माझ्याकडे बघून हसला. “कारखान्यात शंभर कामगार पर्मनंट आहेत. बाराशे कंत्राटी. काय करणार?

पुन्हा शांतता. “त्याला शाळा संपल्यावर काम करायलाच लागेल. दुसरा मार्गच नाही.”

“पैसे हातात आल्यावर शिक्षण संपतं.” ती म्हणाली. “मी अशी कित्येक बघितली आहेत.”

“काय करायचं? आशा ठेवून जगायचं की नाही? का कुढत मरायचं? तो आज चांगला शिकतोय. होईल मोठा आज ना उद्या. कमावेल चार पैसे.”

आम्ही उठलो. ती पुन्हा आमच्याकडे बघून हसली. “या परत.” तो निळा पडदा बाजूला करून आम्ही बाहेर पडलो. तो माझ्याबरोबर चालत होता. हमरस्त्यापर्यंत येतो म्हणाला.

“तिला फार काळजी वाटते. आमचा भरोसा मुलावर आहे. तेवढी एकच आशा आहे.”

रिक्षा स्टँडजवळ एका दुकानात मी चार चॉकलेट बार विकत घेतले. त्याच्या हातावर ठेवले. रिक्षात बसताना “हे तुमच्या मुलासाठी,” म्हणालो. “ओळख ठेवा” तो म्हणाला. मी त्याला विसरणे शक्यच नाही, पण ओळख ठेवून तरी माझ्या हातून काय होणार होते? व्यवस्थेचा विळखा अजगरासारखा त्याच्याभोवती पडला होता. मी तो सोडवू शकत नव्हतो, तो त्यातून सुटू शकत नव्हता.

विवेक पटवर्धन

Saturday, July 6, 2019

बीपीसीएलच्या कंत्राटी कामगारांचं जग


फेसबुकवरची बातमी बघून मी डॉ. विवेक मॉंटेरोंना संपर्क साधला - आणि त्याचं कारणही तसंच होतं. सफाई व व माळी काम करणाऱ्या कामगारांना बीपीसीएलने कामावरून कमी केलं होतं.
डॉ विवेक मॉंटेरो हे एक नावाजलेले कामगार नेते आहेत. आणि विचारवंत देखील. विनम्र स्वभावाचे व मृदुभाषी मॉंटेरो उच्चशिक्षित आहेत. त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदव्युत्तर अभ्यासक्रम केला आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मधून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी स्वतःला कामगार चळवळीसाठी व सायन्स शिकवण्यासाठी वाहून घेतलं आहे.
मी मॉंटेरोना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो. मग आम्ही एकत्रच बीपीसीएलच्या स्टाफ कॉलनीकडे जायला निघालो. त्या कॉलनी जवळच टाटा पॉवरची कॉलनी आहे -  मी शाळा कॉलेजात शिकत असताना 13 वर्ष तिथे रहात होतो त्यामुळे तो विभाग मला चांगला ठाऊक होता. पण पन्नास वर्षांपूर्वी मी टाटा कॉलनी सोडून कल्याणला गेलो होतो आणि इतक्या मोठ्या कालावधीत वाशी नाका परिसरात - जिथे बीपीसीएल स्टाफ कॉलनीचे प्रवेश द्वार आहे - इतके बदल झाले आहेत की हा परिसर ओळखणं माझ्यासाठी अशक्यच झालं. इस्टर्न फ्रीवेचा उड्डाणपूल वाशीनाक्याजवळ माहुलच्या रस्त्यावरून जातो आणि त्या उड्डाणपुलावरून मेट्रोचा पुल जिथे जातो तिथे बीपीसीएलच्या स्टाफ कॉलनीच प्रवेशद्वार आहे. आजूबाजूला झोपड्या आहेत - त्यात नोकरीची शाश्वती नसलेले हजारो लोक राहतात.

प्रवेशद्वाराच्या एका बाजूला वडा-पावची टपरी आहे तर दुसऱ्या बाजूला पोलिस चौकी आहे. मी नेहमीच कुलुप लावलेली ही पोलीस चौकी पाहत आलो आहे.
डॉ. मॉंटेरो व मी तिथे पोहोचलो. दहा स्त्रिया व दोन तीन पुरुष कामगार आमची वाट पहात होते. आम्ही गाडीतून उतरताच त्यांनी जणू वेढाच घातला. सफाई व माळी काम करणारे हेच ते कर्मचारी ज्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. एकूण चाळीस कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या.
“आम्ही कामावर होतो, त्यांनी आम्हाला दुपारी बोलावले आणि म्हणाले की तुमच्या नोकऱ्या समाप्त करण्यात आल्या आहेत. आम्हाला बाहेर काढले. आता आम्ही कॉलनीत कामासाठी जाऊ शकत नाही, पण त्यांनी दीडशे नव्या कामगारांची भरती केली आहे.” काहीजण तोपर्यंत गेटवर गेले आणि त्यांनी आत कॉलनीच्या रस्त्याकडे पाहिले. गेट जवळच्या चौकीतून वॉचमन बाहेर आला आणि त्याने आम्हा सर्वांकडे नीट निरखून पाहिले. एका डोळ्यात फूल पडलेली अशी वृद्ध बाई आमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करू लागली पण ती जे बोलत होती ते मला कळत नव्हते.
“ही कांताबाई आहे. तिला कोणाचाच आधार नाहीये. नोकरी गमावल्याने तिने फारच टेन्शन घेतलंय.
हे सफाई माळी कामगारांचं प्रकरण बरंच मोठं दिसतंय याची मला जाणीव झाली; सर्व काही समजून घ्यायला बराच वेळ लागणार होता. इंदुबाई चौधरीला मी माझा मोबाईल नंबर दिला आणि तिचाही घेतला. थोड्याच दिवसात भेटायचं ठरलं. आमची बातचीत एक माणूस दूर उभा राहून पहात होता, तो जवळ आला आणि म्हणाला ‘काय भरती चाललीय काय?’ त्याला तात्काळ बायकांनी वाटेला लावला.
********
काही दिवसांनी मी इंदुबाईला (ती युनियनची सेक्रेटरी आहे) फोन केला. आम्ही गेटवरच भेटायचं ठरवलं. मी तिथे पोचलो, इंदुबाई थोड्याच वेळात हजर झाली. तिने तिच्या सहकर्मचारी कुसुम, कलावती व सरस्वती यांनाही बोलावले होते. त्या सर्वजणी देखील हजर झाल्या. आम्हाला कुठेतरी बसून शांतपणे बोलायचं होतं, आम्ही सर्वांनी ठरवलं की इंदुबाईच्या घरीच जाऊ या. तिलाही ते मान्य होतं, पण ती काहीशी अवघडली होती.
“सर, तुम्हाला एक छोटं गटार पार करायला लागेल, म्हणजे चक्क उडी मारून पलीकडच्या बाजूला जावे लागेल.” तिने बहुदा माझ्या वयाकडे बघून हे म्हटले असावे.
‘काही हरकत नाही, जमेल मला ते’ मी म्हटले.
काही अंतर एकत्र चालल्यावर आम्ही एका अतिशय चिंचोळ्या अरुंद जागेत शिरलो. दोन दुकानांमधून जेमतेम एकच व्यक्ती जाऊ शकेल असा तो बोळ होता. दोन घरांमधील अरुंद वाटांचा तो एक भुलभुलैयाच म्हणायला हवा. माझ्यासारख्या नवख्याला तर परतीची वाट सापडली नसती. माझ्या पुढे इंदुबाई वाट दाखवण्यासाठी चालत होती. ती थांबली. काही माणसं गटारीवर सिमेंटचे मोठं झाकण बसवीत होते. आम्ही सांभाळून पलीकडे उडी मारली. इंदुबाईला उगाचच अवघडल्यागत झाले, ‘सॉरी हा‘ ती म्हणाली. 
अजून दोन-तीन उजवे-डावे करीत आम्ही इंदुबाईच्या घरापाशी आलो. दोन रांगेत घरं होती, समोरासमोरचं अंतर पाच फूटच असेल, कदाचित कमीही. इंदुबाईच घर व्यवस्थित व टापटिपीचं होतं. आठ बाय आठ फुटाचीच खोली होती आणि आतली खोली म्हणजे स्वयंपाकघर तेवढंच असेल. पुढच्या खोलीतून वरच्या खोलीत जाण्यासाठी एक लोखंडी जिना होता. काही वर्षांपूर्वी सरकारने 14 फूट उंचीपर्यंत झोपड्यांची उंची वाढवायला परवानगी दिली होती; त्यावेळी सर्वांनीच एक ‘मजला’ वाढवला होता.
इंदुबाई, सरस्वती, कलावती व कुसुम सर्वजणी खाली बसल्या; मला मात्र एका बाकड्यावर बसायचा आग्रह केला.
‘कुठचं गांव  इंदुबाई?’ मी विचारलं.
‘मी जळगावची’ ती म्हणाली. ‘सरस्वतीचं गाव कोल्हापूरजवळ आहे, कुसुम जेजुरीची. कलावतीचं गाव रत्नागिरी पण तिचा जन्म इथलाच, मुंबईचा आणि इथेच वाढली.’
लग्नामुळे तिघीजणी मुंबईला आल्या आणि तेव्हापासून दुर्दैवाने त्यांची साथ सोडलीच नाही. त्यांच्या नवर्‍यांना सातत्याने मिळकत देणारी नोकरी नव्हती. (एक-दोघींना लग्न जमवताना मात्र कायमस्वरूपी नोकरी असल्याचं बतावलं होतं हे मुंबईला आल्यावर सत्य समोर उभं ठाकलं.) कालांतराने नवर्‍यांना दारूचं व्यसन जडलं. कलावती तर मुंबईचीच, पण तिच्या शिक्षणाकडे पालकांचे लक्ष नव्हतं - शिक्षण मिळालं ते तिच्या दोन्ही भावांना.
“तुमचे मिस्टर काय काय करीत होते?”
“ते चुनाभट्टीला एका गिरणीत कामाला होते, पण गिरणी कामगारांचा संप झाला आणि त्यात त्यांची नोकरी गेली.”
“आम्हा सर्वांच्याच मिस्टरांना कंपनीत परमनंट जॉब नव्हता. ते कॅज्युअल कामगारच होते.” इंदुबाई म्हणाली.
“तुमचं शिक्षण?” मी कुसुमला प्रश्न केला.
“चौथीपर्यंत. गरीबीत दिवस गेले. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडलेला कोळसा आम्ही उचलायचो. तोच जळण म्हणून वापरीत होतो.”   
“तुम्ही बीपीसीएलच्या हाउसिंग कॉलनी मध्ये कधीपासून काम करत आहात?”
“आम्ही सर्वजणी साधारण एकाच वेळेस कामाला लागलो - 1988 साल होतं ते. मला तीन मुलगे आहेत. माझी कौटुंबिक स्थिती इतकी हलाखीची होती की मी मुलांनाही घेऊन कामावर येत असे. माझ्या मुलांनी अनेकदा गटार साफ केली आहेत. शाळेच्या सुट्टीत अशी लहान-मोठी काम करीत त्यांनी संसाराला हातभार लावला आहे.”
“आमच्याकडे तर कांहीच  नव्हतं. कांही लोकांनी आम्हाला पैशाची मदत केली म्हणून तगलो.”
“तुमची मुलं शिकली? कुठपर्यंत?”
“एक नववीपर्यंत शिकला. दुसरा दहावीची आणि मधला बारावी पास आहे.”
“मुलांचे शिक्षण करणे हा आमच्यासाठी मोठा प्रश्न होता.” इंदुबाई म्हणाली. इथे जवळच एक शाळा उघडली. मला माझ्या मुलासाठी तिथे प्रवेश हवा होता. कुणीतरी म्हणालं की आपल्या विभागातल्या नेत्याला भेट काम होईल. मी त्याला भेटले तर त्याने माझ्याकडून पाचशे रुपये मागितले. मी आल्या पावली मागे फिरले. मला पाचशे रुपये देणं शक्यच नव्हतं. हे राजकारणी लोकांचे प्रश्न सोडवीत नाहीयेत, त्यांची सेवा करणं तर दूरच, हे दुकान उघडून बसले आहेत पैशासाठी. मी पुन्हा कधीही कोणत्याही नेत्याकडे गेले नाही.”
“मग मुलांची शाळेत ऍडमिशन कशी झाली?”
“मी मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना भेटले. तिथली माणसं होती, त्यांनीच मदत केली आणि जमलं.”
“आता तुमची मुलं काय करतात?”
“सर माझा मुलगा सिक्युरिटी गार्ड आहे - तो सिक्युरिटी बोर्डात आहे, त्यामुळे त्याला कायम नोकरी आहे आणि मिळकतही आहे - ती अपुरी आहे पण नियमित मिळकत आहे. कलावतीची मुलं आणि सरस्वतीचीही बारीक-सारीक मिळेल ते काम करीत असतात. ती रोजेदारीवर मिळकत करतात, म्हणजे कॅज्युअल वर्कर आहेत. कुसुमचे तीनही मुलगे मिळेल ते काम करतात, त्यांनाही कायमस्वरूपी नोकरी नाहीये.”
“मिळेल ते काम म्हणजे?”
“कधी साफसफाईचे, कधी पेंटिंगचे.”
“त्यांना महिन्यातल्या सर्व दिवशी काम मिळते?”
“नाही हो! बारा पंधरा दिवस काम मिळतं कमाई तशी बेतासबातच! पण काय करायचं साहेब?”
“त्यांची लग्न झाली आहेत?”
“होय सर, मला नातवंड आहेत.” 
“आणि तुम्ही सर्व एकत्र  राहतां?”
तिने मानेनेच होकार दर्शविला.
“म्हणजे सात जण तीन मुलं, त्यांच्या तीन बायका, तुम्ही आणि तुमची चार नातवंडे असा परिवार एकत्र राहतोय तर!” मी थबकलोच. झोपड्यात जागा कुठली आणि एकांतासाठी जागा कुठली? इंदुबाई ची कथा याहून फारशी वेगळी नव्हती. गांवाकडून मुंबईत आल्यावर बांबू व चटई घेऊन झोपडी तयार केली होती. सध्या राहत असलेली ‘खोली’ बरीच नंतरची.  
“तुम्ही घर खर्च कसा चालवता?”

एक दीर्घ शांतता पसरली. आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. कुसुमचे पती बऱ्याच वर्षांपूर्वी निवर्तले होते.
“मी कसातरी सांभाळ केला खरा. ते मी कसं केलं, मला ते कसं जमलं, हे सांगणं कठीण आहे साहेब. त्या दिवसांची आठवणही नकोशी वाटते, डोळ्यात पाणी येतं. ते दिवस विसरून गेले तर मनाला बरं वाटेल. आणि आता माझी नोकरी गेली आहे -  काय करू मी?”  कुसुमने पदर डोळ्याला लावला. तिची तगमग बघून आम्ही सर्व गप्प झालो, बराच वेळ स्तब्ध होतो. जशी ती भानावर आली, तसं आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं. तिची नोकरी गेली हे तर खरंच होतं, आणि पगार म्हणजे किमान वेतन. फक्त किमान वेतन त्याहून एक पैसाही अधिक नाही. कल्पना करा की तीस वर्ष त्यांना फक्त किमान वेतन मिळालं. त्याचा थिअरीमध्ये अर्थ असा की त्यांचं राहणीमान तीस वर्ष बदलच नाही तेही पब्लिक सेक्टर मध्ये काम करून! पुन्हा सांगतोय की तीस वर्षे सातत्याने काम करूनही जर राहणीमान उंचावत नाहीये - काय वाटतं तुम्हाला हे वाचून?
“तुमचे मिस्टर गिरणी कामगार होते आणि अनेक कामगारांना नुकसान भरपाई मिळाली आहे - उशिरा का होईना - मिळाली आहे.”
“त्यांना काहीच मिळालं नाही.”
“सर, त्यांना काही काय जॉब होता - आमच्या नवर्‍यांना असा जॉबच नव्हता.”
“तुम्ही प्रॉव्हिडंट फंडचं काय केलं? तो काढला का?”
इंदुबाई म्हणाली, “डॉ. मॉंटेरोनी आम्हाला प्रॉव्हिडंट फंड न काढण्याची ताकीद दिली होती - नोकरीत असताना फंड काढून घेऊ नका म्हणाले. पण वस्तुस्थिती अशी आहे की जेव्हां जेव्हां बीपीसीएलने कॉन्ट्रॅक्टर बदलला तेव्हां आम्ही फंड काढून घेतला.” सुप्रीम कोर्टात त्यांची केस होती व कोर्टाच्या आदेशानुसार बीपीसीएलला कॉन्ट्रॅक्टर बदल बदलण्याची मुभा होती पण कामगार बदलण्याची मुभा नव्हती त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर बदलले तरीही सफाई कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित होत्या.
“तुम्ही मॉंटेरोचा सल्ला का नाही मानला?”
“कुणाला मुलीच्या लग्नासाठी तर कुणाला मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती. खर्च खूप होते तर बचत  शून्य!”
“घरभाडे किती देता?”
“ह्या आमच्या घरासाठी पाच हजार रुपये महिना देते. सरस्वतीचे स्वतःची जागा होती, पण कर्ज फेडण्यासाठी तिला खोली विकावी लागली. आता भाडेकरू म्हणून राहते. भाडं जरा कमी आहे कारण “ती एका नातेवाईकाच्या खोलीत राहाते“
“तुमचा मुलगा काय करतो? मी सरस्वतीला विचारलं.”
“कॅज्युअल प्रकारचं काम. रोज काम मिळत नाही.” तिला दोन मुलगे होते. एकाचं निधन झालं. तीन मुली - त्यांची लग्न झाली. घर चालवायची जबाबदारी तिच्यावरच होती कारण तिचा नवरा तिला सोडून गेला होता. तो जरी बऱ्याच वर्षांनी परत आला तरी तो लवकरच वारला होता“.
“तुम्ही युनियन कधी बनवली?”
“आम्ही युनियन केली ते 1989 साली. आम्हाला पगार वेळेवर मिळत नव्हता. एक शेट कॉन्ट्रॅक्टर होता.  अनेक महिन्यांचा पगार रखडला होता. आम्ही बीपीसीएलच्या ऑफिसरकडे तक्रार केली. आमचा पगार फक्त दररोज एका रुपयाने वाढवा अशी मागणी केली. आमचा पगार रोजी 19 रुपये होता, तो 20 करा म्हटलं पण त्याने आमचा अपमान केला, ‘दहा पैसे’ देखील वाढवणार नाही म्हणाला.  पण नंतर त्याच ऑफिसरला करारावर सही करावी लागली ज्यामुळे आम्हाला रुपये 29 दररोज मिळू लागले.”
“सर, आम्ही आरसीएफच्या (राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स) कमिटी मेंबर्सना भेटलो. आरसीएफ जवळच आहे. आम्ही आमची परिस्थिती त्यांना सांगितली. ते आम्हाला डॉ. मॉंटेरोंकडे घेऊन गेले. मग आम्ही सीटूशी संलग्न असणारी युनियन केली”
“तुम्हाला कोणता सवलती मिळतात?” खरं सांगायचं तर हा प्रश्न विचारताना मलाच फार अवघडल्यासारखं झालं.
“आम्हाला पंधरा दिवसांची रजा मिळते.”
“कित्येक वर्ष आम्हाला सणाच्या सुट्ट्या मिळत नव्हत्या. मग आम्ही साखळी उपोषण केलं. तेव्हा ते मागे हटले. आता आम्हाला सणांच्या चार सुट्ट्या मिळतात.”
“हे कधी झालं?”
“सात वर्षांपूर्वी.”
“म्हणजे तेवीस वर्ष तुम्हाला सणाच्या सुट्ट्या मिळाल्या नाहीत असं दिसतंय” मी म्हणालो. “तुम्हाला घरभाडे भत्ता मिळतो?”
“नाही”
“पण महाराष्ट्रात तर कायदा आहे - पाच टक्के घरभाडे द्यायला लागतोच.”
“आम्हाला किमान वेतानापलिकडे काहीही मिळाले नाही. आता आम्हाला काढून टाकून त्यांनी ‘मिस्टर क्लीन’ नावाचे मशीन कॉलनीची साफसफाई करण्यासाठी आणलं आहे. त्याच्यासाठी 22 हजार रुपये दर दिवशी देतात. मला सांगा, काही खर्च वाचला असेल का त्यांचा?”
“आम्ही 35 कॉन्ट्रॅक्टचे कामगार होतो. आम्हाला काढून त्यांनी ‘नाईट फ्रॅंक’ कंपनीला हाउसकीपिंगचे कंत्राट दिलंय. नाईट फ्रॅंकच्या कामगारांना पंधरा हजार रुपये देतात आणि आम्हाला बारा हजार रुपये पगार देत होते.”
“ते देखील तीस वर्षांच्या नोकरीनंतर.”

सर्वजणी बोलू लागल्या. बीपीसीएल आणि एचपीसीएल दोन्ही सरकारी कंपन्या आहेत. (बर्माशेल ही इंटरनॅशनल कंपनी - तिचा भारतातील भागाचे 1976 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि ‘भारत पेट्रोलियम’ असे नवीन नाव देण्यात आले. एचपीसीएल म्हणजे ’एससो’ असून कंपनीचं राष्ट्रीयीकरण 1974 साली करून ‘हिंदुस्तान पेट्रोलियम’ नाव दिलं होतं. ह्या कंपन्या त्यांच्या अद्याक्षरांनी म्हणजे बीपीसीएल व एचपीसीएल अशा ओळखल्या जातात) एचपीसीएलने त्यांच्या कंत्राटी कामगारांबरोबर असलेला विवाद समेटाने संपवला होता - त्यांना आता किमान वेतनापेक्षा रुपये 7000/- अधिक मिळतात.
“हे खरं आहे. त्याखेरीज एचपीसीएल रुपये शंभर प्रतिदिन प्रवास भत्ता देते. त्यामुळे त्यांना एकूण रु. 22,000/- दरमहा मिळतात. आरसीएफ त्यांच्या कंत्राटी कामगारांना रु.२४,०००/- हजार पगार देते.
मला सांगा जर बीपीसीएल, एचपीसीएल व आरसीएफ या तीनही कंपन्या सरकारच्या आहेत तर त्यांची कंत्राटी कामगारांना बद्दलची धोरणे वेगवेगळी कशी?
* * * * * *
मी डॉ. विवेक माँटेरोना त्यांच्या ऑफिसमध्ये भेटलो. एकंदर प्रकरण आणि त्यातले संघर्षाचे मुद्दे समजून घ्यायचे होते.
युनियन 1989 मध्ये बनवल्यावर सफाई व माळी काम करणाऱ्या (हाउसिंग कॉलनीत काम करणाऱ्या) कामगारांनी कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाव्यात अशी मागणी केली. सिट्सने ह्या मागण्या पुढे रेटल्या तेव्हां मुंबई हायकोर्टाने त्या कामगारांना परमनंट नोकर्‍या द्याव्यात असा आदेश दिला. मग बीपीसीएल सुप्रीम कोर्टात गेली. ती केस सुप्रीम कोर्टात असतानाच स्टील अथॉरिटीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की तिथे कंत्राटी पद्धत रद्दबातल करण्यात आली आहे. तिथले तेच कंत्राटी कामगार नोकरी मध्ये समाविष्ट केले पाहिजे असे काही नाही! म्हणजेच आपसूक कायम स्वरूपी नोकरी कंत्राटी कामगारांनाच मिळेल - कंत्राटी पद्धत रद्द झाल्याचा परिणाम म्हणून ही आशाच मिटली! त्यामुळे 2004 मध्ये बीपीसीएलच्या केसमधला मुंबई हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाने रद्द केला. कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍडव्हायझरी बोर्डासमोर कंत्राटी कामगारांचा प्रश्न उपस्थित केला गेल्यावर बीपीसीएलने कंत्राटी कामगारांना कामावरून कमी न करण्याची हमी दिली त्यामुळे त्यांची नोकरी अबाधित राहिली अशा ह्या 'कोर्ट प्रोटेक्टेड' कामगारांच्या जागी जेव्हा नवीन कामगारांची भरती करण्यात येते तेव्हा त्यांना किमान वेतनही देण्यात येत नाही! केंद्र सरकारच्या पोर्टलवर त्यासंबंधी तक्रार सीटने लावली आहे ती किमान वेतन न देण्याबाबत. ती आता लेबर कमिशनरसमोर दाखल आहे! गेल्या वर्षी ज्या अशा - म्हणजे ज्यांना किमान वेतन दिलं गेलं नाही आणि ज्यांची तक्रार दाखल आहे - कामगारांना 2019 साली कामावरून काढून टाकण्यात आलं. त्यांनी पाच ते दहा वर्ष काम केलं आहे. (हा कोर्ट प्रोटेक्टेड गट नव्हता.)  शिवाय कॉन्ट्रॅक्टर्स देखील बदलण्यात आले. काही 'कोर्ट प्रोटेक्टेड' कामगारांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यावर बीपीसीएलने त्यांनाही डच्चू दिला! साठ वर्ष पुरी झाल्यावर निवृत्त व्हायचा नियम बीपीसीलच्या कामगारांना लागू आहे पण कंत्राटी कामगारांसाठी असा कोणताही नियमच नाही. आता हा विवादही सुप्रीम कोर्टात गेला.

नोव्हेंबर 2018 मध्ये सफाई  कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. कॉन्ट्रॅक्टरने ग्रॅज्युएटी दिली नाही म्हणून बीपीसीएलने म्हणजे मुख्य नियुक्ताने (एम्प्लॉयरने) देणं भाग आहे. त्यांच्या ग्रॅज्युटीची रक्कम अदमासे प्रत्येकी अडीच लाख रुपये याहून अधिक आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्टीकरण देण्यासाठी निकाल दिला की कायद्यानुसार त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळावेत - म्हणजेच दुसऱ्या शब्दात - त्यांना ग्रॅज्युटी मिळावी. पण त्यात चार जणींच्या हाती अजून एक पैसाही आला नाहीये.
बीपीसीलच्या सफाई कामगारांची केस - त्यांचं बेछूट शोषण ही काही लाखातली एक केस नाही. नुकतच बाबा आटोमिक रिसर्च सेंटरने साठ सफाई कामगारांना अशाच रीतीने काढून टाकलंय. डॉ. विवेक मॉंटेरो यांनी त्यांच्याही केसेस धसास लावल्या आहेत.
**** **** ****
इथे थोडं थांबून विचार करू या. तीस वर्ष सातत्याने नोकरी करूनही त्या चार जणींचं राहणीमान जराही का सुधारलं नाही? त्यांचा विवाद अजूनही - म्हणजे तब्बल 29 वर्षानंतरही का निकालात निघाला नाही? त्यांनी 1990 साली कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत आणि अजूनही अंतिम निर्णय झाला नाहीये. त्या वेळी 70 कर्मचाऱ्यांनी कोर्टाकडे न्यायासाठी धाव घेतली.  त्यांच्यामधले 20 ते 25 कामगार आज पर्यंत स्वर्गवासी झाले आहेत. म्हणजेच विवाद मिटत आहेत ते मृत्युच्या कारणांनी. त्या चार जणींना आपल्या मुलांना अधिक शिक्षण का देता आलं नाही? तीस वर्षांनीही कामगारांच्या राहणीमानात फरक पडत नसला तर त्याला जबाबदार कोण? कंत्राटी कामगारांच्या आयुष्याची जी फरफट झाली आहे त्याला जबाबदार कोण?

मी चार जणींना भेटलो - त्यांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला, देत आहेत. घरी देखील एकटीने संसाराचा गाडा पुढे रेटलाय. त्यांना जमेल तसा रेटला आहे, पण गत सालाची आठवण दुःख आणि अश्रू याखेरीज काही काहीच देत नाही. उर्वरित आयुष्य मानाने जगण्याची शाश्वती नाही. आता त्या कमावत्या स्त्रिया नाहीत, त्या आता मुलांवर अवलंबून आहेत आणि मुलांना तरी कुठे नियमित उत्पन्न आहे? ग्रॅज्युटी न मिळाल्याने बँकेतही जमा शून्यच!
असे अनेक प्रश्न आहेत - कित्येक अनुत्तरित आहेत. पण काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं नजरेआड करता येणं शक्यच नाही - जे आपल्या समवेत काम करतात त्यांच्या बाबतीत आम्ही किती संवेदनशील असतो? बीपीसीएल त्या परीक्षेत सपशेल फेल गेले आहेत आणि आपला समाजही!

विवेक पटवर्धन
जून ३०, २०१९

Tuesday, May 28, 2019

कसं जमतं हे त्यांना?


मी तसा ‘आरोहन’ संस्थेसाठी नवाच. [शुद्धलेखनाचा आग्रह धरणाऱ्यांनी कृपया ध्यानात घ्यावे की आम्ही ‘ण’ आणि ‘न’ चा घोटाळा केला नाहीये. आरोहन हे नांव मूळ इंग्रजी नांवाची आद्याक्षरे घेऊन केलेले संक्षिप्त रूप आहे.] त्यामुळे आरोहनच्या विविध प्रकल्पांची ओळख करून घ्यायचे ठरविले, आणि अनिताला विनंती केली. अनिता प्रोजेक्ट मॅनेजर आहे, मी तिच्या जव्हारच्या कार्यालयात तिला भेटलो. चहापाण्यानंतर आम्ही, म्हणजे माधुरी, अनिता आणि मी निघालो. एक गाडी आम्हाला न्यायला तयार ठेवली होतीच.

“आपण करोळी गावाला जाऊया” अनिता म्हणाली. माझ्या ठाण्याच्या घरापासून जव्हारकडे जाताना  मनोरपर्यंत रस्ता, म्हणजे अहमदाबाद हायवे, प्रवास गडकरींना धन्यवाद देत केला. पण मनोर ते विक्रमगड रस्ता पार करताना आपल्याला गेल्या जन्मी केलेल्या पापांची कठोर शिक्षा मिळते आहे याची स्पष्ट जाणीव झाली. सीट बेल्टने मला सीटवर जखडून ठेवले नसते तर समोरच्या डॅशबोर्डावर किंवा बाजूच्या खिडकीवर माझा दहादा तरी कपाळमोक्ष झाला असता. जव्हारकडून मोखाड्याकडे जाणारा रस्ता चांगला आहे हा एक सुखद धक्काच होता.


“आपला हिम्बतपाड्याचा चेक डॅम” कोणीतरी म्हणाले. “बांधून दीड वर्ष झालं”. डाव्या बाजूला एक खोल दरी दिसली. तिथे एक मोठा चेक डॅम दिसला. मी गाडी थांबवली. चार फोटो काढले. डॅममध्ये पाणी नव्हते, मी महिन्यात सर्व ठिकाणी पाण्याचा दुष्काळ वाचत होतो. आता प्रत्यक्ष पुरावा समोर होता. पुन्हा गाडीत बसलो. तोपर्यंत अनिताला करवंद तोडायचा मोह आवरता आला नव्हता. पुन्हा प्रवास जारी.

“स्मृतिचित्रे लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक मोखाड्याला वास्तव्य करुन होत्या. त्यांचा वाडा आता पडीक आहे.” अनिताने माहिती पुरवली. इतिहासाच्या संदर्भात नेहमीच्या जागाही वेगळ्याच दिसायला लागतात.

करोली गांवापर्यंत पोहोचायला दीड तास तरी लागणार होता. प्रदेश तसा रुक्ष होता. उन्हाळ्याने हिरवळ करपून टाकली होती. आरोहनच्या कार्यकर्त्यांना इथे गांवागावात बरेच फिरावे लागते. त्यांच्या ओळखी गांवकऱ्यांशी आहेत आणि ठिकठिकाणच्या झाडाझाडांवर आठवणी आहेत. आमच्या गाडीत आता तीन-चार जणी दाखल झाल्या होत्या. “हे बघा आरोहनचे आंब्याचे झाड”, माधुरी म्हणाली. रस्त्याच्या एका वळणावर आणि बाजूला एक सुंदर डेरेदार आम्रवृक्ष होता. “हे झाड आरोहनचे कसे?” “म्हणजे आम्ही काम केल्यावर अनेकदा ह्याच झाडाखाली बसून जेवतो.” 

गावात राहाणाऱ्यांचे हे एक वैशिष्ट्य म्हणायला हवे. माझ्या खोपोलीच्या घराभोवती अनेक मोठे वृक्ष होते. मी त्यांच्याशी बोलतही असे. मी कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्राचा अभ्यास केला होता. आमची अभ्यास सहल [excursion] निघत असे, आणि आम्ही वाटेवरच्या झाडांचा पानाफुलांचा, झाडाझुडपांचा अभ्यास करीत काही मैल चालत असू. इथे मला वनस्पतींची पारंपारिक नांवे तर कळलीच, पण कित्येक वनस्पतींचे अनेक उपयोग देखील. मोहाची दारू बनते हे मला माहित होतं, पण त्याच झाडाचे साल जखमेवर लावून त्याचा औषधी उपयोग करता येतो हे माहित नव्हतं. बहावा बहरला की पंचेचाळीस दिवसांनी पाऊस लागतो हे अनुभवाचे बोल त्यांच्यामुळेच समजले.


तसं ज्ञान हे दोन प्रकारचे असते. एक अनुभवातून आलेले, दुसरे अनुमानातून म्हणजे प्रयोगातून आलेले. निसर्गात एखादी घटना होते ती इतर घटनेची सूचक असते हे गावकरी जाणतात. पण केवळ पाश्चात्य आणि पुस्तकी माहितीवर विसंबून असणारे असे अनुभवाचे बोल ऐकताच नाहीत.

हेमंती आमच्या गाडीत होती आणि तिला विविध वनस्पतींची बरीच माहिती आहे हे लक्षात आलं. “आता त्याच विषयावर आपण एक पुस्तिकाच काढूया” अनिता म्हणाली. ते ज्ञान जतन करून ठेवायलाच हवे.”

आमची गाडी बरेच अंतर काटून पुढे गेली होती. प्रदेश रुक्ष होता. बाहेर रणरणते ऊन होते. उजव्या बाजूला एका रांगेत अनेक खड्डे खणलेले दिसले. अनिताने गाडी थांबवली. “सर, हे बघा सरकारने खणलेले खड्डे. इथे आदिवासी गेली सात पिढ्या शेती करतात. त्यांनी कुठे जायचे?” 


आम्ही करोळी गावांत पोचलो. एका मोठ्या घराजवळ ड्रायव्हरने गाडी उभी केली. चार जणी बाहेरच ओटीवर बसल्या होत्या. त्यातल्या एक नुकतीच लग्न होऊन सासरी आली होती. त्या मुलीच्या लग्नाची गोष्ट अनिताने सांगितली. मुलगी त्या खेड्यातली नव्हती, मोठ्या गावातली होती. पण आता लग्न होऊन दूरच्या खेड्यात आली होती. खेड म्हणणेदेखील योग्य नाही, हा तर एक पाडा होता, आठ-दहा घरांचा. कसं वाटत असेल अश्या नवऱ्या मुलीला पाड्यात लग्न होऊन येताना? “सर, त्यांच्या पाच-मुळं अशी प्रथा आहे. म्हणजे, लग्न होऊन येताना एक नवरीपेक्षा मोठी बाई आणि करवली [नवरीच्या वयोगटातली] अश्या दोघी तिच्याबरोबर येतात. मग नवरी पाच वेळा थोडे दिवस सासरी आणि काही दिवस माहेरी राहते असे पाच वेळा होते. त्यामुळे नव्या नवरीला तिच्या सासरी रुळायला मदत होते. तिच्याबरोबरच्या दोघी तिच्याशी बोलतात, त्यांचीही तिला मदत होते.” ही प्रथा मला वाटतं सर्वच ठिकाणी असावी जरी शहरात ती मागे पडली असेलही.

माझ्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्या मुलींनी कुडवा गावात जायचे ठरविले. आता रस्ता खराब होता. ऊन तर रणरणते होते. उजाड माळरान आणि कोरडी नद्यांची पात्रं बघवत नव्हती. माझ्यासाठी हे वास्तव्य भयंकर होते. वाटेत काही नद्यानाले पार केले, आणि ते सर्व रुक्ष कोरडे होते. एका बंधाऱ्याजवळ एक वासरू पाण्यासाठी फिरताना बघितले. आणि त्याच बंधार्‍यापासून पाचशे फुटावर एक विहीरही पाहिली जिला बाराही महिने पाणी असते. तिथून सोलार विजेने पंप चालवून टॅंकरने अनेक गावांना पाणी मिळण्याची सोय एका स्वयंसेवी संस्थेने केली आहे. 

आम्ही कुडवा गावात पोहोचलो. नारायणदादांचे घर सुंदर आहे. इथे दोनच ‘घराणी राहतात. मोवळे आणि कामाडी. कुडवा गावाचा चारी बाजूला डोंगर आहेत, म्हणजे गांवकऱ्यांनी डोंगर पार केल्याशिवाय त्यांना तालुक्याच्या किंवा कुठेही जाता येत नाही. अजूनही ‘लाल डबा’ म्हणजे एसटी इथे येत नाही. रस्ते आत्ता कुठे झाले आहेत, खडबडीत का होईना. मोखाडा इथून चोवीस किलोमीटर दूर. माध्यमिक शाळा अजूनही दूरच आहेत, जरी पूर्वीपेक्षा आता जरा जवळ आहेत म्हणायला हवे. त्यांच्या व्यवस्थेबद्दल न बोललेलेच बरे. आजारी माणसाला झोळीत घालून नेत असत. कित्येक पोहोचेपर्यंत दगावत असत. रस्ते झाल्यामुळे सोय झाली आहे. अजूनही इथे वीज नाही. एसटी नाही. एका स्वयंसेवी संस्थेने अनेक झोपड्यांना सोलार पॅनेल बसवून वीज दिली आहे.


नारायणदादांच्या घरी गेलो. [फोटो] मला मुलींनी माजघरात बोलावले. नारायणदादांच्या पत्नी स्वैंपाक चुलीवर करीत होत्या हे स्पष्ट होते. [इथे गॅस पोचला नव्हता. मूलभूत गरजा भागवण्याची मारामारी, तिथे गॅसची बात कशाला?]

चुलीवर छताला काही मक्याची कणसं बांधून ठेवली होती. चुलीच्या धुराची पुटं त्यावर बसली होती. “अशी कणसं ठेवली की त्यांना अजिबात कीड लागत नाही. कणसं बाहेरून धुराने माखलेली दिसली तरी आतले दाणे चांगले राहतात. मग त्यांचा उपयोग आम्ही शेतीसाठी करू शकतो.” नारायणदादा म्हणाले. नारायण दादा ही एक अजब व्यक्ती आहे. इथे पाच पिढ्या तरी त्यांचे घर आहे, पण तक्रार नाही. हसतमुख आहेत, शीघ्रकवीही आहेत!

मी स्वत:शीच हसलो. इथल्या गांवकऱ्यांची स्थिती त्या चुलीवर टांगलेल्या कणसांसारखीच आहे. प्रतिकूल परिस्थितीचे चटके बसताहेत, सोयी तर दूरच. तरीही माणूस आशावादी आहे, जसा बंदा रुपया आहे! कसं जमतं हे त्यांना?  

विवेक पटवर्धन

Thursday, May 16, 2019

आणि बुद्ध हसला.....


[जव्हार मोखाडा विभागात भरीव कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थात 'आरोहन' महत्वाची गणली जाते. त्यात कार्यरत असणाऱ्या अनिता पगारे यांचा हा लेख आरोहांच्या ठोस कार्याची तसेच गावकऱ्यांचे प्रश्न किती बिकट आहेत त्याची जाणीव करून देतो.]

मोखाडा तालुक्यामधील ४४ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले ‘आमले हे गांव. गावाच्या सभोवताली नदी नाल्याने व निसर्गाने नटलेले ३२२ लोकसंख्या व ७२ कुटुंब संख्या असलेले हे गाव जिथे अनुसूचित जमाती पैकी, ठाकूर(म), वारली, कातकरी समाजातील लोक राहतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावामध्ये कुठल्याही प्रकारची सोई सुविधा व गाव विकासाची कामे झाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उदर निर्वाहासाठी बाहेरगावी मजुरी करण्यासाठी स्थलांतरित होत होते. आदिवासी हा ही माणूस आहे, त्यालाही माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव नव्हती तेव्हाची ही सर्व परिस्थिती.

     सन २०१२ साली प्रथमतः ‘आरोहन सामाजिक संस्थेने या गावात पाऊल टाकले व गावातील समस्या व परिस्थितीची पडताळणी करुन या गावामध्ये गाव विकासासाठी शिक्षण, आरोग्य, उपजीविका व प्रशासन या विषयावर काम करण्यास सुरुवात केली. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आहेत त्या कशा तरी भागवल्या जात होत्या पण आमले गावामध्ये अंधार असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. उदा. सर्पदंशामुळे मृत्यू, आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे बालमृत्यू तसेच माता मृत्यू होत होते. या समस्या सोडवण्याच्या विचारात प्रथम या गावात ‘विद्युत पुरवठा आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर ‘आरोहन आणि ‘सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आशा प्रकल्पांतर्गत आमले गावात १२ किलो वॅटची सोलर सिस्टीम बसवण्यात आली. यातून निर्माण होणाऱ्या विजे मुळे प्रत्येक घरात दोन बल्ब आणि गावातील रस्त्यांवर २० सोलार दिवे बसवण्यात आले. यातूनच विहिरीवरील मोटार चालविली गेली ज्यामुळे गावाबाहेरील पाणी गावात, घरांपासून अधिक जवळ आणू शकलो. यासोबतच या मोटारीमुळे शेती साठी ही पाणी उपलब्ध होऊ शकले ज्यातून शेती करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली, त्यांचे उत्पन्नही वाढले, याचा परिणाम स्थलांतर कमी करण्यात झाले.
[प्रातिनिधीक चित्र]
     मुलभूत गरजांची पुरेशी उपलब्धता, शिक्षणासाठी आवश्यक असणारी वीज आणि आदिवासी समूहालाही जगण्यासाठी लागणारे मनोरंजन आणि सर्वात मुख्य म्हणजे सन्मानपूर्वक जगण्याच्या शक्यता वाढण्यासाठी लागणारे उत्पन्न मिळवायला अधिक विजेची आवश्यकता जाणवू लागली. आमले गावात याची अनेक दिवस चर्चा सुरु होती आणि शेवटी या चर्चेचे रुपांतर २१ ऑगस्ट २०१८ रोजी ग्राम सभा घेण्यात झाले. गावाचे निर्णय गावातल्या लोकांनीच घ्यावे या तत्वप्रणाली नुसार ‘आरोहनने आतापर्यंत ‘पाडा समितीचे गठन केलेले होते, जिच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीतल्या चर्चेत ‘आरोहनच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती, पण चर्चा आणि निर्णय मात्र गाववालेच घेत होते. चर्चेत अशी माहिती समजली की, याधीही गावाने अपुऱ्या विजेच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर गावाने ‘महावितरण कडे आपली गरज नोंदवली होती आणि शासनाने त्याला मंजुरी दिली होती, त्यासाठी झालेल्या मोजमापा वरुन काही खांब येऊन पडलेही आणि एका रात्री ते खांब परतही गेले होते. एवढ सगळ झाले होते मग वीज का नाही? याचा शोध घेतांना लक्षात आले की याचे कागदोपत्री कुठलाही पुरावा गाव वाल्यांच्या हाती नव्हता. मग बैठकीत निर्णय घेतला गेला की पाडा समिती यापुढे याविषयाचा पाठपुरावा घेईल जोपर्यंत वीज घराघरात पोहोचत नाही तोपर्यंत. यासर्व प्रक्रियेत सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी ‘आरोहन असेलच याची ग्वाही प्रतिनिधींनी बैठकीत दिली होतीच.

     यानंतर सुरु झाल्या शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटी. या कार्यालयातून त्या कार्यालयात पाठवले जाऊनही न खचता सर्व कागदपत्र गोळा करण्याची स्पर्धा सुरु झाली. रोज वेगळा शोध लागायचा. महावितरण आधी वन विभागाचे ना हरकत पत्र आणा असे म्हणत होते तर त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आधी महावितरण ने तुम्हांला वीज कनेक्शन मंजूर केले आहे असे पत्र द्या मग आम्ही तुम्हांला ना हरकत देतो असे ऐकावे लागले. आधी कोण? हा प्रश्न सोडवण्यातच बरेच दिवस गेले. कदाचित आपल्याला वीज मिळणारच नाही कारण कनेक्शन आणण्यासाठी ‘वाईल्ड लाईफ चे जंगल क्रॉस करावे लागणार होते. काहीही करुन वीज आणायचीच हे ध्येय एवढे स्पष्ट आणि निश्चित होते की त्यासाठी काहीही करण्याची पाडा समिती सदस्यांची आणि त्यांना पाठिंबा देण्याची गावाची तयारी होती. आधी ते की आधी हे ह्या शोधात हळूहळू गाववाले दोन्ही विभागांच्या वरिष्ठां पर्यंत पोहोचले. मग नवीनच शोध लागला की, ज्या गावांमध्ये सोलर आहे त्यांना वीज मिळत नाही. आता ह्या नवीन प्रश्नाला सामोरे कसे जायचे ह्यासाठी परत पूर्ण गावाची एक बैठक झाली आणि ठरले की, आमच्याकडे सोलर असल्यामुळे शासन आम्हांला वीज देवू इच्छित नाही असे संबंधित अधिकाऱ्याकडून लेखी मागायचे. परत पाडा समितीच्या टीमचा मोर्चा महावितरण मध्ये त्यांची ही मागणी घेऊन पोहोचला. गाववाले निवेदन घेऊन तर कार्यालयात पोहोचले पण अधिकारी अर्ज घ्यायला तयारच होईना. मग शेवटी अर्ज घेतल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही ह्या गाववाल्यांच्या निर्धारापुढे अधिकारी नमले आणि त्यांनी अर्ज तरी स्वीकारला.

     अर्ज त्यांच्या कार्यालयात नोंदला गेला आणि तिथून चक्र सुरु झाले. संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र गावभेट घेतली, सर्वांची एकत्र छान बैठक झाली ज्यामुळे गावाचा विश्वास वाढला की वीज मिळू शकते. त्यानंतर वीज विभागाने या कामात ‘वाईल्ड लाइफ’ भागातील किती झाडे तुटतील याचे पत्र ‘वाईल्ड लाइफ’ सुरक्षा विभागाला दिले गेले. याकामासाठी लागणारी जमीन यासाठी गावाच्या सहमतीने ‘वन हक्कचा तीन दोन व तीन एक चा प्रस्ताव वन विभागाकडे दाखल करण्यात आला. संबंधित सर्व विभागाने एकमेकांशी बोलून देशाच्या नागरिकांना काय हवे आहे ते पुरवावे असे आपल्या घटनेत असले तरी आमच्या भागात हे सर्व ‘कम्युनिकेशन, मग ते पत्रव्यवहार असो की त्यांच्या एकत्र बैठका किंवा गावाचा अपेक्षित सर्वे असो आमचे पाडा समितीचे सदस्य घडवून आणत होते. पुढे मग कनेक्शन साठी लागणारे सर्व कामकाज सुरु झाले. त्यानंतर गावातील ज्या लोकांकडे कनेक्शन द्यायचे आहे त्यांची यादी करणे, त्याला मंजुरी घेणे, प्रत्यक्ष ट्रान्सफार्मर बसवणे, मीटर लावणे इ. कामे झाली आणि गावात लाईट पोहोचली.

     यानिमित्ताने बरेच कायदे, तरतुदी – तीन दोन, तीन एक दावा; गाव नकाशा, सामूहिक वन हक्क दावा इ. आम्ही, गाववाले शिकलो एवढच नाही तर आमच्या वाट्याला दोन्ही विभागाचे इतके नवखे कर्मचारी आले होते की त्यानाही आमच्या या कामामुळे अनेक गोष्टींचा अभ्यास झाला, तरतूद समजली. संबंधित कर्मचारी, अधिकारी जागेवर नाही यामुळे आमच्या गाववाल्यांच्या अनेक चकरा झाल्या, त्यात आम्हा सर्वांची छान दोस्ती झाली असे म्हणून आम्ही गेलेल्या पैशांचे दुःख कमी करुन घेतले. यासर्व कामासाठी साधारण ३५ झाडे कापावी लागली. किती झाडे तुटतील,कापावी लागतील याचे पत्र आधी देऊनही ज्या कंत्राटदाराला काम दिले होते त्याच्यावर दबाव आणून, गावावर दबाव आणून पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण गाव फारच पक्के होते. आमच्या कडे पैसे नाही, पोरा-बाळांसह आम्हांला अटक करा अशी भूमिका घेऊन गाव रस्त्यावर आले त्याचा फायदा असा झाला की कोणावरही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. काम पूर्ण झाले आता पुढच्या आठवड्यात सर्वांचे घरात लाईट लागतील तेव्हा आपण जाहीर एक कार्यक्रम करुयात, त्यासाठी तारीख काय असावी, प्रमुख पाहुणे कोण? निमंत्रण पत्रिका कशी असावी? कोण कोणाला पत्रिका पोहोचवणार? आलेल्या पाहुण्यांना जेवायला काय? ही सर्व चर्चा सुरुच होती तर गावासाठी बसवलेला डीपी जळाला आणि सर्व चर्चा जागच्या जागीच राहिल्या. परत सर्व पाठपुरवा आणि पळापळ सुरु झाली आणि अखेर गावात लाईट आली. आख्ख्या गावाच्या बरोबरीने सतत त्यांच्या बरोबर राहिले त्या सरिता आणि राजारामच्या कष्टाला फळ आले. राजाराम तर शेवटचे काही दिवस गावातच तळ ठोकून राहिला की काही कारणाने काम थांबायला नको किंवा बंद पडायला नको. माधुरी, गणेश आणि नितेश यांचा रोजचा पाठपुरावा तर होताच पण ज्या ज्या वेळी गरज पडली त्या त्या आणि तितक्या वेळेस गावाच्या बैठकांना, गाववाल्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जात होते. यासर्व जणांच्या अथक प्रयत्नाने साडे आठ महिने युद्ध पातळीवर केलेल्या पाठपुराव्या नंतर अखेर लाईट आली

....आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की, ‘आणि बुद्ध हसला.......’

-- अनिता पगारे