Sunday, March 10, 2019

आरोहनतर्फे आदिवासी समाजात जागतिक महिला दिन साजरा


     आदिवासी समूह मुळातच कमी बोलणारा पण आताच्या सतत स्वतःला सिद्ध करावं लागण्याच्या काळात आयुष्य समानतापूर्वक, आदरयुक्त हवे असेल तर तुम्हांला बोलावेच लागेल तरच विविध प्रकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल नाहीतर सतत विविध प्रकारच्या हिंसाचाराला, अन्यायाला सामोरे जावे लागेल असा सूर जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी ‘आरोहनने आयोजित केलेल्या सहा महिला आणि युवा सोबतच्या मेळाव्यात निघाला.


     आरोहन ही नोंदणीकृत सामाजिक संस्था गेली १३ वर्षे पालघर मधील मोखाडा, जव्हार, डहाणू आणि पालघर या तालुक्यांमध्ये ‘कुपोषण समूळ नष्ट व्हावे यासाठी आरोग्य, शिक्षण, रोजगार, शेती, पाणी आणि सुप्रशासन हे विषय मध्यवर्ती ठेवून काम करीत आहे. मोखाड्या तालुक्यातील सुर्यमाल- केवनाळे, कुर्लोद, पाथर्डी- बोटोशी, आणि आसे ग्राम पंचायत तर जव्हार मधील कडाची मेट गांव आणि आयटीआय जव्हार या ठिकाणी विशेष लक्ष देवून सध्या महिला, मुल आणि युवा वर्गा बरोबर काम सुरु आहे.


     ‘बॅलन्स फॉर बेटर अर्थात - समानता असणारा, आनंदी समाज निर्माण होण्यासाठी जात,धर्म,लिंग इ. सर्व प्रकारचे संतुलन आवश्यक आहे’ ह्या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा ‘जागतिक महिला दिन’ सहा ठिकाणी साजरा करण्यात आला. बोटोशी येथील भोसपाडा, आसे येथील ब्राह्मण गांव, कुर्लोद, सूर्यमाळ, कडाची मेट आणि आयटीआय जव्हार येथे मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा करण्यात आलेल्या ह्या मेळाव्यात जव्हार आगारच्या व्यवस्थापिका सरिता बागल, माधुरी मुकणे, सरिता चौधरी, प्रतिभा भोये, अॅड कल्याणी मुकणे, मीनाक्षी खिरारी आणि लीला दळवी यांनी आजची स्त्रियांची सामाजिक-आर्थिक आणि राजकीय स्थिती मांडली आणि आपापल्या क्षेत्रात आदरपूर्वक स्वतःचे स्थान मिळवण्यासाठी प्रत्यक्ष त्या स्त्रीच्या तसेच समाजातील इतर घटकांच्याही मानसिकतेत बदल व्हायला हवा, हे बदल कसे घडवावेत हे दाखवण्यासाठी स्वतःच्या अनुभवांची मांडणी ह्या मेळाव्यातून करण्यात्त आली. सूर्यमाळ येथे ग्राम पंचायत आणि डॉन बॉस्को संस्थेबरोबर तर ब्राम्हण गांव येथे ‘साथी’ संस्थेबरोबर या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. 

यासर्व मेळाव्यामध्ये त्या त्या गावातील स्त्रिया, युवती, युवा मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. कडाची मेट येथील मेळाव्यात गावातील स्त्रियांनी रान भाज्यांपासून विविध प्रदार्थ बनवून प्रदर्शन केले. मासिक पाळी आणि त्यासंदर्भात असलेले गैरसमज समजावून घेण्यासाठी ‘पॅड मॅन’ सिनेमा एकत्रित बघितला. महिला दिन हा सर्वांच्या आनंदाचा दिवस असायला हवा आणि महिला सक्षमीकरणावर फक्त भाष्य न करता आपल्या कृतीत तो विचार उतरला पाहिजे अशी भूमिका सर्व वक्त्यांनी मांडली आणि शेवटी सर्व आदिवासी महिलांनी आणि युवानी आपला पारंपारिक ‘तारपा नृत्य सदर केले. 

अनिता पगारे 

एका लग्नाच्या वाढदिवसाची गोष्ट


“एवढा कसला विचार करता आहात?” प्रश्न होता लुलूचा, माझ्या पोपटाचा. मी बागेत मॉर्निंग वॉक घेत होतो तेव्हा हा प्रश्न आला. “जेव्हां तुम्ही चालता तेव्हां तुमचे डोके चालते. जसे काही कोणीतरी डोक्यातले स्विच ऑन केले असे वाटावे.”

“अगदी खरंय.” मी म्हटले. मी एका पिवळ्या फुलांनी भरलेल्या झाडाखाली थांबलो. लुलू, माझा पोपट, त्या झाडाच्या एका फांदीवर बसला होता, तिथून झेप घेऊन तो माझ्या खांद्यावर अलगद उतरला. “माझ्या बाबतीत तरी ते अगदी खरे आहे.”

“सांग ना, कसला गंभीर विचार करतो आहेस?

“गंभीर वगैरे काही नाही. लग्नाचा बेचाळीसाव्वा वाढदिवस येतोय, तिच्यासाठी प्रेझेंट कोणते घ्यावे हा विचार चालला होता.”

“खरंच की काय? व्वा! लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला कोणतं प्रेझेंट घेतलं होतं?

“सोन्याच्या इयर रिंग. आमच्या बजेटमध्ये तेवढंच जेमतेम बसलं.”

“आणि बत्तिसाव्या वाढदिवसाला?

“अं………… छ्या:, नाही आठवत”

“ठीक आहे, बरं, एकोणतिसाव्या वाढदिवसाला? तीन वर्षापूर्वी?

“अं…. काय बरं, अं……. नाही आठवत!”

“गंमत आहे ना? बेचाळीस वर्षापूर्वी दिलेली भेटवस्तू आठवते, पण तीन वर्षांपूर्वीची नाही आठवत!”

“हे खरं तर आहे, पण अवघडून टाकणारं आहे. हे असं का असेल?

“कदाचित एखाद्या घटनेबरोबर जोडल्या गेलेल्या उत्कट भावनांमुळे असेल. अशी घटना नेहमीच येत राहिली की तोच-तोचपणा येतो आणि त्यातली उत्कटता संपवतो – असेही असू शकते. बेच्याळीसाव्या वर्षापर्यंत लग्नाचे १५,३३० दिवस, किंवा ३,६७,९२० तास, म्हणजेच २,२०,७५,२२० मिनिटे, अर्थात १३२.४ कोटी सेकंद तुम्ही दोघे एकत्र असता, म्हणजे असे होणारच.”

“हा, हा, हा! कदाचित तसे होतही असेल.”

“मग, साहेबजी, ह्या वर्षी कोणतं प्रेझेंट घेणार?

“मला सांग, प्रेझेंट देऊनच प्रेम व्यक्त करायचं असं काहीं आहे का? मी इंटरनेटवर बघितलं, लग्नाच्या बेचाळीसाव्या वाढदिवसासाठी विशिष्ट असं काहीच प्रेझेंट नाहीये. मला वाटतं की सर्वांनाच कळून चुकलं आहे की – तू म्हणालास तसं - घटना नेहमीच येत राहिली की तोच-तोचपणा येतो आणि त्यातली उत्कटता संपवतो.”

“पण आपणच प्रत्येक घटनेत उत्कटता आणली पाहिजे असं नाही का तुला वाटत?” लुलू अत्यंत तुच्छतेने माझ्याकडे पहात बोलला. “आयुष्य असं जगायला हवं. नाहीतर कोणत्याही दोन दिवसात काहीच फरक असणार नाही.”

लुलुने पंख फडफडवले, आणि तो त्या पिवळ्या फुलांच्या झाडावर जाऊन बसला. तेव्हां काही फुले माझ्या डोक्यावर पडली. आणि काही चावा घेणाऱ्या लाल मुंग्यादेखील!

विवेक पटवर्धन