Monday, June 1, 2020

लेकुरवाळ्या महिला कामगारांचे प्रश्न कोण लक्षात घेतो?

“करोनाने काही डोकं चक्रावुन टाकणारे प्रश्न आपल्यापुढे आणले आहेत,“ अरविंद श्रौती माझ्याशी फोनवर बोलत होते (ते अनेक कामगार संघटनांचे सल्लागार आहेत). त्यांच्या बोलण्यात काळजी होती व तत्परतेने काही केले पाहिजे अशी कळकळही होती. अरविंद काही महिला कामगार नेत्यांशी बातचीत करून आले होते व लेकुरवाळ्या महिला कामगारांच्या प्रश्नांनी त्यांना अस्वस्थ केले होते. आम्ही दोन चार महिला कामगारांशी बोलून प्रश्नांचे स्वरूप समजून घ्यायचे ठरवले.
अरविंदने त्याच्या ओळखीतल्या एका महिला कामगार प्रतिनिधीशी संपर्क साधला. तिच्यामुळे दोन महिला कामगार आमच्याशी बोलायला तयार झाल्या. इतर तीन चार जणी “नाही” म्हणाल्या कारण त्यांच्या नवऱ्यानी आडकाठी केली होती. वेळ संध्याकाळी सहाची ठरली (कारण सात नंतर घरातली कामे असतात).
“आमच्या कंपनीत ३०० महिला काम करतात, त्यातल्या कित्येक महिलांना लहान मुलं आहेत. “करोना” मुळे त्यांच्या पुढे मोठा प्रश्न उभा आहे.”
“आमचे काम पहिल्या पाळीत चालायचे. सकाळी सव्वासहाला शिफ्ट चालू व्हायची. कंपनीची बस पहाटे सव्वाचारला येत असे कारण बस कंपनीत पोहोचायला दोन तास लागत. आम्ही तीन वाजता उठून आमच्या लहान मुलांना घेऊन पहाटे चारला घर सोडत होतो. कंपनीत गेलो की बाळाला पाळणाघरात ठेवायचं आणि कामाला जायचं. नोकरी करायची म्हणजे अशी तारेवरची कसरत अटळ आहे असे मनाला समजावत होतो.”
“मग करोनाची साथ आली आणि सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सगळे काम बंद झाले, पण मे २१ पासून कारखाना पुन्हा सुरु झाला.”
“कारखाना चालू झाला पण लहान मुलांना घराबाहेर आणायचे नाही अशी मार्गदर्शक सूचना सरकारने काढली आहे आणि दुसरीकडे कंपनीने पाळणाघर बंद केले आहे - आता आम्ही काय करायचे??? “
“शेजारी कुठे पाळणाघर नाही कां?” मी विचारले.
“काही आहेत, पण करोनाच्या संसर्गाची भीती आहे, तसेच त्यात भर म्हणून कित्येक पाळणाघरं अजून उघडली नाहीत. आणि उघडली तरी त्याचा खर्च काय कमी असतो?”
“किती खर्च होतो?
“महिना सरासरी पाच हजार रुपये आणि आता तर रेट वाढवतीलच. आमचा पगार बावीस हजार रुपये त्यात माझ्या वन रूम–किचन घराचे भाडे सात हजार रुपये.”
 “कित्येक महिला अश्या आहेत की त्यांच्या पतीला कायम स्वरूपी नोकरी नाही. म्हणजे मुलाला सांभाळायचे आणि नोकरीही करायची, कारण नोकरीच्या शोधात पुरुष मंडळी जातात, ती दिवसा घरात नसतातच.”
“पण आई किंवा सासू कोणी बघणार नाही का ?”
“असा सपोर्ट असणाऱ्या फारच कमी – म्हणजे जवळ जवळ नाहीच. आईला इकडे ये म्हणायची सोय नाही कारण आता गावाकडची लोक मुंबई पुण्याला घाबरायला लागली आहेत!“
“अहो, हिला विचारा, तिच्या घरमालकाने तंबी दिली आहे की बाहेरची माणसे घरी आणायची नाहीत – अगदी आई असो नाहीतर सासू – त्यांनाही संसर्गाची भीती वाटते.”
“म्हणजे सपोर्ट संपलाच म्हणायचा.”
“मुलं अडीच-तीन वर्षाची झाली की सतत इकडे तिकडे धावतात. आमच्या पासष्टी-सत्तरीतल्या आईला अशी मुलं सांभाळण तर जमतच नाही.”
“एका मैत्रिणीचा मुलगा अगदी लहान आहे, अजून आईच्या दुधावर आहे आणि घरी नवऱ्याशिवाय कोणीही नाही. त्याचीही नोकरी आहे. त्याला तिथे जायला लागते. तिने कसे कामावर जायचे? कंपनीतला पाळणाघर तर बंदच केला आहे. अशाही अनेक आहेत.”
“हे खरं आहे, आम्ही दिवसातले अकरा तास घराबाहेर असतो. कारखाना दूर आहे आणि जाण्यायेण्यात बराच वेळ जातो. आठ तासांची ड्युटी आमची.”
“कारखाना सध्या एकाच पाळीत चालतो म्हणजे सव्वासहाला घराबाहेर पडाव लागत. पण अकरा तास घराबाहेर असतो.”
“मुलांना सोडून जाता येत नाही म्हणून बिनपगारी रजा होते. बिनपगारी रजा जास्त झाली तर नोकरीवरून काढून टाकतील याची भीती.”
“आम्ही कंपनीला विनंती केली की आम्हाला एक महिना तरी बिनपगारी सुट्टी द्यावी. बिनपगारी जरी दिली तरी प्रॉब्लेम आहेतच, घर कसं चालवायचं? परंतु नोकरी तरी टिकवू असा विचार केला. त्यांनी महिनाभराची बिनपगारी सुट्टी द्यायला स्पष्ट नकार दिला आणि क्रेश (पाळणाघर) देखील बंद राहील असे म्हणाले.”
“क्रेश देखील एक भयंकर प्रकार आहे, पण आम्हाला पर्याय नाही. सातशे स्क्वेअर फुटाच्या जागेत चाळीस ते पंचेचाळीस मुलं असतात. एकाच गादीवर तीन चार मुलं झोपवतात. फक्त चारच मावश्या असतात इतक्या मुलांना संभाळण्यासाठी – त्या तरी कश्या म्यानेज करणार? एकाच ताटातून तीन चार मुलांना भरवले जाते. क्रेश दिली आम्हाला म्हणजे आमच्यावर उपकारच केले अशी भावना आहे.”
“एकीकडे नोकरी टिकवायची तर दुसरीकडे मुलांची आबाळ होऊ द्यायची नाही – म्हणजे स्पष्टच बोलायचे तर ही अक्षरश: कुतरओढ आहे.”   
“त्यातच भर म्हणून कित्येकजणींनी कंपनीतल्या क्रेडीट सोसायटीचं किंवा बँकेचं कर्ज घेतलेय, त्याचाही हफ्ता भरायचा असतो. पगार बावीस हजार, घरभाड सात हजार, कर्जाचा हफ्ता सात हजार.........”
“आणि आता कामावर या नाहीतर नोकरी गमवा” अशी परिस्थिती झालीय.”
“महिला कामगारांचे प्रश्न फार वेगळे असतात आणि त्याला कोणीच वाचा फोडित नाही, काय करायचं आम्ही??
                              *     *     *

हताश होऊन विचारलेला प्रश्न – ‘काय करायचं आम्ही ? तो ऐकणाऱ्यालाही हताशच करतो. करोनाने असे प्रश्न उपस्थित केले आहेत की त्यावर उपाय कोणत्याही कंपनीच्या एच. आर. मॅन्युअलमध्ये नाही. प्रथम पातळीवरच्या एच. आर. मॅनेजर्सच्या आवाक्याबाहेरची ही परिस्थिती आहे. जर जबाबदार अधिकाऱ्यांनी (फक्त कंपनीतलेच नव्हे तर त्यात कामगार मंत्री आणि कामगार आयुक्तदेखील मोडतात) पुढाकार घेऊन, महिला कामगार व त्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून तोडगा काढला नाही, तर कित्येक कुटुंबाना – आणि उद्योगात अशी हजारो कुटुंबे असतील – अपरिमित हानी पोहेचेल. ‘काय करायचं त्यांनी?’ ह्या प्रश्नाचं उत्तर शोधले नाही तर महिला कामगारांना त्यांच्या नोकरीला मुकावं लागेल, आणि महिला सक्षमीकरण हे केवळ कागदावरच मिरवत राहील.
केवळ कामगार नेतृत्वाचीच नव्हे, तर व्यवस्थापनातील नेतृत्वाची आणि सरकारचीदेखील ही कसोटी आहे. 

विवेक पटवर्धन             

Wednesday, April 1, 2020

व्हर्जर

(प्रख्यात लेखक सॉमरसेट मॉम यांच्या अनेक कथांतून दहा अप्रतिम कथा निवडायच्या झाल्या तर त्यात ‘व्हर्जर’चा समावेश करावाच लागेल. व्हर्जर म्हणजे बिशपचा वेत्रधारी. तो चर्चची, मुख्यत: आतल्या भागाची देखभाल करतो, चर्चमधल्या ‘सर्व्हिस’साठी अनेक कामे करतो. व्हर्जर कथेचा हा मी केलेला स्वैर अनुवाद. – विवेक पटवर्धन)

नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये नामकरण विधी दुपारीच उरकला होता, तरीही अल्बर्ट एडवर्ड फोरमनने त्याचा व्हर्जरचा पायघोळ अंगरखा उतरवला नव्हता. त्याने त्याचा नवा अंगरखा असा घट्ट घडी करून ठेवला होता की जणू काही तो अल्पाकाच्या उंची लोकरीचा नसून ब्राँझचा आहे असे वाटावे. तो त्याने मोठे विवाह समारंभ व दफन विधींसाठी राखून ठेवला होता. (नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चमध्ये असे विधी करायची फॅशनच होती.) आज त्याने तसाच दुसरा पायघोळ अंगरखा परिधान केला होता. तो पायघोळ अंगरखा म्हणजे त्याच्या चर्चमधल्या पदाचे चिन्ह होतं. आणि अल्बर्ट तो अभिमानाने मिरवत असे – इतकं की घरी जाताना तो अंगरखा काढून ठेवल्यावर जणू अपुऱ्या कपड्यात असल्याचं त्याला वाटे. अंगरख्याला तो स्वत:च इस्त्री करीत असे. चर्चेमध्ये गेली सोळा वर्षे तो ‘व्हर्जर’ होता, परंतु त्याने त्याचे जुने व जीर्ण अंगरखे कधीही टाकून दिले नाहीत तर ब्राऊन पेपरच्या पिशवीत ते व्यवस्थित घडी करून, त्याच्या कपड्यांच्या कपाटातील तळाच्या खणात नीट ठेवून दिले होते.

अल्बर्टने भराभर कामे उरकली. संगमरवरी फरशीवरल्या कोरीव कामावर लाकडी कव्हर ठेवले, कोणा अपंग स्त्री साठी खुर्ची पुढे आणली होती ती जागेवर ठेवली. वेस्ट्री म्हणजे चर्चमधील अंगरखे ठेवण्याची खोली, ती लहान-सहान कामासाठीही वापरण्यात येते, तिथुन व्हायकार (धर्मगुरू) बाहेर पडला की वेस्ट्रीतली आवरा-आवर करून त्याला घरी जायचे होते.

चर्चच्या मध्यभागी असलेल्या कठड्याजवळ धर्मगुरू गेला, त्याने मधल्या वेदीकडे जाऊन गुढघ्यात झुकून अभिवादन केले, तरीही तो त्याच्या काळा पायघोळ अंगरखा म्हणजे कॅसॉक न काढताच खाली आला होता.

‘ह्याला आता काय हवंय,’ अल्बर्ट मनातच चडफडला. ‘ह्याला समजत नाही का की चहाची वेळ झालीय, आणि आता मला चहा हवा आहे?

धर्मगुरूची नेमणूक नुकतीच झाली होती. चाळीशीतला उत्साही माणूस होता तो. पण अल्बर्टला आधीचा धर्मगुरू तिथे नसल्याची खंत वाटत होती. तो त्याच्या सुरेल आवाजात सर्मन देत असे. चर्चमध्ये येणाऱ्या उच्चपदस्थांसमवेत त्याची उठबस असे. आणि त्याच्या कधीच तक्रारी नव्हत्या. तो प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसणाऱ्या नव्या धर्मगुरूसारखा नव्हता. तसा अल्बर्ट एडवर्ड सोशिक होता. सेंट पीटर्सच्या परिसरात उच्चभ्रू लोकांची वस्ती होती. आणि नवा धर्मगुरु पूर्वेकडच्या भागातून आला होता, त्यामुळे इथल्या फॅशनेबल लोकांच्या चालीरीतींशी तो सहज जुळवून घेईल अशी अपेक्षा करणेही रास्त नव्हतं.

‘हे सर्व जमेल,’ अल्बर्ट एडवर्ड स्वत:शीच बोलला, ‘जमेल त्याला. थोडा वेळ द्यायला हवा.’

चर्चमधल्या बाकांमधल्या वाटेतून चालत धर्मगुरू अल्बर्टच्या इतक्या जवळ आला की आवाज न चढवतांही, आणि प्रार्थना स्थळात अयोग्य दिसणार नाही अश्या बेताने त्याला अल्बर्टशी त्याला बोलतां येईल.

“फोरमन, वेस्ट्रीमध्ये एक मिनिट याल कां? मला तुमच्याशी कांही बोलायचं आहे.”

“होय, सर”

धर्मगुरू व अल्बर्ट चालू लागले. “नामकरण विधी फार छान झाला, सर. आणि तुम्ही बाळाला उचलून घेताक्षणीच तो रडायचं थांबला. – गंमत वाटली मला.’

“मी बघितलंय की मी उचलून घेतल्यावर अनेकदां बालकं रडणं थांबवतात.” धर्मगुरु हसून म्हणाला. “मी तसं अनेकदां केलंय.”

किरकिरणारी बाळं धर्मगुरू अश्या रीतीने हाती उचलून घ्यायचा की ती रडायची थांबत. हे त्याचा अभिमान बळावणारंच होतं. बाळांच्या माता आणि हॉस्पिटलच्या नर्सेसना धर्मगुरूच्या सफाईचं कौतुक वाटे, आणि त्याला त्याची जाणीव होती. अल्बर्टला पक्कं ठावूक होतं की धर्मगुरूला असं केलेलं कौतुक सुखावून जात असे.

अल्बर्ट धर्मगुरूच्या मागोमाग वेस्ट्रीत शिरला. तिथे दोन चर्चवार्डन होते, त्यांना तिथे बघून अल्बर्टला आश्चर्यच वाटलं; त्यांना आत येताना अल्बर्टने पाहिलं नव्हतं. चर्चवार्डननी मान डोलावूनच अल्बर्टची दखल घेतली.  

“गुड आफ्टरनून, माय लॉर्ड, गुड आफ्टरनून, सर,” त्याने त्या दोघांना अभिवादन केलं.

ते दोघे वयस्कर गृहस्थ होते. जितकी वर्ष अल्बर्ट व्हर्जर म्हणून काम करीत होता, तितकी वर्षे ते ही चर्चवार्डन होते. अनेक वर्षांपूर्वी जुन्या धर्मगुरूने इटलीहून जेवणाचे एक सुंदर टेबल मागविले होते, त्या टेबलाजवळ ते बसले होते. धर्मगुरूने त्या दोघांमधली खुर्ची घेतली. टेबलाच्या एका बाजूस ते पण त्यांच्या समोर अल्बर्ट, दुसर्‍या बाजूस होता. पुढे काय वाढून ठेवलं आहे असा विचार करीत अल्बर्ट  अस्वस्थ झाला होता. मागे एकदा ऑर्गन वाजवणारा गोत्यात आला होता तेव्हां त्यांना त्या प्रकरणावर पडदा टाकताना किती त्रास झाला होता ते अल्बर्टच्या अजूनही स्मरणात होतं. नेव्हिल स्क्वेअरच्या सेंट पीटर्स चर्चेमध्ये एखादी भानगड उपटणं त्यांना परवडणारे नव्हतं. धर्मगुरूच्या लालसर चेहऱ्यावर सौम्य व तरीही कांही निश्चय केल्याचे भाव होते, तर ते दोघे चर्चवार्डन त्रासलेलेच दिसत होते.

‘तो ह्या दोघांच्या मागेच लागला असणार,’ अल्बर्टने विचार केला. ‘त्याने ह्या दोघांना काहीतरी करायला भाग पाडलंय, आणि त्यांना ते जराही आवडत नाही, असं दिसतंय – हे तर नक्कीच.’

पण त्या भावना अल्बर्टच्या चेहऱ्यावर उमटल्या नाहीत. तो त्यांचा मान ठेवून उभा होता, पण त्याच्या देहबोलीत अगतिकता नव्हती. चर्चमध्ये नोकरी मिळण्यापूर्वीही त्याने कामे केली होती पण ती फक्त चांगल्या ठिकाणीच; आणि त्याची वर्तणूक कधीच आक्षेपार्ह नव्हती. साध्या कामावर सुरवात करून त्याने भराभर प्रगती केली; तो एका सरदार घराण्यातील विधवेकडे बटलर होता. नंतर एका निवृत्त राजदूताच्या घरी त्याने बटलरचे काम केले तेव्हां त्याच्या हाताखाली दोघे कामाला होते. हे सर्व सेंट पीटर्समध्ये व्हर्जरचे पद रिक्त होण्यापूर्वी. अल्बर्ट उंचापुरा होता. तो विचारशील होता आणि स्वत:चा आब राखून असे. तो राजबिंडा दिसत नसेलही, पण राजघराण्यातील व्यक्तींची भूमिका करणाऱ्या एखाद्या कसलेल्या नटासारखा दिसत असे हे नक्कीच. तो चतुर आणि निश्चयी होता आणि त्याच्याजवळ आत्मविश्वास होता. त्याच्या चारित्र्याबद्दल तर संशयालाही जागा नव्हती.

धर्मगुरूने लगेच सुरवात केली, म्हणाला, ‘फोरमन, आम्ही जे तुमच्याशी बोलणार आहोत ते कटू आहे. तुम्ही इथे अनेक वर्षं काम करीत आहात. आणि तुम्ही नेमून तुमचं काम इमाने इतबारे व सर्वांची मर्जी राखून केलंय यात शंकाच नाही. इथे बसलेले लॉर्ड व जनरलसाहेब यांचही असंच मत आहे.’

दोन्ही चर्चवार्डननी सहमती दाखवली.

“पण एक विलक्षण गोष्ट मला नुकतीच कळली, आणि ती दोन्ही चर्चवार्डनच्या नजरेस आणून देणं माझं कर्तव्य होतं. मला हे समजल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला की तुम्हाला लिहिता वाचता येत नाही!”

अल्बर्टच्या चेहऱ्यावर जराही अवघडलेपणा दिसला नाही.

“आपल्या आधी असलेल्या धर्मगुरुंना हे ठाऊक होतं, सर,” अल्बर्ट म्हणाला. “ते म्हणाले होते की त्याने कांहीच फरक पडत नाही. ते नेहमीच म्हणत की जगात शिक्षणाचा फारच बाऊ केला जातोय.

“मी तर हे कांहीतरी विलक्षणच ऐकतोय!” जनरल म्हणाले. “म्हणजे सोळा वर्षे इथे व्हर्जरचे काम करीत आहात, पण लिहा-वाचायला शिकलाच नाही?

“मी बाराव्या वर्षापासून कामाला लागलो. इथे आल्यावर इथल्या कुकने प्रथम मला धडे दिले, पण मला कांही ते जमलेच नाही, आणि मग ते राहूनच गेले ते राहिलेच. मलाही त्याची उणीव भासली नाही. मला वाटतं की हल्लीची बरीचशी तरुण मंडळी वाचन करण्यात वेळेचा अपव्यय करतात त्यापेक्षा कांहीतरी उपयुक्ततेचं काम त्यांनी करायला हवे.”

“पण कधी तुम्हाला बातम्या वाचाव्याश्या वाटल्या नाहीत?” दुसरा चर्चवार्डनने विचारले. “कधी पत्र लिहावेसे वाटले नाही?

“नाही, माय लॉर्ड. माझं त्याशिवायही चांगलं निभावलं. आणि पेपरात येणाऱ्या फोटोवरून काय चाललंय ते बऱ्यापैकी समजतं. माझी पत्नी सुशिक्षित आहे, त्यामुळे मला पत्र लिहायचं असलं तर ती माझ्यासाठी लिहिते.”

दोन्ही चर्चवार्डननी धर्मगुरूकडे चिंतीत नजरेने पाहिलं व खाली मान घालून ते बसले.

“असं पहा, फोरमन, मी ह्या दोघांशी बोललो आहे, आणि ही परिस्थिती अवघडच आहे असं त्यांचंही माझ्यासारखंच मत आहे. नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्स चर्चसारख्या जागी ज्याला लिहिता-वाचतां येत नाही असा व्हर्जर आम्ही ठेवूंच शकत नाही.”

अल्बर्ट एडवर्ड लालबुंद झाला, त्याची चलबिचल झाली, पण त्याने उत्तर दिले नाही.

“समजून घ्या फोरमन, मला तुमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाहीये. तुम्ही चांगलं काम करताय आणि मला तुमच्या चारित्र्याबद्दल पूर्ण खात्री आहे. परंतु तुमच्या अज्ञानामुळे न जाणो एखादी दुर्घटना होऊन देणे आमच्यासाठी रास्त होणार नाही. हा केवळ खबरदारीचाच प्रश्न आहे असं नाही, तो तत्वाचाही प्रश्न आहे.”

“पण, तुम्ही शिकू शकणार नाही कां?” जनरलने विचारले.

“नाही सर. आता ते जमण्यासारखं नाही. मी आता पूर्वीसारखा तरुण राहिलो नाही, आणि तेंव्हा मी उत्साही असताना मला ते जमलं नाही, तर आत्ता जमेलसं वाटत नाही.”

“तुमच्याशी कठोरपणे वागायचा इरादा नाहीये, फोरमन,” धर्मगुरू म्हणाले, “पण चर्चवार्डन आणि मी, आम्ही याबाबत ठाम निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला तीन महिन्यांची मुदत देतो – तीन महिन्याअखेर जर तुम्ही लिहू-वाचूं शकला नाहीत तर आमचा नाईलाज होईल, पण तुम्हांला नोकरीवरून जावे लागेल.”

अल्बर्टला नवा धर्मगुरू कधीच आवडला नव्हता. त्याला सेंट पीटर्सला आणण्यात चूक झाली आहे असेच तो म्हणत असे. अल्बर्ट ताठरला. त्याला स्वत:च्या क्षमतांची जाणीव होती, व किंमतही; तो त्यांना स्वत:वर कुरघोडी करून द्यायला तयार नव्हता.

“माफ करा सर, हे जमण्यासारखं नाहीये. मी नवं कांही शिकेन असं माझं वय आता राहिलं नाही. मी इतकी वर्षे लिहिता-वाचतां न येतांही – मला ना स्वत:ची तारीफ करायची ना शिफारस – मला दैवाने ज्या परिस्थितीत ठेवले त्यातही मी माझे कर्तव्य व्यवस्थित पार पाडले आहे. आता माझी शिकायची तयारी नाही.”

“असं असेल तर, फोरमन, तुम्हाला जावं लागेल.”

“होय सर, ते समजलंय मला. तुम्ही माझ्या जागेसाठी दुसरा कोणी निवडलात की मी राजीनामा देऊन निघून जाईन.”

अल्बर्टने धर्मगुरू व चर्चवार्डन बसले होते तिथला चर्चचा दरवाजा त्याच्या संवयीच्या विनम्रतेने लावून घेतला, आणि मग त्याला संयम राखता आला नाही. आतापर्यंत त्याने धीराने वार झेलला होता. पण आता तो पवित्रा राहिला नाही. त्याचे ओठ कांपू लागले, तो वेस्ट्रीकडे पुन्हा गेला, आणि नेमलेल्या खुंटीवर त्याने त्याचा अंगरखा टांगला. त्याला दिमाखाने झालेले लग्नसमारंभ आठवले, तश्याच मोठ्या अन्त्ययात्राही. त्याने एक उसासा टाकला, आवरा-आवर केली आणि चर्चचा दरवाजा बंद केला. तो चालत चौकात आला. त्याच्या दु:खात आणि विचारात तो गढून गेला होता. आणि चौकात आल्यावर घरी जाण्यासाठी (घरी गरमागरम कडक चहा त्याची वाट पाहत होता) जिथे वळायला हवे होते तिथे तो वळला नाही, त्याने चुकीचे वळण घेतले. तो शांतपणे चालत होता, त्याला भरून आले होते. आता काय करायचे हा प्रश्नच होता, कांहीच कल्पना नव्हती. इतकी वर्षे त्याने स्वतंत्रपणे काम केले होते, आता पुन्हा लोकांच्या घरी कामासाठी जाण्याचा त्याचा इरादा नव्हता. धर्मगुरू व चर्चवार्डन कांहीही म्हणोत, परंतु त्याने चर्चचा कारभार व्यवस्थितपणे चालवला होता आणि आता मानहानीकारक परिस्थितीला शरण जाणं त्याला मंजूर नव्हतं. त्याने बऱ्यापैकी पैसा गांठीस बांधला होता, तरीही केवळ तेवढ्यावर कांही न करतां उर्वरित आयुष्य काढणं शक्यच नव्हतं, आणि खर्चही वर्षागणिक वाढत होता. असे जगण्याचे प्रश्न आत्तापर्यंत त्याच्या मनाला कधी शिवलेही नव्हते. सेंट पीटर्सचा व्हर्जर, रोममधल्या पोपप्रमाणेच, जिवात जीव असेपर्यंत, चर्चचेच होते. अल्बर्ट एक दिवास्वप्न पाहत असे: तो जग सोडून गेल्यावर रविवारच्या सायंप्रार्थनेत धर्मगुरू अल्बर्ट एडवर्ड फोरमनच्या इमानदारीने केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल तसेच त्याच्या आदर्शवत् चारित्र्याबद्दल बोलतोय. त्याने उसासा टाकला. अल्बर्ट दारू पीत नसे, आणि धूम्रपानही करीत नसे – पण त्याला छोटे अपवाद होते. रात्रीच्या जेवणाबरोबर त्याला एक बियरचा ग्लास घ्यायला आवडत असे, आणि कधी थकून-भागून आल्यावर एखादी सिगारेटही. पण आज त्याच्या खिशात आज सिगारेट नव्हती. सिगारेट जरा ताण हलका करेल असं वाटून गोल्ड फ्लेकचं पाकीट घेण्यासाठी तो दुकान शोधत राहिला. त्याला एकही दुकान दिसलं नाही. तो थोडं अंतर पुढं गेला. तसा तो रस्ता बराच मोठा होता, - तिथे अनेक प्रकारची दुकाने होती, पण एकही दुकान असे नव्हते जिथे सिगारेट मिळावी.

“गंमतच आहे” अल्बर्टला वाटलं.

खात्री करून घेण्यासाठी त्याने पुन्हा एकदा रस्ता वर-खाली धुंडाळला. एकही सिगारेटचे दुकान त्या रस्त्यावर नव्हते यात शंकाच उरली नाही. तो थांबला आणि विचार करू लागला.

“या रस्त्यावर चालताना सिगारेट ओढावीशी वाटणारा कांही मी एकटाच असुं शकत नाही.” तो विचार करीत होता. “इथे छोटेसे सिगारेट-चॉकलेटचे दुकान कसे चालेल …. चांगलेच चालेल बहुधा.”

आणि तो निघाला. “मस्त कल्पना आहे,” तो स्वत:शीच पुटपुटला. “किती अनपेक्षितपणे कल्पना सुचतात – आश्चर्यच म्हणायचे.”

तो घराकडे वळला. तिथे त्याच्यासाठी चहा तयार होता.

“आज तुम्ही अगदी गप्प कसे?” त्याची पत्नी म्हणाली.

“मी विचार करतोय”

त्याने त्या कल्पनेचा सर्वंकष विचार केला. दुसर्‍या दिवशी तो पुन्हा त्या रस्त्यावर गेला, आणि त्याचं नशीब असं की त्याला जसं हवं होतं तसंच एक छोटं दुकान भाड्याने देणं होतं. दुसर्‍या दिवसाअखेर ते घेतलंही. नेव्हिल स्क्वेअरमधल्या सेंट पीटर्सला रामराम ठोकल्यापासून महिन्याभरातच अल्बर्ट एडवर्डने सिगारेट, चॉकलेट-टॉफी व वर्तमानपत्रे-मासिके विकायचा व्यवसाय उभा केला. त्याची पत्नी म्हणाली की चर्चेच्या व्हर्जर पदानंतर असा व्यवसाय करणं म्हणजे अगदी खालच्या पातळीवर घसरणं आहे; पण अल्बर्ट उत्तरला की चर्च आता पूर्वीसारखं राहिलं नाही.

अल्बर्टला व्यवसायात चांगलंच यश मिळालं. वर्षभरात त्याचा व्यवसाय इतका फळफळला की दुसरं दुकान घेऊन त्यात मॅनेजर नेमावा असं त्याला वाटू लागलं. मग त्याने अजून एक रस्ता शोधला ज्याच्यावर सिगारेट-चॉकलेटचं दुकान नव्हतं. तिथेही त्याने एक दुकान भाड्याने मिळवलं. हे दुसरं दुकानही चांगलं चालू लागलं. त्याच्या ध्यानी आलं की जर तो दोन दुकानं चांगली चालवू शकतो, तर त्याला अर्धा डझन दुकानेही अशीच चालवता येतील. मग त्याने लंडनमधले असे रस्ते शोधले जिथे दूरवर सिगारेट-चॉकलेटचं दुकान नव्हतं. तिथे त्याने दुकाने भाड्याने घेतली आणि चांगलाच जम बसवला. बघता बघता दहा वर्षात त्याची दहा दुकाने झाली. तो दर सोमवारी प्रत्येक दुकानात जाई व मागील आठवड्याची कमाई बॅंकेत भरत असे.

एके दिवशी नोटांचा जुडगा आणि नाण्यांची जड थैली घेऊन तो बॅंकेत भरायला गेला तेव्हां कॅशियरने सांगितले की मॅनेजर त्याला भेटू इच्छितात. मॅनेजरच्या ऑफिसमध्ये त्याला कोणीतरी नेलं आणि मॅनेजरने त्याचे स्वागत केले.

“मिस्टर फोरमन, आमच्या बॅंकेत तुमची जी जमा आहे त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला कल्पना आहे काय की किती रक्कम तुमच्या अकौंटमध्ये आहे?”

“अगदी अचूक नाही सांगू शकणार पण दोन चार पौंडांच्या फरकाने मी सांगू शकतो. मला स्पष्ट कल्पना आहे की बॅंकेत माझे किती पैसे जमा आहेत.”

“आज तुम्ही ठेवलेली रक्कम वगळता, तीस हजार पौंडाहूनही थोडे अधिकच आहेत. ही घसघशीत मोठी रक्कम आहे. मला वाटतं तुम्ही नीट गुंतवणूक करावीत.”

“मला कुठचाही धोका पत्करायचा नाहीये. आणि मला ठाऊक आहे की माझे पैसे तुमच्या बॅंकेत सुरक्षित आहेत.”

“त्याबद्दल अजिबात काळजी नको. आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सिक्युरिटीजची यादी देऊ. त्यात गुंतवणूक केली म्हणजे तुम्हाला उत्तम दराने व्याज मिळेल.”

अल्बर्ट एडवर्ड फोरमनच्या चेहऱ्यावर काळजी उमटली. “मी स्टॉक्स व शेअर्सपासून कटाक्षाने दूर राहिलो आहे. मला ते सर्व तुमच्यावर सोपवावं लागेल.”

“आम्ही सर्वकांही करुं. पुढच्या वेळी तुम्ही इथे याल तेव्हां फक्त एकच करायचं – ते म्हणजे गुंतवणुकीसाठी पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी सह्या.”

“मी ते करीनही” अल्बर्ट चाचरत बोलला. “पण मी कशावर सह्या करतोय ते मला कसं समजणार?

“तुम्हाला वाचतां तर येतंय ना?” मॅनेजर जरा तिखटपणेच बोलला.

फोरमन त्याच्याकडे बघून हसला. “सर, तीच तर गोम आहे. मला नाही वाचतां येत, हे विचित्र वाटेल तुम्हाला, पण वस्तुस्थिती आहे. मी लिहू-वाचूं शकत नाही. फक्त माझं नांव लिहू शकतो आणि ते देखील मी या व्यवसायात आल्यापासून.”

मॅनेजर तर उडालाच, तो उठून उभा राहिला.

"अत्यंत विलक्षण! याहून अधिक विलक्षण मी कधीच कांही ऐकलं नाहीये."

"ते असं आहे सर, मला शिकायची संधी मिळाली तेव्हां फार उशीर झाला होता, आणि त्यानंतर मी शिकायला नकार दिला - मी त्याबाबत कांहीसा आडमुठेपणा केला म्हणाना."

“आणि तुम्ही मला सांगताय की तुम्ही हा मोठ्ठा व्यवसाय उभा केलात, तीस हजार पौंडांची माया जमवलीत ती एक अक्षरही न लिहिता-वाचतां? अरे देवा! अहो, तुम्हाला लिहिता-वाचतां येत असतं तर आज तुम्ही कोण असतांत?”

“हां, ते मी तुम्हाला सांगू शकतो, सर” फोरमनच्या अमिरी चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. “मी नेव्हिल स्क्वेअरच्या सेंट पीटर्स चर्चचा व्हर्जर असतो!”

                        *     *     *     *

विवेक पटवर्धन 

Wednesday, March 4, 2020

आरोहन आणि आदिवासींच्या जटील समस्या


आरोहनच्या कामाची माहिती करून घेणे ओघानेच आले, कारण आरोहनने विश्वस्त म्हणून त्यांच्या समितीत मला सामावून घेतले. जव्हार-मोखाडा हे आरोहनचे कार्यक्षेत्र. जव्हारला जायचं म्हणजे मनोरपुढे उजवीकडे निघणारा विक्रमगडचा रस्ता धरायचा. तिथून पुढे जव्हार. अंतर तसं फार नाहीये, पण रस्ता इतका खड्डेवाला की आपला उत्साह निम्माशिम्मा व्हावा. किंवा आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय त्याची जाणीव करून देणारा. कारण खड्ड्यांनी बसणारे धक्के सौम्य म्हणावेत असे धक्के खेड्यातील परिस्थिती पाहता बसतात.

जव्हारला आरोहनचे कार्यालय आहे तिथलं काम उरकून धारेच्या पाड्याकडे निघालो. तुम्ही जर ‘धारेचा पाडा’ असा गुगलवर शोध घेतलात तर तुम्हाला काहीही माहिती मिळणार नाही. धारेचा पाडा साखरी ग्राम पंचायतीत मोडतो. इथली वस्ती तर आदिवासींचीच आणि ती ही अगदी थोडी. कोणी तरी म्हणाले की हजारहून अधिक नाहीये. मला तर वाटलं की तेव्हढीही नसावी.

“तिची स्कूटर दिसत्ये म्हणजे रेश्मा पोचली आहे; इथेच ‘माता-बैठक’ आहे.” माधुरी म्हणाली. गाडी थांबली. समोरच एक छोटं आणि बैठं घर होतं, आत गेल्यावर ध्यानात आलं की ते एक छोटं सभागृह होतं. म्हणजे एक खोलीच. केवळ ह्याच कारणासाठी बांधलेली! साधारण १८ बाय १८ ची. आत ‘माता-बैठक’ चालली होती. रेश्मा वीस-पंचवीस आदिवासी महिलांना माहिती देत होती. काही महिला त्यांची मुले घेऊन आल्या होत्या. मी, माधुरी व डॉ. शुभा त्यांच्यात सामील झालो. माधुरी विविध प्रोजेक्टवर देखरेख करते तर डॉ शुभा म्हणजे आरोहनच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर.

मोखाड्यात १६९ बालकांचा कुपोषणामुळे मृत्यु झाल्याची बातमी २००६ साली आली तेव्हा अंजली कानिटकर व डॉ हेलन जोसेफ यांनी त्वरित ‘आरोहन’ची स्थापना केली ती जव्हार मोखाड्यात आदिवासींच्या पाड्यात जाऊन त्यांच्या स्वास्थ्यासाठी काम करायच्या उद्देशाने. (अनेक प्रश्नांचे पदर एकमेकात गुंतलेले असल्यामुळे केवळ ‘स्वास्थ्य’ किंवा ‘आरोग्य’ अश्या एकाच प्रश्नावर काम करून भागणार नव्हते, तर सर्वांगीण विकासावर लक्ष्य केंद्रित करावे लागणार होते, त्यामुळे कामाची दिशा नंतर बदलण्यात आली.)

“हे माता-बाल सुरक्षा कार्ड. नोंदणी झाल्यावर लगेच मिळते. ही तर गरोदरपणाची कुंडलीच आहे!” रेश्मा माता-बैठकीतल्या स्त्रियांना सांगत होती. “नोंदणीपासून डिलिवरी व लसीकरणापर्यंत सर्व माहिती त्यात असते.”



“हे तीन रंग बघा, हिरवा, पिवळा आणि लाल. काय वाटतं तुम्हाला? तुमचं बाळ ह्यापैकी कुठल्या रंगात असलं पाहिजे?

“हिरव्या”

“फार छान. आपलं बाळ हिरव्या रंगात येण्यासाठी काय करावं लागेल?” रेश्माने रोख आता आहाराकडे वळवला. सुदृढ बालकाला आहार ‘तिरंगा – लाल रंगाचे टोमाटो, गाजर, पांढऱ्या रंगाचे दुध, भात, अंडी व हिरव्या भाज्या – असा तिरंगा आहार कसा द्यावा ते रेश्मा सांगू लागली.तिरंगा आहार घ्यायला तुम्हाला लांब जायची जरूर नाही, हे सर्व घटक तुमच्या आजूबाजूला आहेतच.”

“इथे अजूनही अनेक बालकं अंडर-वेट असतात.” शुभा मला म्हणाली. “प्रश्न केवळ आहाराचाच नाही तर चुकीच्या समजुतींचा देखील आहे. आदिवासी समाजात अनेकदा गरोदर स्त्रिया पेज पिऊन राहतात. मग त्या ‘अॅनिमिक’ होतात. कसे आरोग्य राहिल त्यांचे; कशी वाढ होईल बाळाची?


तुम्ही इंटरनेटवर शोधलं तर टाटा सामाजिक संशोधन संस्थेतील दोघांचा एक अभ्यासपूर्ण लेख सापडेल. ‘२००५ मध्ये केवळ पालघर जिल्ह्यातच ७१८ बालकांचा मृत्यू कुपोषणामुळे झाला. २०१६ मध्ये ६०० पेक्षा अधिक मुले दगावली.’ त्या दोघा संशोधकांनी ३७५ मुलांचा अभ्यास केला. त्यात ५९% मुलांची वाढ खुंटली असल्याचे निष्कर्ष त्यांनी काढले.[1]

“इथे मुलींचे शिक्षण फार होत नाही. सातवीनंतर अनेकदा शिक्षण थांबतेच. मुलगी पंधरा सोळा वर्षांची झाली की तिचे लग्न होते. मग ती गरोदर राहते. हे सर्व मोठेच प्रश्न आहेत.”

“काल-परवांच पेपरात वाचलं की चौदा-पंधरा वर्षांची मुलगी आश्रम शाळेत गरोदर राहिली.”

“आश्रम-शाळेत मुले मुली एकत्र शिकतात, आणि तिथेच राहतात. तिथे मुलीने गरोदर होणे हे काही आश्चर्यकारक नाही. अनेकदा अश्या मुलींची लगेच लग्ने लावून दिली जातात. त्यांच्या समाजात तो फार मोठा विधी नसतो. मुलगी एक दिवशी मुलाच्या घरी जाते, बस्स!”

“इथे माता-बैठकीत ती मुलगी बघा. तिच्या हातात बाळ आहे. ती आई तर सोळा वर्षांची असेल-नसेल.”

“त्यांचंही कुपोषण होतं. अनेकदा अश्या मुली आपलं वय अठरा सांगतात. तरीही असं वाटतं की त्या लहान आहेत. लहान वयात माता होण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. केवळ सामाजिकच नव्हे तर शारीरिक देखील.”


रेश्मा महिलांशी त्यांच्या समस्यांबद्दल बोलू लागली. चतुराईने तिने चर्चा ग्रामसभेकडे वळवली आणि ‘महिला ग्रामसभेचे’ आयोजन करण्याचे महत्त्व पटवून दिले. पण मोठ्ठा अडसर तर महिलांनी आपल्या प्रश्नाबाबत बोलू लागण्याचा होता. रेश्मा महिलांचं मन वळविण्यात कांही प्रमाणात तरी यशस्वी ठरली, त्या बोलू लागल्या पाण्याच्या प्रश्नावर! “असे प्रश्न सोडवायलाच ग्रामसभा व पुढे ग्राम-पंचायत असते.”

महिलांनी सभेत बोलणे हा एक त्यांच्या मनातला मोठ्ठा अडसर आहे. तो पार करणे सोपे नक्कीच नाही.

आता रेश्माने चर्चेचा रोख स्थलांतराच्या समस्येकडे वळवला. आदिवासींच्या पाड्यात स्थलांतर ही एक प्रचंड मोठी समस्या आहे. केवळ शेतीवर जगता येत नाही, मग एक पीक काढले की शहराच्या दिशेने कूच!

“स्थलांतर अनेक रीतीने आयुष्य कुरतडते. कित्येक जण आपल्या वृद्ध माता-पित्यांना मागे सोडून जातात. मुलांच्या शिक्षणावर पाणी सोडावे लागते, आणि आरोग्याची आबाळ होते. संपूर्ण खेड्याच्या ‘इकोनोमीवरच अपरिमित दुष्परिणाम होतोय.”

“आरोहनने शेतकऱ्यांना दुसरे पीक कसे घेण्यासाठी मार्ग दाखवले आहेत, मदत केली आहे. आज कित्येक शेतकरी तसे दुसरे पीक काढत आहेत.”

“काही विशिष्ट भागातील स्थलांतर पन्नास टक्के कमी करण्याचा मनसुबा आरोहनने ठेवला आहे, आणि ते देखील एक आवाक्याबाहेरचं उद्दिष्ट वाटतंय, यावरूनच कल्पना करा.”

मला आठवलं, रोटरीतर्फे आम्ही भिवंडीजवळ एक बंधारा बांधत होतो. मी बांधकाम चालू असताना तिथे गेलो तेव्हा तीन फुटाच्या काठ्या उभ्या करून कित्येक मजुरांनी संसार मांडला होता. “ते शेतीची कामं संपली की इथे कामासाठी येतात. होळीला परत आपल्या गांवी जातात,” बांधकाम कंत्राटदार मला सांगत होता. परतीच्या वाटेवर मी एका झाडाखाली स्थलांतरित कुटुंबाने थाटलेला संसार बघितला.



मी चालत्या गाडीतूनच फोटो काढला. माझ्यासारख्या शहरी वास्तव्य करणाऱ्यांना स्थलांतराचा प्रश्न किती मोठ्ठा आहे हे समजायला प्रत्यक्ष भिवंडी, मोखाडा अश्या भागात फिरायला हवे, आकडेवारी प्रश्नांची माहिती देते, पण त्याबाबत जाणीवा वाढवत नाही.

अत्यंत अस्वस्थ करणारी आणि गुंतागुंतीची परिस्थिती मी पहिली, आणि ती  आपल्या समोर ठेवली आहे. कितीही काम केलं तरीही अपुरेच पडणार आहे. तरीही एकत्र येऊन ठोस पावलं उचलावीच लागतील. ते अपरिहार्यच आहे.

सरकार ही जगातली सर्वात अकार्यक्षम संस्था आहे यात वादच नाही. मग ते कोणत्याही पार्टीचे असो. अनेक कार्यक्रम पेपरवर आहेत, पण लाभार्थी त्यापासून वंचित आहेत हेच कटू सत्य आहे. आरोहनसारख्या संस्था कार्यरत आहेत हा दिलासा असला तरीही मुंबईपासून केवळ दीडशे किमीवर इतकी भयाण परिस्थिती असावी हा नेत्यांनी, व्यक्तींनी आणि समाजानेही कूपमंडूक वृत्ती ठेवल्याचा आणि आत्मकेंद्रित असल्याचा परिणाम आहे यात शंकाच नाही.

विवेक पटवर्धन



[1] https://journals.plos.org/plosone/article/file?id=10.1371/journal.pone.0212560&type=printable

Sunday, March 1, 2020

जीवन मरणाच्या कांट्यावर शेड्याचा पाडा


आरोहनसाठी काम करताना मी जे पाहतो ते मला अगदी हलवून टाकते. आरोहन (आरोहण नव्हे) ही एक जव्हार – मोखाडा भागात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे.

आरोहन स्थापन व्हायला एक दुर्घटना कारण झाली. पंधरा वर्षापूर्वी मोखाड्यात १६९ बालके कुपोषणाने मृत्यू पावल्याची बातमी आली तेव्हां तिथल्या समाजात जाऊन काम करायचे ठरले, आवश्यकच होते ते. आदिवासी गटांच्या समवेत काम करून परिवर्तनाची ठोस पावले उचलण्यासाठी आरोहन काम करीत आहे.

मी कुर्लोदला माधुरी, गणेश – ते दोघे आरोहनसाठी काम करतात – आणि सुलभा, माझ्या पत्नीसोबत, गेलो. जव्हारपासून मोखाड्याच्या रस्त्यावर जाताना एक उजवीकडे फाटा येतो, तिथे वळून बरेच अंतर डोंगर-दऱ्यातून गेल्यावर आपण कुर्लोद्ला येतो. नऊ पाड्यांचे कुर्लोद गाव आहे. हे पाडे म्हणजे दहा ते तीस-पस्तीस घरांची वस्ती आहे. आम्ही पेठेच्या पाड्याला उतरलो. गाडी तिथेच ठेवली. ‘पुढे पायी जायचे आहे’ माधुरी म्हणाली. आम्हाला शेड्याच्या पाड्याला जायचे होते. माधुरी आणि गणेशने आमच्यासाठी तिथल्या लोकांबरोबर भेटी ठरवल्या होत्या. (त्या भेटींबाबत मी नंतर लिहिणार आहेच).

शेड्याचा पाडा अदमासे दोन किमी दूर आहे, पण तिथे जायला ‘पिंजल’ नदी पार करावी लागते. नदीचं पात्र मोठं असलं तरी ती बारमाही नाही, आम्ही नदीच्या कांठी पोचलो तेव्हां नदीत फार पाणी नव्हतं.


परंतु नदी पार करायची तर पात्रातल्या खडकांवरून स्वत:ला सांभाळत जायची कसरत करावी लागते. नदी पार केली की एक अगदी लहानसा चढ लागतो, थोडं पुढे गेलो की आपण जांभूळवाडीला येतो. शेड्याचा पाडा त्यापुढे आहे, तिथे पोहोचायला अधिक थोडं चालायला हवं. पावसाळ्यात शेड्याचा पाडा आणि जांभूळवाडी एका बाजूला व पेठेचा पाडा दुसर्‍या बाजूला - मध्ये पिंगल नदी दुथडी वाहत असते, त्यामुळे त्यांचा संपर्क पेठेच्या पाड्याशी तुटतो. जगाशीच तुटतो म्हणाना. कारण शेड्याच्या पाड्यामागे मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या जिवाशीच खेळ असतो.

सरिता व मीनाक्षीने आमच्यासाठी भेटीसाठी सर्व तयारी केली होती. भेटी संपवून आम्ही परत निघालो. नदीवर पोहोचायच्या आधीच आम्हाला जांभूळवाडीपाशी दोघे जण भेटले. ते माधुरी व सरिताबरोबर कांही बोलले. ते चिंतेत दिसले. 




“एक माणूस बराच आजारी आहे, त्याला तात्काळ इस्पितळात न्यायला हवं. ते विचारत होते की आपली गाडी मिळू शकेल कां त्याला न्यायला?

“मग तू काय उत्तर दिलंस?

“मी हो म्हणाले. तो सिरीयस आहे, मग त्याला मदत करायलाच हवी.”

“आपली गाडी तर पेठेच्या पाड्यात आहे. ते नदी कशी ओलांडतील? पेशंट चालू शकेल का?

“ते त्याला झोळीत घालून आणतील. नेहमी तसेच करतात. दुसरा कांहीच मार्ग नाही.”

आम्ही निघालो. नदी पार करून चार पावले चाललो. माधुरीमागे वळून म्हणाली, “ते पहा ते त्याला घेऊन आलेच की आपल्या मागे.”




ते नदी झपाझप पार करत होते. मला नदी पार करताना दगडांवरून तोल सांभाळत जावे लागले होते, तर ते जणू हायवेवरून चालत होते. दोघांनी एक मोठी काठी खांद्यावर घेतली होती व त्यावर एक झोळी होती. त्यात त्यांचा रुग्ण होता. म्हणजे त्यांच्या खांद्यावर कमीतकमी पन्नास किलोचे ओझे होते, तरीही ते झपाझप पावले टाकीत निघाले होते. आणि ते देखील अनवाणी पायांनी.

मी खिशात हात घालुन मोबाईल काढला. त्यांचा व्हिडिओ काढला.



“कुठे जातील हे लोक?” मी माधुरीला विचारले.

“इथून वीस किलोमीटरवर इस्पितळ आहे. तिथे घेऊन जातील ते आपल्या गाडीतून. मग आपली गाडी आपल्याला न्यायला परत येईल.”

“पावसाळ्यात नदी ओलांडणं शक्य नाही, अशी वेळ आली तर ते काय करतात?

“काहीच करता येत नाही. रुग्णाने जगावं की मरावं हे तो ‘उपरवाला’ ठरवतो.” तिने आभाळाकडे बोट दाखवले.

“इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशी तजवीज आहे. २०१४ पासून ते मंजूर झाले आहे. पण अजून कांहीच झाले नाही.”

“येईलच ते, आपण आशा सोडू नये” कोणीतरी म्हणाले.

“तोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न ही नदीच सोडवेल”

आमची गाडी त्या रुग्णाला देतां आली, या जाणि‍वेनी मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आमची गाडी उपलब्ध असणं हा तर केवळ योगायोग होता.

आम्ही पाड्याकडे निघालो. कोणी एक शब्दही बोलले नाही. हतबलतेने मन ग्रासून टाकले होते.

विवेक पटवर्धन

ता.क. ही सत्य घटना आहे, त्या रुग्णाला नंतर नाशिकच्या इस्पितळात हलवण्यात आले.