Thursday, May 16, 2019

आणि बुद्ध हसला.....


[जव्हार मोखाडा विभागात भरीव कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थात 'आरोहन' महत्वाची गणली जाते. त्यात कार्यरत असणाऱ्या अनिता पगारे यांचा हा लेख आरोहांच्या ठोस कार्याची तसेच गावकऱ्यांचे प्रश्न किती बिकट आहेत त्याची जाणीव करून देतो.]

मोखाडा तालुक्यामधील ४४ किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले ‘आमले हे गांव. गावाच्या सभोवताली नदी नाल्याने व निसर्गाने नटलेले ३२२ लोकसंख्या व ७२ कुटुंब संख्या असलेले हे गाव जिथे अनुसूचित जमाती पैकी, ठाकूर(म), वारली, कातकरी समाजातील लोक राहतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावामध्ये कुठल्याही प्रकारची सोई सुविधा व गाव विकासाची कामे झाली नव्हती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उदर निर्वाहासाठी बाहेरगावी मजुरी करण्यासाठी स्थलांतरित होत होते. आदिवासी हा ही माणूस आहे, त्यालाही माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव नव्हती तेव्हाची ही सर्व परिस्थिती.

     सन २०१२ साली प्रथमतः ‘आरोहन सामाजिक संस्थेने या गावात पाऊल टाकले व गावातील समस्या व परिस्थितीची पडताळणी करुन या गावामध्ये गाव विकासासाठी शिक्षण, आरोग्य, उपजीविका व प्रशासन या विषयावर काम करण्यास सुरुवात केली. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा आहेत त्या कशा तरी भागवल्या जात होत्या पण आमले गावामध्ये अंधार असल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. उदा. सर्पदंशामुळे मृत्यू, आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे बालमृत्यू तसेच माता मृत्यू होत होते. या समस्या सोडवण्याच्या विचारात प्रथम या गावात ‘विद्युत पुरवठा आवश्यक आहे हे लक्षात आल्यानंतर ‘आरोहन आणि ‘सिमेन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आशा प्रकल्पांतर्गत आमले गावात १२ किलो वॅटची सोलर सिस्टीम बसवण्यात आली. यातून निर्माण होणाऱ्या विजे मुळे प्रत्येक घरात दोन बल्ब आणि गावातील रस्त्यांवर २० सोलार दिवे बसवण्यात आले. यातूनच विहिरीवरील मोटार चालविली गेली ज्यामुळे गावाबाहेरील पाणी गावात, घरांपासून अधिक जवळ आणू शकलो. यासोबतच या मोटारीमुळे शेती साठी ही पाणी उपलब्ध होऊ शकले ज्यातून शेती करणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली, त्यांचे उत्पन्नही वाढले, याचा परिणाम स्थलांतर कमी करण्यात झाले.
[प्रातिनिधीक चित्र]
     मुलभूत गरजांची पुरेशी उपलब्धता, शिक्षणासाठी आवश्यक असणारी वीज आणि आदिवासी समूहालाही जगण्यासाठी लागणारे मनोरंजन आणि सर्वात मुख्य म्हणजे सन्मानपूर्वक जगण्याच्या शक्यता वाढण्यासाठी लागणारे उत्पन्न मिळवायला अधिक विजेची आवश्यकता जाणवू लागली. आमले गावात याची अनेक दिवस चर्चा सुरु होती आणि शेवटी या चर्चेचे रुपांतर २१ ऑगस्ट २०१८ रोजी ग्राम सभा घेण्यात झाले. गावाचे निर्णय गावातल्या लोकांनीच घ्यावे या तत्वप्रणाली नुसार ‘आरोहनने आतापर्यंत ‘पाडा समितीचे गठन केलेले होते, जिच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीतल्या चर्चेत ‘आरोहनच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती, पण चर्चा आणि निर्णय मात्र गाववालेच घेत होते. चर्चेत अशी माहिती समजली की, याधीही गावाने अपुऱ्या विजेच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर गावाने ‘महावितरण कडे आपली गरज नोंदवली होती आणि शासनाने त्याला मंजुरी दिली होती, त्यासाठी झालेल्या मोजमापा वरुन काही खांब येऊन पडलेही आणि एका रात्री ते खांब परतही गेले होते. एवढ सगळ झाले होते मग वीज का नाही? याचा शोध घेतांना लक्षात आले की याचे कागदोपत्री कुठलाही पुरावा गाव वाल्यांच्या हाती नव्हता. मग बैठकीत निर्णय घेतला गेला की पाडा समिती यापुढे याविषयाचा पाठपुरावा घेईल जोपर्यंत वीज घराघरात पोहोचत नाही तोपर्यंत. यासर्व प्रक्रियेत सर्व प्रकारचे मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी ‘आरोहन असेलच याची ग्वाही प्रतिनिधींनी बैठकीत दिली होतीच.

     यानंतर सुरु झाल्या शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटी. या कार्यालयातून त्या कार्यालयात पाठवले जाऊनही न खचता सर्व कागदपत्र गोळा करण्याची स्पर्धा सुरु झाली. रोज वेगळा शोध लागायचा. महावितरण आधी वन विभागाचे ना हरकत पत्र आणा असे म्हणत होते तर त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आधी महावितरण ने तुम्हांला वीज कनेक्शन मंजूर केले आहे असे पत्र द्या मग आम्ही तुम्हांला ना हरकत देतो असे ऐकावे लागले. आधी कोण? हा प्रश्न सोडवण्यातच बरेच दिवस गेले. कदाचित आपल्याला वीज मिळणारच नाही कारण कनेक्शन आणण्यासाठी ‘वाईल्ड लाईफ चे जंगल क्रॉस करावे लागणार होते. काहीही करुन वीज आणायचीच हे ध्येय एवढे स्पष्ट आणि निश्चित होते की त्यासाठी काहीही करण्याची पाडा समिती सदस्यांची आणि त्यांना पाठिंबा देण्याची गावाची तयारी होती. आधी ते की आधी हे ह्या शोधात हळूहळू गाववाले दोन्ही विभागांच्या वरिष्ठां पर्यंत पोहोचले. मग नवीनच शोध लागला की, ज्या गावांमध्ये सोलर आहे त्यांना वीज मिळत नाही. आता ह्या नवीन प्रश्नाला सामोरे कसे जायचे ह्यासाठी परत पूर्ण गावाची एक बैठक झाली आणि ठरले की, आमच्याकडे सोलर असल्यामुळे शासन आम्हांला वीज देवू इच्छित नाही असे संबंधित अधिकाऱ्याकडून लेखी मागायचे. परत पाडा समितीच्या टीमचा मोर्चा महावितरण मध्ये त्यांची ही मागणी घेऊन पोहोचला. गाववाले निवेदन घेऊन तर कार्यालयात पोहोचले पण अधिकारी अर्ज घ्यायला तयारच होईना. मग शेवटी अर्ज घेतल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही ह्या गाववाल्यांच्या निर्धारापुढे अधिकारी नमले आणि त्यांनी अर्ज तरी स्वीकारला.

     अर्ज त्यांच्या कार्यालयात नोंदला गेला आणि तिथून चक्र सुरु झाले. संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र गावभेट घेतली, सर्वांची एकत्र छान बैठक झाली ज्यामुळे गावाचा विश्वास वाढला की वीज मिळू शकते. त्यानंतर वीज विभागाने या कामात ‘वाईल्ड लाइफ’ भागातील किती झाडे तुटतील याचे पत्र ‘वाईल्ड लाइफ’ सुरक्षा विभागाला दिले गेले. याकामासाठी लागणारी जमीन यासाठी गावाच्या सहमतीने ‘वन हक्कचा तीन दोन व तीन एक चा प्रस्ताव वन विभागाकडे दाखल करण्यात आला. संबंधित सर्व विभागाने एकमेकांशी बोलून देशाच्या नागरिकांना काय हवे आहे ते पुरवावे असे आपल्या घटनेत असले तरी आमच्या भागात हे सर्व ‘कम्युनिकेशन, मग ते पत्रव्यवहार असो की त्यांच्या एकत्र बैठका किंवा गावाचा अपेक्षित सर्वे असो आमचे पाडा समितीचे सदस्य घडवून आणत होते. पुढे मग कनेक्शन साठी लागणारे सर्व कामकाज सुरु झाले. त्यानंतर गावातील ज्या लोकांकडे कनेक्शन द्यायचे आहे त्यांची यादी करणे, त्याला मंजुरी घेणे, प्रत्यक्ष ट्रान्सफार्मर बसवणे, मीटर लावणे इ. कामे झाली आणि गावात लाईट पोहोचली.

     यानिमित्ताने बरेच कायदे, तरतुदी – तीन दोन, तीन एक दावा; गाव नकाशा, सामूहिक वन हक्क दावा इ. आम्ही, गाववाले शिकलो एवढच नाही तर आमच्या वाट्याला दोन्ही विभागाचे इतके नवखे कर्मचारी आले होते की त्यानाही आमच्या या कामामुळे अनेक गोष्टींचा अभ्यास झाला, तरतूद समजली. संबंधित कर्मचारी, अधिकारी जागेवर नाही यामुळे आमच्या गाववाल्यांच्या अनेक चकरा झाल्या, त्यात आम्हा सर्वांची छान दोस्ती झाली असे म्हणून आम्ही गेलेल्या पैशांचे दुःख कमी करुन घेतले. यासर्व कामासाठी साधारण ३५ झाडे कापावी लागली. किती झाडे तुटतील,कापावी लागतील याचे पत्र आधी देऊनही ज्या कंत्राटदाराला काम दिले होते त्याच्यावर दबाव आणून, गावावर दबाव आणून पैसे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण गाव फारच पक्के होते. आमच्या कडे पैसे नाही, पोरा-बाळांसह आम्हांला अटक करा अशी भूमिका घेऊन गाव रस्त्यावर आले त्याचा फायदा असा झाला की कोणावरही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. काम पूर्ण झाले आता पुढच्या आठवड्यात सर्वांचे घरात लाईट लागतील तेव्हा आपण जाहीर एक कार्यक्रम करुयात, त्यासाठी तारीख काय असावी, प्रमुख पाहुणे कोण? निमंत्रण पत्रिका कशी असावी? कोण कोणाला पत्रिका पोहोचवणार? आलेल्या पाहुण्यांना जेवायला काय? ही सर्व चर्चा सुरुच होती तर गावासाठी बसवलेला डीपी जळाला आणि सर्व चर्चा जागच्या जागीच राहिल्या. परत सर्व पाठपुरवा आणि पळापळ सुरु झाली आणि अखेर गावात लाईट आली. आख्ख्या गावाच्या बरोबरीने सतत त्यांच्या बरोबर राहिले त्या सरिता आणि राजारामच्या कष्टाला फळ आले. राजाराम तर शेवटचे काही दिवस गावातच तळ ठोकून राहिला की काही कारणाने काम थांबायला नको किंवा बंद पडायला नको. माधुरी, गणेश आणि नितेश यांचा रोजचा पाठपुरावा तर होताच पण ज्या ज्या वेळी गरज पडली त्या त्या आणि तितक्या वेळेस गावाच्या बैठकांना, गाववाल्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी जात होते. यासर्व जणांच्या अथक प्रयत्नाने साडे आठ महिने युद्ध पातळीवर केलेल्या पाठपुराव्या नंतर अखेर लाईट आली

....आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते की, ‘आणि बुद्ध हसला.......’

-- अनिता पगारे

No comments:

Post a Comment