Monday, October 12, 2020

सुसाट जॉर्ज

चरित्र आणि प्रोफाईल (शब्दचित्र) यात फरक आहे हे ‘सुसाट जॉर्जचे सिद्धहस्त लेखक निळू दामले पुस्तकाच्या सुरवातीसच स्पष्ट करतात - ‘प्रोफाईल हे व्यक्तीचं स्केच असतं. प्रोफाईलमधे व्यक्तीचे महत्वाचे ठळक पैलू येतात. ते ही मोजक्या रेषांचे फटकारे मारून तयार केलेल्या स्केच सारखे.’

शब्दचित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे माणसाच्या आयुष्यातले चढ-उतार, सन्मानाचे-संघर्षाचे क्षण त्यात टिपले असतात, त्यामुळे आपल्याला त्याचे व्यक्तिमत्व आणि जीवनपट संक्षिप्तपणे दिसतो.

निळू दामले यांनी जॉर्ज फर्नांडिसांचे शब्दचित्र लिहिण्याचे एक कारण म्हणजे त्यांनी कांही काळ जॉर्जबरोबर काम केलं होतं, जॉर्जना जवळून बघितलं होतं. दुसरं कारण (आणि हा माझा कयास आहे) म्हणजे मराठी वाचकांना असलेला जॉर्जचा परिचय. जॉर्जच्या कामाने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे प्रभावित झालेल्यांची (झळ लागलेल्यांची म्हणा हवे तर) एक आख्खी पिढी इथे मुंबईत आहे. मुंबई बंद करणारे जॉर्ज, टॅक्सीचालकांची युनियन करणारे जॉर्ज, बेस्ट कामगारांचा संप करणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे, अशा अनेक भूमिकांतून जॉर्ज मुंबईकरांच्या जीवनात आले. आणि ज्यांना हरवणे अशक्य समजले जायचे त्या स.का. पाटलांना निवडणुकीत सपशेल हरवणाऱ्या जॉर्जबद्दल तर मुंबईकरांना नेहमीच कुतूहल राहिले आहे.



जॉर्ज यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व ‘सुसाट जॉर्जमध्ये अचूक पकडले आहे. कोणत्याही विषयाचा ध्यास व अभ्यास करणं आणि धडाडी असणं हे गुण साधारणपणे हातात हात घालून जात नाहीत. पण जॉर्ज ह्याला अपवाद होते. म्हणुनच जॉर्ज सारख्या दुर्मिळ व्यक्तिमत्वाभोवती एक वलय सहज तयार होत असावे. यलोगेट पोलिसांविरुद्ध मोर्चा काढून गोदी कामगारांवर होणारा अत्याचार रोखण्यात, रेल्वे कामगारांचा मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात, दिवसा दिल्लीत काम करून रात्री मुंबईत कामगारांची मीटिंग घेणाऱ्या जॉर्ज यांची धडाडी वाखाणायलाच हवी.

डॉक्टरी सल्ला न जुमानता कारगिलच्या सैनिकांची भेट घेण्यातला झपाटलेपणा, आणि आपल्यावरच डायनामायिट खटला काढून घेऊ नये असं जनता पार्टीला सांगणारे जॉर्ज यांचा प्रामाणिकपणा अशी त्यांची स्वभाव-वैशिष्ट्ये लेखकाने अचूक पकडली आहेत.

कोणत्याही नेतृत्वापुढे नेहमी असा पेच असतो की एका बाजूस वैयक्तिक आकांक्षेचा रेटा असतो तर दुसऱ्या बाजूस अंगीकारलेले कार्य करताना सचोटी व आशावाद ज्वलंत ठेवण्याची कसरत असते. जॉर्जने वैयक्तिक आकांक्षेकडे दुर्लक्षच केले. त्यामुळेच कामगारांचा आणि कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा व प्रेम मिळाले.

ओघवत्या भाषेत निळू दामले यांनी जॉर्ज फर्नांडिसांचे शब्दचित्र रंगवले आहे. त्यात तटस्थता असली तरीही कौतुकाचीही झालर आहेच. मुंबई बंद करण्यासाठी जो ओळखला गेला त्याच्यावरील पुस्तक लॉकडाऊनमध्ये सबकुछ बंद असताना प्रकाशित व्हावे हा एक चमत्कारिक योगायोग नव्हे का?

(‘सुसाट जॉर्ज’, लेखक: निळू दामले, राजहंस प्रकाशन, रु २५०)

विवेक पटवर्धन

Thursday, October 8, 2020

लॉकडाउनमधली पुस्तके: रानबखर

 लॉकडाउनमध्ये बऱ्याच दिवसांपासून राहून गेलेली कामे काढली. कपाटात पुस्तके लावायचे काम माझ्या ‘टू-डू’ लिस्टमध्ये अनेक दिवस होते. मग तेच करायला बसलो. त्यातच अनेक दिवस सापडत नसलेली दोन पुस्तके हाती आली. अचानक लक्षात आले की मी इंग्रजी पुस्तके वाचतोय पण कित्येक दिवसात, कित्येक महिन्यात म्हणा हवे तर, मराठी पुस्तके वाचली नाहीयेत. साधारणपणे काही चांगल्या पुस्तकांचे किंवा मला हव्या असलेल्या विषयांवरच्या पुस्तकांचे संदर्भ मी ‘रिमाइंडर’ अॅपमध्ये नोंदवतो. फोन काढला आणि तीन पुस्तके ऑर्डर केली. ‘रानबखर’ त्यातलंच एक, इतर दोन पुस्तकांबद्दल नंतर बोलू.

‘आरोहन’च्या कार्यकर्त्यांबरोबर जव्हार मोखाडा भागातल्या पाड्यात फिरताना मी कित्येक गावकऱ्यांना आणि आदिवासींनाही भेटलो होतो. आदिवासींबाबत, त्यांच्या प्रश्नांबाबत अधिक जाणून घ्यावं असं वाटले. ‘रानबखर’चा संदर्भ कसा आला ते आठवत नाही, पण ‘रिमाइंडर’ मध्ये मी नोंद केली होती. 

माझा असा अनुभव आहे की तुम्ही ज्यावेळी एखाद्या विषयावरचे पुस्तक वाचता, तेव्हां इतर तशीच पुस्तके तुमच्या पुढ्यात आणली जातात. मी रानबखर मागवले आणि थोड्याच दिवसात कुणाच्या तरी सांगण्यावरून गाय स्टँडिंगचे ‘प्लंडर ऑफ द कॉमन्स’ हे देखील घेतले.प्लंडरचा विषय वेगळा पण कांही ठिकाणी रानबखरच्या विषयाशी समांतर जाणारा. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.



पत्रकारिता करताना थत्तेंचा संबंध झारखंडमध्ये आदिवासी गावांमध्ये अनौपचारिक शिक्षणाचे काम करणाऱ्या कांही लोकांशी आला आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, आसाम अश्या अनेक ठिकाणी आदिवासी खेड्यात रहात, त्यांना समजून घेत प्रवास केला. आदिवासींची आयुष्याकडे, शेत-रानाकडे, त्यांच्या गायीगुरांकडे  बघायची दृष्टी वेगळी आहे. शहरातल्या माणसांना ती अप्रगत वाटेल. पण जग आता  त्यांच्याप्रमाणेच विचार करू लागले आहे हे पर्यावरणावरील अनेक लेख आणि पुस्तके दाखवून देत आहेत. “साधेपणा आणि भोळेपणा, अल्पसंतोष आणि आळशीपणा, निवांतपणा आणि मंदपणा, उत्स्फूर्तता आणि नियोजनशून्यता हे गुणावगुण एकाच नाण्याचे छापा-काटा आहेत” असे थत्ते लिहितात तेव्हां आपण नाण्याची कुठची बाजू बघतोय त्याचा वाचकाला विचार करायला ते भाग पाडतात.

आदिवासींचे शोषण कसे आणि किती केले जाते हे तर सर्वज्ञात आहे, निदान तसे असावे. (थत्ते स्वत: ‘वयम्’ ही स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था जव्हारला चालवतात.) ते आदिवासींच्या बाबतीत शोषण किती खोल आणि नीच थराला जाऊ शकतं त्याची कल्पना तटस्थपणे तरीही कळकळीने मांडतात तेव्हां वाचताना आपलीच मान शरमेने खाली जाते. त्यांच्या प्रश्नावर ठोस उत्तर थत्ते सांगत नाहीत, कारण जटील प्रश्नांना सोपी उत्तरे नसतातच. पण ते उत्तरे शोधायची विचारधारा मात्र दाखवतात. “एका ठिकाणी उत्तर सापडलं म्हणून त्याच्या भराभर यांत्रिक कॉप्याकाढून ते उत्तर इतर ठिकाणी लागू पडेलच असं नाही.” म्हणजेच प्रत्येक ठिकाणी नवी उत्तरे शोधावी लागणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक आहे. म्हणून “लोक आणि विज्ञान एकत्र आले तर आदिवासींचा प्रश्न आवाक्यात आणता येईल” हा थत्तेंचा विचार सुयोग्य आहे. ते बारीपाड्याबद्दल लिहितात. बारीपाड्याच्या सर्व शंभर कुटुंबांनी श्रमदानाने दीडशे बंधारे बांधले, पाच पाझर तलाव केले. नैसर्गिकरीत्या उगवणारी झाडे वाढवली. कल्पकतेने अनेक विकासाची कामे हाती घेतली. बारीपाड्याच्या उदाहरणाचा धडा म्हणजे लोक आणि विज्ञान एकत्र आले तर आदिवासींचा प्रश्न आवाक्यात आणता येईल हाच आहे.

कित्येक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था आदिवासींसाठी काम करीत आहेत ही अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. तर स्वातंत्र्याची सात दशके उलटली आणि अनेक विचारांच्या राजकीय नेत्यांची सरकारे आली-गेली तरीही आदिवासींची परिस्थिती फारशी सुधारली नाही हा दुर्दैवी भाग आहे.

रानबखर हे मिलिंद थत्ते यांचं केवळ पंच्याण्णव पानांचे पुस्तक. कुठच्याही विचारधारेचं जोखड न घेतां लिहिलेलं. मी ह्या वर्षी वाचलेल्या अप्रतिम पुस्तकांपैकी एक!

विवेक पटवर्धन

(रानबखर – आदिवासींच्या जीवनसंघर्षांचे पदर, मिलिंद थत्ते, समकालीन प्रकाशन, रु. १००/-)